वर्धा - काँग्रेसच्या जनजागरण यात्रेदरम्यान (Janjagran yatra) वर्धा जिल्ह्यात भाजपाला जबर धक्का बसला आहे. भाजपाचे जिल्हाध्यक्ष डॉ. शिरीष गोडे (shirish gode) यांनी कमळ सोडून काँग्रेसचा हात धरला आहे. करंजी येथे काँग्रेसच्या प्रभातफेरीनंतर सकाळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर शिरीष गोडे यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. डॉक्टर गोडे यांनी भाजपाला सोडचिठ्ठी देताच राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ निर्माण झाली.
राजकीय कौटुंबिक पार्श्वभूमी असलेल्या डॉ. शिरीष गोडे यांनी 2008 मध्ये भाजपात प्रवेश केला. त्यावेळी तत्कालीन प्रदेश अध्यक्ष नितीन गडकरी (Nitin gadkari) यांच्या नेतृत्वाखाली भाजपात प्रवेश केला होता. मागील काही दिवसापासून डॉ. शिरीष गोडे हे भाजपच्या कार्यप्रणालीवरून अस्वस्थ होते. काही दिवसांपूर्वी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचाकडे राजीनामाही पाठवला होता. त्यानंतर भाजपकडून मनधरणीचा प्रयत्न केला जात होता. काही आश्वासन मिळाल्यानतर डॉ. शिरीष गोडे यांनी वेट अँड वॉच भूमीका घेतली होती. पण दिलेले आश्वासन भाजपकडून पूर्ण होणार नाही हे दिसताच त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली. अखेर आज डॉ. शिरीष गोडे यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. काँग्रेसचे महासचिव केसी वेणूगोपाल, महाराष्ट्र प्रभारी एच के पाटील, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, पालकमंत्री सुनील केदार, आमदार रणजित कांबळे, जिल्हाध्यक्ष मनोज चांदूरकर यांच्या उपस्थितीत त्यांनी प्रवेश केला.
भाजपा मनधरणी करण्यात ठरले अपयशी -
डॉ. शिरीष गोडे दोनवेळा जिल्हाध्यक्ष पदावर विराजमान राहिले आहे. भाजपचे ध्येयधोरण, शेतकरी कायदे अशा अन्यही काही कारणांमुळे ते नाराज होते. तसेच पक्षात जुन्या लोकांना मान सन्मान दिला जात नसून तो भाजपचा जुना पक्ष राहिला नाही. सहा महिन्यापासून व्यथित होतो. वरिष्ठांना माहिती दिली पण कारवाई केली नाही. जनतेविरोधी, शेतकरी विरोधी धोरण राबवली जात आहे. शेतकरी विरोधी भूमिका घेतली त्याला कंटाळून राजीनामा दिल्याचेही डॉ. शिरीष गोडे यांनी सांगितले.
कुठली जबाबदारी मिळणार? -
भाजपा पक्ष सोडताच बहुजन समाज आणि संविधानाची चेष्टा करण्याचे पाप भाजपने केल्याचा घणाघातही त्यांनी केला. पण आता काँग्रेसमध्ये सर्वसामान्य, शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यात यशस्वी होऊ, असा विश्वास आहे. डॉ. गोडे यांना योग्य जबाबदारी देणार असल्याचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले आहे. त्यामुळे त्यांचा खांद्यावर भाजपच्या जिल्हाध्यक्ष सोडून आल्याने नेमकी जवाबदारी कोणती देणार आणि पक्षात कश्या पद्धतीने सन्मान होईल याकडेही लक्ष लागले आहे.
डॉ. शिरीष गोडे यांचे वडील कै. संतोषराव गोडे हे काँग्रेसचे जेष्ठ नेते होते. ते जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष यासह काँग्रेसचे खासदार सुद्धा राहिले आहे. मोठा काळ काँग्रेसमध्ये त्याच्या कुटुंबियांच राहिला. डॉ. शिरीष गोडे हे स्वतः सुरवातीच्या काळात काँग्रेसमध्ये राहिले. त्यानंतर त्यांनी बीएसपीकडून आमदारकीचा निवडणूक लढवली. त्या पराभवानंतर त्यांनी 2008 मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला.