वर्धा: वर्धा जिल्ह्यात (Wardha Heavy Rains) सर्वदूर पाऊस असल्याने नदी नाले तुडूंब भरून वाहत आहे. अनके भागात जोरदार पाऊस आहे. जिल्ह्यात हिंगणघाट शहरात अतिवृष्टी झाली असून जण जीवन विस्कळीत झाले आहे. सततच्या पावसाने अनेक भागात घरात पाणी घुसले आहे. तेच गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील पुलावरून पाणी वाहत असल्याने रस्ते बंद झाले आहे. यातच निम्न वर्धा (Lower Wardha Dam) प्रकल्पाचे 31 गेट खुले करण्यात आले असून पाण्याचा विसर्ग सकाळपासून सुरू करण्यात आला आहे.
जिल्ह्यात 12 तासापासून मुसळधार पाऊस सुरू असल्याने हिंगणाघाट,देवळी, वर्धा, आर्वी तालुक्यातील नदी काठावरील गावांत पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. यातच अनेक घरात पाणी शिरल्याने काहींना सुरक्षित स्थळी हलवण्याची काम प्रशासन स्तरावर करण्यात आले आहे. यशोदा नदीला पूर आल्याने सरुळ, टाकळी, आलोडा, अलमडोह, भोजनखेडा, चाणकी गावाचा जिल्ह्याशी संपर्क तुटला. वर्धा - राळेगाव मार्ग वाहतुकीसाठी बंद झाला आहे. आर्वी तालुक्यातील बाकळी नदीला पूर आल्याने वर्धमनेरी येथील पूल पाण्याखाली आल्याने आर्वी- तळेगाव मार्ग वाहतुकीसाठी बंद झाला. तसेच वर्धा समुद्रपूर मार्गे शेडगावजवळ रस्ता बंद पडला आहे.
हिंगणघाट मंडळात मागील 24 तासात 211 मीमी पावसाची नोंद झाली. महाकाली नगर मधील 50 ते 60 घरामध्ये भाकरा नाल्याचे पाणी घुसले आहे. त्यांना सुरक्षित ठिकाणी बाहेर काढले आहे. शहरातील महाकाली नगर, संत तुकडोजी वार्ड, भोईवाडा, पिली मजीद परिसरातील नागरिकांच्या घरात पुराचे पाणी शिरल्याने त्यांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. उपविभागीय अधिकारी शिल्पा सोनाले, तहसीलदार सतीश मासाळ आणि पोलीस अधिकारी यांच्या मदतीने नागरिकांना स्थानातरीत करण्यात आले.
सेलू तालुक्यात सिंदी ते दिग्रज येथील पुलावरून पाणी वाहत असल्याने, दिग्रज गावाचा वाहतूक संपर्क तुटलेला आहे. तसेच सिंदी ते पळसगावबाई येथील वाहतूक संपर्क बंद झाला. तसेच दहेगाव ते पहेलानपुर वाहतूक संपर्क बंद झाला आहे. बोरखेडी कला लगत असलेल्या नाल्याला पूर आला असुन रोड वरून अंदाजे 3 ते 4 फूट पाणी आहे. त्यामुळे ये जा बंद करण्यात आली आहे. पिंपळगाव येथे बोर नदीला आलेल्या पूराने गावापर्यंत पाणी शिरले. तुर्त कोणताही धोका नाही. परंतु सर्वत्र पाऊस होत असल्याने नदी व नाले तुडूंब भरुन वाहत आहे. चिंचोली लगत असलेल्या नाल्याला पूर आला असुन पुलावरून पाणी वाहत आहे. त्यामुळे वाहतूक संपर्क बंद झाला आहे.
धनोडी येथील निम्न वर्धा प्रकल्पाचे (Lower Wardha Dam) सर्व ३१ दरवाजे सकाळी ६.१५ वाजतापासून १०० सेंमीने उघडण्यात आले आहे. प्रकल्पाच्या लाभक्षेत्रात मोठ्या प्रमाणात पर्जन्यमान सुरु आहे. त्यामुळे सद्यस्थितीत प्रकल्पातून १६२५.१३ घन.मी.से. पाणी विसर्ग वर्धा नदी पात्रात सोडायला सुरवात झाली आहे. यात पावसाच्या पुढील अंदाजानुसार आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. नदी पात्राच्या दोन्ही काठावरील गावांना सतर्कतेचा ईशारा देण्यात आला आहे.