हैदराबाद/कोरुतला: तेलंगणामध्ये रविवारी दोन वेगवेगळ्या पण तितक्याच दुःखद घटनांमध्ये, विजेचा धक्का लागून चार जणांना आपला जीव गमवावा लागला. जगतियाल जिल्ह्यातील कोरुतला शहरात, गणेश मूर्ती हलवताना एक दुःखद दुर्घटना घडली. स्थानिक आणि पोलिसांच्या म्हणण्यानुसार, मेटपल्ली रोडवरील एका गणेश मूर्ती बनवण्याच्या केंद्राचे मालक अलवाला विनोद (३२) हे आठ जणांसह लाकडी काठ्यांचा वापर करून ओली मूर्ती दुसऱ्या शेडमध्ये हलवत होते. मूर्ती ३३/११ केव्ही वीज तारेखाली गेल्याने ती तारेच्या संपर्कात आली, ज्यामुळे अचानक विजेचा झटका बसला.
विजेच्या धक्क्याने सर्व कामगार कोसळले. तिथे जवळच असणाऱ्यांनी तातडीने मदत केली आणि जिवंत तार दूर करण्यासाठी काठ्यांचा वापर केला आणि जखमींना रुग्णालयात दाखल केलं. यात विनोद आणि वेल्लुटला साईकुमार यांचा वाटेतच मृत्यू झाला. सात जण जखमी झाले, यातील तिघांची प्रकृती गंभीर आहे. त्यांना वारंगल एमजीएम रुग्णालयात हलवण्यात आलं आहे, तर उर्वरित चार जणांवर जगितियालमध्ये उपचार सुरू आहेत.
हैदराबादमध्ये वृद्ध जोडपे जळाले - दुसऱ्या एका हृदयद्रावक घटनेत, भिकारी वृद्ध जोडप्याचा एलबी नगर पोलीस हद्दीतील चिंतलकुंटा जवळील फूटपाथवर झोपेत मृत्यू झाला. पहाटे २ वाजण्याच्या सुमारास, ११ केव्हीची हाय-टेन्शन वायर तुटली आणि थेट त्यांच्यावर पडली, त्यामुळे आग लागली. काही क्षणातच दोघेही ओळख पटण्यापलीकडे भाजले गेले होते.
यावेळी पेट्रोलिंग कर्मचारी घटनास्थळी पोहोचले तेव्हा त्यांना ते नेमके कोण आहेत याची ओळख पटणेही अवघड झाले होते. प्राथमिक अंदाजानुसार मृत पती-पत्नी असल्याचे दिसून येत असल्याचं पोलिसांनी सांगितलं. एलबी नगरचे आमदार सुधीर रेड्डी यांनी घटनास्थळी भेट दिली आणि परिस्थितीचा आढावा घेतला.
वीज विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की, वायर पडल्यानंतर पीडितांनी घातलेल्या नायलॉनच्या कपड्यांना लगेच आग लागली असावी. सरूरनगर सर्कल प्रभारी लक्ष्मीनारायण यांच्या मते, एक लॉरी विजेच्या खांबावर आदळली आणि जिवंत वायर तुटली. स्थानिक हेड कॉन्स्टेबलच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महाराष्ट्रातही गणेशोत्सवाची तयारी जोरात सुरू आहे. त्यामुळे मोठ्या मूर्ती हलवताना काळजी घेण्याची गरज आहे. सामाजिक कार्यकर्ते आणि प्रशासनाने यासंदर्भात सूचना देण्यास सुरुवात केली आहे.