बिजापूर : कर्रेगुट्टा नक्षलवादी कारवाईदरम्यान सुरक्षा दलांनी ३१ नक्षलवाद्यांचा खात्मा केला आहे. यासंदर्भात छत्तीसगड पोलीस आणि सीआरपीएफ अधिकाऱ्यांनी माहिती दिली आहे. बुधवारी पोलीस अधिकाऱ्यांनी बिजापूरमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यावेळी पत्रकार परिषदेत सीआरपीएफचे डीजी आणि छत्तीसगडचे डीजीपी उपस्थित होते.
एकूण ३१ नक्षलवादी ठार : कर्रेगुट्टा नक्षलवादी ऑपरेशनमध्ये एकूण ३१ नक्षलवादी मारले गेले. हे ऑपरेशन १६ दिवसांपेक्षा जास्त काळ चालले. नक्षलवाद्यांविरुद्धच्या या मोहिमेत १ कोटी ७२ लाख रुपयांचे बक्षीस असलेले नक्षलवादी मारले गेले आहेत. ज्यामध्ये २८ नक्षलवाद्यांची ओळख पटली आहे. इतर तीन नक्षलवाद्यांची ओळख पटवली जात आहे. तसंच सुरक्षा दलांनी नक्षलवाद्यांचे एकूण २१४ बंकर उद्ध्वस्त केले आहेत. याचबरोबर नक्षलवाद्यांचे ४ टेक्निकल युनिट्स नष्ट करण्यात आले आहेत. ज्यामध्ये ४ लेथ मशीन आणि बीजीएल लाँचर आणि नक्षलवाद्यांचा बीजीएल सेलचा समावेश आहे.
सीआरपीएफचे डीजी काय म्हणाले?: या पत्रकार परिषदेत सीआरपीएफचे डीजी ज्ञानेंद्र प्रताप सिंह यांनी सांगितलं की, "बस्तर आणि विजापूरमधील ज्या शाळांना नक्षलवाद्यांनी उद्ध्वस्त केल्या आहेत. त्या पुन्हा उभारण्यासाठी आम्ही पहिलं प्राधान्य दिलं आहे. आमच्या कारवाईमुळं नक्षलवाद्यांना मोठा धक्का बसला आहे. नक्षलवाद्यांचे वरिष्ठ नेते जिथं एकत्र येत होते. त्या ठिकाणावर आम्ही कारवाई केली आहे. तसंच नक्षलवाद्यांचा डाव उधळून लावण्यात आम्हाला यश आलं आहे," असं डीजी ज्ञानेंद्र प्रताप सिंह म्हणाले. याचबरोबर, "आम्ही शस्त्रे बनवणाऱ्या नक्षलवाद्यांच्या चार कंपन्या उद्ध्वस्त केल्या आहेत. नक्षलवाद्यांनी आपल्या साथीदारांना बरं करण्यासाठी बांधलेल्या तटबंदीचं बांधकाम आम्ही उद्ध्वस्त केलं आहे. ज्या पद्धतीनं या लोकांनी जंगलात आयईडी पेरले आहेत, त्यामुळं गावकरी त्याचे बळी ठरत आहेत. आम्ही नक्षलवाद्यांचे ते आयईडी नेटवर्क उद्ध्वस्त केलं आहे. नक्षलवाद्यांच्या नियोजनाला हा सर्वात मोठा धक्का आहे," असंही ज्ञानेंद्र प्रताप सिंह यांनी सांगितलं.
३१ मार्च २०२६ पर्यंत नक्षलवाद संपेल : "छत्तीसगडमधील चार जिल्हे नक्षलग्रस्त आहेत. संपूर्ण देशात ६ जिल्हे नक्षलग्रस्त आहेत. ज्यामध्ये छत्तीसगडमध्ये चार, महाराष्ट्रात एक आणि झारखंडमध्ये एक जिल्हे आहेत. छत्तीसगडमधील सुकमा, विजापूर, नारायणपूर आणि कांकेर हे सर्वात जास्त नक्षलग्रस्त जिल्हे आहेत. तसंच, ३१ मार्च २०२६ पर्यंत सर्व नक्षलवाद कोणत्याही परिस्थितीत संपवला जाईल. जर नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केलं नाही, तर त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल," असंही ज्ञानेंद्र प्रताप सिंह यांनी सांगितलं.
४५० आयईडी जप्त : सीआरपीएफ डीजी ज्ञानेंद्र प्रताप सिंह म्हणाले की, "आमच्या जवानांनी घटनास्थळावरून एकूण ४५० आयईडी जप्त करून नष्ट केले आहेत. जवानांना नवीन मायनिंग मशीन उपलब्ध करून दिल्या जात आहेत. आयईडी रिकव्हरी मशीन्स अपडेट केल्या जात आहेत. आयडी आणि बीजीएलमुळं आपल्या दलाचं सर्वाधिक नुकसान झालं आहे. आम्ही आयईडी आणि बीजीएल बनवण्याची संपूर्ण प्रक्रियाच नष्ट केली आहे. तसंच पूर्वी याठिकाणी लोक मंदिरात पूजा करण्यासाठी येत होते. मात्र, याठिकाणी नक्षलवादी छावण्या उभारल्यापासून हे कार्य बंद झाले होते. पण आम्ही ते पुन्हा चालू करू," असं आश्वासनही ज्ञानेंद्र प्रताप सिंह दिलं आहे.
हेही वाचा-