केंद्रपाडा/मुंबई-ओडिशा किनाऱ्यावरील गहिरमाथा सागरी अभयारण्यातील व्हीलर बेटावर टॅग एका ऑलिव्हर रिडले कासवाला १८ मार्च २०२१ रोजी टॅग केले होते. हे कासव महाराष्ट्रातील गुहागर समुद्रकिनाऱ्यावर अंडी घालण्यासाठी बंगालच्या उपसागरातून सुमारे ३,६०० किमी पोहत गेल्याचा तज्ञांनी निष्कर्ष काढला आहे. त्यामुळे कासवांच्या संशोधनात नवीन माहितीची भर पडली आहे.
गुहागर समुद्रकिनाऱ्यावर खड्डा खोदून १२० अंडी घातलेले कासव या वर्षी २७ जानेवारी रोजी समुद्रात परतताना आढळल्याचं एका अधिकाऱ्यानं सांगितलं. कासवावर ZSI आद्याक्षरे आणि ०३२३३ हा क्रमांक लावण्यात आल्याचं अधिकाऱ्यांना लक्षात आलं. हा टॅग चार वर्षांपूर्वी ओडिशामध्ये लावण्यात आला होता.
भारतीय प्राणीशास्त्र सर्वेक्षण विभागाचे वरिष्ठ शास्त्रज्ञ बासुदेव त्रिपाठी म्हणाले, ओडिशाच्या किनाऱ्यावर घरटे बांधलेल्या कासवानं अंडी घालण्यासाठी हजारो किलोमीटर अंतरावर स्थलांतर केल्याची ही पहिलीच नोंद आहे. सामान्यत: ओडिशामध्ये स्थलांतर वर्तनाचा अभ्यास करण्यासाठी टॅग केलेले कासव इतके लांब अंतर प्रवास करत नाहीत. ओडिशा वन विभागानं १९९९ मध्ये कासवांना टॅगिंग सुरू केले. तेव्हा सुमारे १,००० कासवांना टॅगिंग केले होते. यापूर्वी, श्रीलंकेच्या उत्तर किनाऱ्यावरून काही टॅग केलेले कासव मच्छिमारांनी वाचवले होते. मात्र, तिथे कासवांनी अंडी घातलेली नव्हती.
- पहिल्यांदाच भारताच्या दोन्ही किनाऱ्यांवर ऑलिव्ह रिडले कासवानं अंडी घातल्याची नोंद झाली आहे, असे मॅन्ग्रोव्ह फाउंडेशनचे उपसंचालक मानस मांजरकर यांनी सांगितलं. मॅन्ग्रोव्ह फाउंडेशन ही महाराष्ट्र सरकारच्या मॅन्ग्रोव्ह सेल अंतर्गत कासवांच्या संवर्धनासाठी काम करते.
प्रभावी संवर्धन धोरण तयार करण्याची गरज- वरिष्ठ शास्त्रज्ञ त्रिपाठी म्हणाले की, या मादी कासवानं महाराष्ट्राच्या ठिकाणी घरटे बांधण्यासाठी किमान ३,६०० किमीचा कठीण प्रवास केला. कासवांनी दिलेल्या १२० अंड्यांपैकी १०० अंडी उबली आहेत. कासवांची पिल्ले ही समुद्रात सोडण्यात आली आहेत. नर आणि मादी कासवे प्रजनन क्षेत्रात स्थलांतर करतात. सहसा ज्या समुद्रकिनाऱ्यांवर जन्मलेले असतात तिथे परत येतात. बंगालच्या उपसागरातील ऑलिव्ह रिडले कासवांच्या खाद्य आणि प्रजनन स्थळांची ओळख निश्चित करण्याकरिता प्रभावी संवर्धन धोरण तयार करण्याची गरज आहे. अधिक तपशीलवार वैज्ञानिक अभ्यास करण्यावर लक्ष केंद्रित करण्याची आवश्यकता आहे. अंडी उबण्यासाठी साधारणपणे ५०-६० दिवस लागतात. कासव प्रामुख्यानं महाराष्ट्रातील रत्नागिरी, त्यानंतर सिंधुदुर्ग आणि रायगडमधील सागर किनारी अंडी घालतात.