हैदराबाद: दीन दुबळ्यांचे कैवारी, घटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांना दलितोद्धारक असं म्हटलं जातं. बाबासाहेब आंबेडकरांनी दलितांना गुलामीच्या जोखडातून मुक्त केलं. त्यामुळं भारतासह परदेशातही डॉ. आंबेडकर यांची जयंती (Ambedkar Jayanti 2025) मोठ्या धुमधडाक्यात साजरी केली जाते. चला जाणून घेऊया यांच्या कार्याचा इतिहास.
बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म : डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म महू येथे 14 एप्रिल 1891 ला रामजी सकपाळ आणि भिमाईच्या पोटी झाला. रामजी सकपाळ यांचे मूळ गाव हे कोकणातील आंबडवे होते. मात्र, रामजींनी पुणे येथे आपले शिक्षण पूर्ण करुन ब्रिटीश सैन्यात नोकरी पत्करली होती. त्यांना महू या ब्रिटीशांच्या सैन्य मुख्यालयाच्या ठिकाणी नोकरीनिमित्त जावे लागले. त्यामुळं बाबासाहेबांच्या लहानपणीची जडणघडण महू येथील छावणीच्या सैन्य शिस्तीतच झाली.
काय आहे बाबासाहेबांच्या आडनावाचा इतिहास? : सुभेदार रामजी सकपाळ हे सैन्यात नोकरीला होते. मात्र त्यांचे मूळ गाव कोकणातील आंबडवे हे होते. त्यामुळं सुभेदार रामजी सकपाळ यांनी सातारा येथील सरकारी हायस्कूलमध्ये बाबासाहेबांचे नाव लिहिताना भिमराव आंबावडेकर असं लिहिल्याची नोंद 7 नोव्हेंबर 1900 ला करण्यात आली. मात्र, पुढे याच शाळेत शिकताना बाबासाहेबांनी आपली चुणूक दाखवली. त्यामुळं ते सगळ्या शिक्षकांचे लाडके विद्यार्थी म्हणून नावारुपास आले. मात्र त्यांचे आंबावडेकर नाव घेण्यास शिक्षकांना अडचण होत असल्यानं कृष्णाजी केशव आंबेडकर या शिक्षकांनी त्यांचं नाव आंबेडकर असं नोंदवलं. त्यामुळं बाबासाहेब आंबेडकर यांनीही हेच नाव पुढे कायम करत आपलं नाव जगभर गाजवलं.
शाळेबाहेर बसून शिकणारा विद्यार्थी ते द नॉलेज ऑफ सिम्बॉल : जातीय द्वेशातून शाळेबाहेर बसून शिक्षण घेणारा विद्यार्थी ते द नॉलेज ऑफ सिम्बॉल हा दीनदुबळ्यांचा दीपस्तंभ होण्यापर्यंतचा त्यांचा जीवन प्रवास थक्क करणारा आहे. मात्र, भारतीय घटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर ही ओळख निर्माण करण्यासाठी त्यांना अहोरात्र कष्ट घ्यावे लागले.
कसं झालं बाबासाहेब आंबेडकर यांचं शिक्षण?: भीमराव आंबेडकर यांचा जन्म महू इथल्या सैनिकी छावणीत झाला. मात्र शिक्षणासाठी त्यांना सुभेदार रामजी सकपाळ यांनी सातारा इथल्या शाळेत पाठवलं. याच शाळेत छोट्या भीमरावांचं प्राथमिक शिक्षण झालं. प्राथमिक शिक्षणानंतर त्यांचं काही शिक्षण मुंबईत झालं. मात्र पुढं त्यांनी अत्यंत कठीण परिस्थितीत शाळेच्या बाहेर बसून शिक्षण घेतल्यानंतर, मुंबई विद्यापीठ, कोलंबिया विद्यापीठ, लंडन स्कूल ऑफ इकोनॉमिक्स अशा जगातील नामांकित शिक्षण संस्थांमधून शिक्षण घेतलं. जगातील हुशार विद्यार्थी म्हणून बाबासाहेब आंबेडकर हे नावारुपाला आले. बीए, एम.ए, पीएचडी, बार एट लॉ, डी एस्सी, आदी पदव्या, उच्च पदव्या त्यांनी मिळवल्या. तर एलएलडी आणि डी लिट या सर्वोच्च पदव्या देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.
बाबासाहेब आंबेडकरांची पुस्तकं कोणती?: डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षण, समाजकारण, राजकारण, आंतरराष्ट्रीय संबंध, पत्रकारिता, कामगार चळवळ या विषयात जबरदस्त लेखन केलं. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या "द प्रॉब्लेम ऑफ रुपी" हा शोधप्रबंध आजही अनेक अर्थतज्ज्ञांना मार्गदर्शक ठरतो. बाबासाहेब आंबेडकर यांचं 'वेटींग फोर अ व्हिसा' हे आत्मचरित्र प्रसिद्ध आहे. बाबासाहेब आंबेडकर यांचं हे 20 पानी आत्मचरित्र कोलंबिया विद्यापीठात शिकवण्यात येते. बाबासाहेबांनी असंख्य पुस्तकं आणि ग्रंथाचं लिखाण केलं. यात 'बुद्ध आणि त्यांचा धम्म, रिडल्स इन हिंदुइझम, अन्हिलेशन ऑफ कास्ट, थॉट्स ऑफ पाकिस्तान, शूद्र पूर्वी कोण होते? अशा ग्रंथ संपदांचा समावेश होतो.
हेही वाचा -