नवी दिल्ली : पाकिस्ताननं पुन्हा एकदा नियंत्रण रेषेजवळ रविवारी रात्री गोळीबार केला. सलग चौथ्या दिवशी पाकिस्तान सैन्याकडून LoC जवळ गोळीबार करण्यात आला. या गोळीबाराला भारतीय सैन्यानं लगेच चोख प्रत्युत्तर दिलं. लहान शस्त्रांच्या आधारे पाकिस्तान मागील चार दिवस सतत भारताच्या बाजूनं गोळीबार करत आहे. मात्र, पाकिस्तानच्या या छुप्या खेळीला भारतीय सैन्य देखील प्रत्युत्तर देत आहे.
भारतानं दिलं चोख प्रत्युत्तर : पाकिस्तानी सैन्याच्या चौक्यांमधून 27 आणि 28 एप्रिलच्या रात्री नियंत्रण रेषेच्या पलीकडं कुपवाडा आणि पूंछ जिल्ह्यांसमोरील भागात लहान शस्त्रांनी गोळीबार केला. भारतीय सैन्यानं जलद आणि प्रभावीपणे प्रत्युत्तर दिलं असल्याची माहिती भारतीय सैन्यानं दिली. पाकिस्तानकडून गोळीबार करण्याचा हा सलग चौथा दिवस आहे.
पाकिस्तानात अस्थिर वातावरण : पहलगाममध्ये 22 एप्रिलला दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केला होता. या हल्ल्यात 26 पर्यटकांचा मृत्यू झाला होता. या हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान सीमाभागात तणावाचं वातावरण पाहायला मिळत आहे. तसंच दहशतवाद्यांविरोधात भारतीय सैन्यानं कारवाया तीव्र केल्या आहेत. त्यामुळं पाकिस्तान घाबरलेला असल्याचं दिसून येत आहे. भारताच्या इशाऱयानंतर पाकिस्तानात अस्थिर वातावरण निर्माण झालंय.
दहशतवाद्यांची घरं उडवली : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय सैन्यानं काश्मीर खोऱयात कारवाया तीव्र केल्या आहेत. पहलगाम हल्ल्यात हात असलेल्या तसंच दहशतवाद्यांशी थेट संपर्क असलेल्या संशयितांची घरं भारतीय सैन्याकडून उद्धवस्त करण्यात येत आहेत. आतापर्यंत जवळपास नऊ संशयितांची घरं स्फोटानं उडवून देण्यात आली आहेत.
हेही वाचा -