नवी दिल्ली : ऑपरेशन सिंदूरनंतर भारताच्या ७ सर्वपक्षीय शिष्टमंडळांपैकी एकाचे सदस्य असलेले काँग्रेस नेते सलमान खुर्शीद यांना सतत टीकेचा सामना करावा लागत आहे. माजी परराष्ट्र मंत्री खुर्शीद आणि शशी थरूर हे शिष्टमंडळात सामील झाल्यापासून त्यांच्याच पक्षाकडून त्यांच्यावर सतत शाब्दिक हल्ले होत आहेत. आता सोमवारी (२ जून) त्यांनी या सर्वांना कंटाळून संतप्त प्रश्न विचारला आहे. खुर्शीद यांनी टीकाकारांना विचारलं, की 'एक शिष्टमंडळ दहशतवादाविरुद्ध परदेशात जाऊन आवाज उठवत आहे. अशा शिष्टमंडळाशासाठी 'देशभक्त' होणं इतकं कठीण आहे का?'
'देशभक्त असणं आजच्या काळात इतकं कठीण आहे का' : ज्येष्ठ नेते सलमान खुर्शिद यांनी एक्सवर पोस्ट करत लिहिलं की, 'जेव्हा मी दहशतवादाविरुद्ध भारताचा संदेश जगापर्यंत पोहोचवण्याच्या मोहिमेवर असतो, तेव्हा आपल्या देशातील लोक राजकीय निष्ठेचे तपासत आहेत, हे अतिशय दुःखद आहे, देशभक्त असणं आजच्या काळात इतकं कठीण आहे का?'
खुर्शिद आणि शिष्टमंडळ सध्या मलेशियात : जम्मू आणि काश्मीरमधील कलम ३७० हटवल्याचं कौतुक केल्यानंतर काही दिवसांनी सलमान खुर्शीद यांचं हे विधान आलं आहे. ज्येष्ठ काँग्रेस नेते सलमान खुर्शीद हे जेडीयू खासदार संजय कुमार झा यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाचा भाग आहेत, जे पहलगाम दहशतवादी हल्ला आणि ऑपरेशन सिंदूरनंतर दहशतवादाविरुद्ध भारताची भूमिका स्पष्ट करण्यासाठी परदेश दौऱ्यावर आहेत. इंडोनेशिया, दक्षिण कोरिया, जपान आणि सिंगापूरला भेट दिल्यानंतर, हे शिष्टमंडळ सध्या मलेशियामध्ये आहे.
काँग्रेसने दिलेली नावे भाजपाने वगळली : सलमान खुर्शीद यांनी त्यांच्या एक्स पोस्टमध्ये स्पष्टपणे काहीही सांगितलं, नसलं तरी, त्यांचं विधान महत्त्वाचं आहे. कारण सर्वपक्षीय शिष्टमंडळासाठी त्यांच्या या नेत्यांची निवड करण्यात आल्याने काँग्रेस संतापली आहे. याबाबत पक्षाने असा दावा केला आहे, की पक्षाने ज्यांची नावे पाठवली होती, त्यांना सरकारनं शिष्टमंडळात स्थान दिलं नाही.
'राजकीय मतभेदांपेक्षा देश महत्वाचा' : दरम्यान, नंतर खुर्शीद यांनी एक्स पोस्टवर स्पष्टीकरण देताना सांगितलं, की 'राजकीय मतभेदांपेक्षा देश माझ्यासाठी प्रथम आहे. देशाच्या बाजूने बोलण्याची गरज आहे'. खुर्शीद यांनी एएनआय या वृत्तसंस्थेला सांगितलं की, 'लोक म्हणतात की, ज्या शिष्टमंडळात भाजपाचे लोक आहेत, त्या शिष्टमंडळात तुम्ही काय करत आहात? आम्ही इथे काय करत आहोत? तुम्ही कोणत्याही पक्षाचे असलात तरी, आज देशाच्या बाजूने बोलण्यासाठी एका आवाजाची गरज आहे आणि आम्ही इथे हेच करत आहोत'.
'देशभक्त असणं इतकं कठीण आहे का?' : ते पुढे म्हणाले, की जेव्हा मी म्हणतो की 'देशभक्त असणं इतकं कठीण आहे का?' तेव्हा हा प्रश्न अशा लोकांना विचारला पाहिजे, जे अशा गोष्टी पोस्ट करत आहेत आणि बोलत आहेत, जे माझ्या मते देशासाठी काहीतरी करू इच्छित असणाऱ्यांना अजिबात प्रोत्साहन देत नाहीत'. संजय झा यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळात भाजपा खासदार ब्रिज लाल, प्रदान बरुआ, अपराजिता सारंगी आणि नामांकित हेमांग जोशी यांचा समावेश आहे. याशिवाय तृणमूल काँग्रेसचे नेते अभिषेक बॅनर्जी, सीपीआयचे (मार्क्सवादी) जॉन ब्रिटास आणि काँग्रेसचे सलमान खुर्शीद आणि राजनयिक मोहन कुमार यांचा या शिष्टमंडळात समावेश आहे.
हेही वाचा -