नवी दिल्ली- भारत सरकारनं जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानी नागरिकांना देण्यात आलेले व्हिसा रद्द करण्यात यावेत. पाकिस्तानी नागरिकांना सार्क व्हिसा सूट योजनेअंतर्गत (SVES) भारतात प्रवास करण्याची परवानगी बंद करण्यात आलेली आहे. तसेच एसव्हीईएस व्हिसाखाली भारतात राहत असलेल्या पाकिस्तानी नागरिकांना ४८ तासामध्ये भारत सोडणं बंधनकारक आहे.
- भारत सरकारनं पाकिस्तानी नागरिकांना सोडण्याचे आदेश दिल्यानंतर शेकडो पाकिस्तानी नागरिक वाघा अटारी सीमेवरून त्यांच्या देशात परतले आहेत. असे असले तरी अजूनही बरेच पाकिस्तानी देशात आहेत. हे नागरिक त्यांच्या देशात परतले नाहीत, तर त्यांच्यावर काय कारवाई होणार, हे जाणून घ्या.
अल्पकालीन व्हिसा असलेल्या पाकिस्तानी नागरिकांसाठी भारत सोडून जाण्याची अंतिम मुदत संपली आहे. अशा परिस्थितीत भारत सरकारच्या आदेशाचं उल्लंघन करून भारतात राहणाऱ्यांना अटक, खटला, दंड किंवा तुरुंगवास होऊ शकतो. इमिग्रेशन अँड फॉरेनर्स अॅक्ट २०२५ नुसार, सरकारनं ठरवून दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर कोणत्याही पाकिस्तानी व्यक्तीला अटक केली जाईल. खटला दाखल करून तीन वर्षांपर्यंत तुरुंगवासाची शिक्षा किंवा जास्तीत जास्त ३ लाख रुपये दंड होऊ शकतो. व्हिसाची मुदत संपूनही राहणाऱ्या पाकिस्तानी नागरिकांना दोन्ही शिक्षा होऊ शकतात.
- जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर कडक उपाययोजना म्हणून भारत सरकारनं पाकिस्तानी नागरिकांचे व्हिसा तत्काळ रद्द केले. सार्क व्हिसा असलेल्या पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्याची २७ एप्रिल अंतिम तारीख होती. तर वैद्यकीय व्हिसा असलेल्या पाकिस्तानी नागरिकांसाठी २९ एप्रिल अंतिम तारीख आहे.
- कोणाला शिक्षा होऊ शकते?व्हिसाच्या नियमानुसार जे लोक भारताच्या कोणत्याही प्रदेशात व्हिसा संपूनही राहाणारे, वैध पासपोर्ट किंवा इतर प्रवास कागदपत्रे नसणाऱ्यांना शिक्षा किंवा दंड होऊ शकतो. याशिवाय कायद्यातील कोणत्याही तरतुदीचं उल्लंघन करणाऱ्या किंवा वैध व्हिसा अटींचं उल्लंघन करणाऱ्यालाही दंडात्मक कारवाईला सामोरं जावं लागू शकते.
५०० हून अधिक पाकिस्तानींनी सोडला भारत- अल्पकालीन व्हिसा धारकांसाठीची रविवारी अंतिम मुदत होती. गेल्या तीन दिवसात एकूण ५३७ पाकिस्तानी नागरिक अटारी सीमेवरून भारतातून बाहेर पडले आहेत, असे एका अधिकाऱ्यानं सांगितलं. गेल्या तीन दिवसात ८५० भारतीय नागरिक भारतात परतले आहेत. फक्त रविवारी २३७ पाकिस्तानी नागरिक त्यांच्या देशात परतले आहेत. तर ११६ भारतीय नागरिक देशात परतल्याची माहिती अटारी सीमेवरील प्रोटोकॉल अधिकारी अरुण पाल यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना दिली.
कशामुळे पाकिस्तानचे नागरिक भारतात येतात? वैद्यकीय पर्यटन हा भारत-पाकिस्तान संबंधांचा एक महत्त्वाचा पैलू आहे. दरवर्षी हजारो पाकिस्तानी नागरिक वैद्यकीय उपचारांसाठी भारतात येतात. भारतामधील प्रगत आरोग्याच्या पायाभूत सुविधा, किफायतशीर दर यामुळे पाकिस्तानातील रुग्णांसाठी विशेष वैद्यकीय सेवा मिळवण्यासाठी भारत एक पसंतीचं ठिकाण झालं आहे. अवयव प्रत्यारोपणापासून ते हृदय शस्त्रक्रियांपर्यंतच्या उपचारांसाठी पाकिस्तानातील अनेक रुग्ण भारतात येतात. दिल्लीतील हजरत निजामुद्दीन औलिया, हजरत अमीर खुसरो आणि अजमेरमधील हजरत ख्वाजा मोईनुद्दीन चिश्ती यांचे दर्गे या ठिकाणी भेट देण्यासाठी पाकिस्तानमधून अनेकजण भारतात येतात. नोव्हेंबर २०१९ मध्ये उद्घाटन झालेल्या कर्तारपूर कॉरिडॉरमुळे भारतीय शिखांना गुरुद्वारा दरबार साहिबला व्हिसा-मुक्त प्रवेश मिळतो. अनेक भारतीय महिला आणि पुरुषांनी पाकिस्तानींशी विवाह केले आहेत. त्यामुळेदेखील त्यांचे नातेवाईक अल्पकालीन व्हिसासाठी दोन्ही देशातून ये-जा करतात.
हेही वाचा-