अमृतसर -जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाल्यानंतर भारत सरकारनं घेतलेल्या कठोर निर्णयांची घोषणा परराष्ट्र मंत्रालयानं बुधवारी रात्री केली. पहलगाममधील २६ भारतीयांच्या मृत्यूनंतर अमृतसरमधील अटारी-वाघा सीमा मार्ग तत्काळ बंद करण्यात आले आहेत. देशात असलेल्या पाकिस्तानी नागरिकांना २४ तासांच्या आत भारत सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. देशाच्या सुरक्षेचा विचार करून हे कठोर निर्णय घेण्यात आले आहेत.
परराष्ट्र मंत्रालयानं पाकिस्तानातून व्हिसावर भारतात आलेल्या सर्वांना ४८ तासांच्या आत देश सोडून देण्याचे आदेश दिले आहे. त्यांचे व्हिसा तात्काळ रद्द करण्यात आले आहेत. भारतातील पाकिस्तानी दूतावासही बंद करण्यात आले आहेत. तथापि, संध्याकाळी सीमेवर होणाऱ्या रिट्रीट समारंभाबद्दल अद्याप कोणतीही घोषणा झालेली नाही.
अटारी-वाघा सीमा कुठे आहे? अटारी आणि वाघा बॉर्डर ही भारत आणि पाकिस्तानमधील आंतरराष्ट्रीय सीमा आहे. सीमेवर असलेल्या भारतीय गावाचं नाव अटारी आहे. तर सीमेवर असलेल्या पाकिस्तानी गावाचे नाव वाघा आहे. त्यावरून या सीमेला अटारी-वाघा सीमा म्हटले जाते. ही सीमा अमृतसरपासून २८ किमी अंतरावर आहे. येथील १२० एकरांवर पसरलेल्या आणि राष्ट्रीय महामार्ग-१ शी थेट जोडलेल्या या चेकपोस्टने सीमापार व्यापारात, विशेषतः अफगाणिस्तानातून होणाऱ्या आयातीत महत्त्वाची भूमिका बजावली आहे. सीमा तपासणी नाका हे एक लोकप्रिय ठिकाण आहे. या ठिकाणी दोन्ही देशांचे सैन्य मुस्लिमांच्या ईदच्या सणाच्या वेळी आणि हिंदूंच्या दिवाळीच्या सणाच्या वेळी मिठाई वाटून आनंद व्यक्त करतात.
बीटिंग रिट्रीट समारंभ असतो पर्यटकांचं आकर्षण-दरवर्षी १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारी रोजी अटारा-वाघा सीमेवर विशेष बीटिंग रिट्रीट समारंभ आयोजित केला जातो. हा सोहळा पाहण्यासाठी देश-विदेशातून लोक येतात. विशेष सीमा समारंभात सीमा सुरक्षा दलाचे (बीएसएफ) जवान त्यांचं शौर्य दाखवतात. बीटिंग रिट्रीट समारंभाची १९५९ पासून सुरुवात झाली. या समारंभात राष्ट्रगीत गायन आणि देशभक्तीच्या घोषणा दिल्या जातात. याशिवाय येथे अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांचेही आयोजन केलं जातं. बीटिंग द रिट्रीट समारंभ सुमारे २ तास चालतो. यानंतर, दोन्ही देशांच्या सीमेवरील गेट बंद केले जातात. तर सूर्यास्तापूर्वी राष्ट्रध्वज उतरवले जातात.
६० वर्षे जुना सिंधु पाणी करार स्थगित- २२ एप्रिल रोजी अनंतनाग जिल्ह्यातील पहलगामच्या सुंदर गवताळ प्रदेशात झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सुमारे २६ पर्यटक झाले. या पर्यटकांना त्यांच्या धर्मावर प्रश्नचिन्ह उपस्थित करून मारले जात असल्याच्या चर्चांमुळे लोकांमध्ये आणखी संताप निर्माण झाला आहे कारण दहशतवाद्यांनी धर्म आणि जातीची पर्वा न करता भारतीय नागरिकांची कत्तल केली आहे. पहलगाम हल्ल्याच्या मुद्द्यावर भाजपानं आज सर्वपक्षीय बैठक बोलाविली आहे. केंद्री संरक्षणमंत्री राजनाथ सिंह या बैठकीचं नेतृत्व करणार आहे. दहशतवादी हल्ल्यानंतर, बुधवारी सकाळपासूनच सैन्यदल, एनआयए, पोलीस आणि इतर सुरक्षा एजन्सी सतर्क आहेत. हल्लेखोर दहशतवाद्यांचा जम्मू काश्मीरमध्ये शोध सुरू आहे.
हेही वाचा-