Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan : अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची तयारी अंतिम टप्प्यात

author img

By

Published : Jan 20, 2023, 4:01 PM IST

Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे वर्धा येथे आयोजन करण्यात येणार आहे. या आयोजनाची तयारी अंतिम टप्प्यात आली असून संमेलनस्थळी सुरु असलेल्या मंडप व ग्रंथ दालने उभारणीची कामे सुरू आहेत. संमेलनाच्या आयोजनातील तयारीसाठी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्यासोबत आयोजन समिती व विदर्भ साहित्य संघाच्या पदाधिकाऱ्यांच्या नियमित आढावा बैठका घेतल्या जात आहेत.

वर्धा : 96 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे दिनांक 3 ते 5 फेब्रुवारी दरम्यान वर्धा येथे आयोजन करण्यात आले आहे. संमेलनाच्या आयोजनातील तयारीला वेग आला असून स्वावलंबी विद्यालयाच्या 23 एकरातील मोकळ्या मैदानात मंडप व विविध दालनांच्या उभारणीचे काम जोरात सुरु आहे. विविध 42 समित्यांच्या माध्यमातून हजारो स्वयंसेवक संमेलनाच्या यशस्वीतेसाठी दिवस रात्र कार्य करत आहेत.

विविध स्तरातील स्वयंसेवकांची मदत : वर्धा शहरातील स्वावलंबी विद्यालयाच्या मैदानावरच यापूर्वीचे साहित्य संमेलन पार पडले होते. त्याच मैदानात अनेक वर्षानंतर संमेलन होत आहे. त्यामुळे वर्धा शहरातील साहित्य, सांस्कृतिक, कला, सामाजिक, शिक्षण, आरोग्य तसेच शासकीय यंत्रणेसह विविध क्षेत्रातील हजारो स्वयंसेवक संमेलनाच्या यशस्वीतेसाठी पुढे सरसावले आहे. निवास, भोजन, मंडप, वाहतूक तसेच रंगमंच अशा विविध समित्यांच्या बैठका सध्या संमेलन आयोजन समितीच्या हंगामी कार्यालयात नियमितपणे पार पडत आहे.



जिल्हाधिकाऱ्यांकडून आढावा : वर्धा येथे आयोजित संमेलन यशस्वीपणे पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासन सक्रीय सहभाग देत आहे. आयोजनाच्या तयारीसाठी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्यासोबत आयोजन समिती व विदर्भ साहित्य संघाच्या पदाधिकाऱ्यांच्या नियमित आढावा बैठका घेतल्या जात आहे. संमेलनस्थळी सुरु असलेल्या मंडप व ग्रंथ दालने उभारणीची जिल्हाधिकाऱ्यांनी पाहणी केली.


42 समित्यांचा समावेश : संमेलनाच्या यशस्वीतेसाठी सुक्ष्म नियोजन होणे आवश्यक आहे. त्यासाठी वेगवेगळ्या क्षेत्रातील तज्ञ मान्यवरांचा समावेश असलेल्या 42 समित्या स्थापन करण्यात आल्या आहे. त्यात निवास, भोजन, मंडप, वाहतूक, रंगमंच व सभागृह सजावट, सांस्कृतिक, पुस्तक प्रकाशन, ग्रंथ दालने, ग्रंथ दिंडी ईथपासून तर रांगोळी, प्रतिनिधी नोंदणी, स्वागत, सत्कार, वैद्यकीय मदत अशा समित्यांचा समावेश आहे. प्रत्येक समितीत त्या त्या क्षेत्रातील तज्ञांचा समावेश आहे.


ग्रंथ प्रदर्शन व विक्रीची 300 दालने : संमेलनस्थळी ग्रंथ प्रदर्शन व विक्रीची मुख्य मंडपापासून काही अंतरावर स्वतंत्र दालने करण्यात आली आहे. येथे होणाऱ्या गर्दीचा अंदाज घेऊन दालनांमध्ये समोरासमोर पुरेसी मोकळी जागा ठेवण्यात आली आहे. एकून 300 दालनांपैकी 280 दालने ही राज्य व राज्याबाहेरून येणाऱ्या प्रकाशकांसाठी राखीव आहेत तर 20 दालनांमध्ये विविध शासकीय विभागांचे स्टॅाल राहणार आहे.


प्रशस्त पाच सभामंडप : संमेलनानिमित्त आयोजित विविध कार्यक्रमांसाठी मैदानात वेगवेगळ्या आकाराचे एकून 5 सभामंडप उभारले जात आहे. त्यात मुख्य सभामंडप 160 बाय 350 फुटाचा आहे. दुसरा सभामंडप 80 बाय 120 फुटाचा उभारला जात आहे. प्रत्येकी 80 बाय 60 फुटाचे 3 अन्य सभामंडप राहणार आहे. मुख्य सभामंडपात 7 हजार 500 खुर्च्या राहतील तर अन्य मंडपात रसिकांना बसण्यासाठी 2 हजार खुर्च्या ठेवल्या जाणार आहे.


350 निमंत्रित वक्ते व साहित्यिक : संमेलनात तीन दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमांमध्ये पाहुणे, वक्ते, सहभागी म्हणून 350 नामवंत साहित्यिक, विचारवंत, लेखकांना निमंत्रित करण्यात आले आहे. या निमंत्रितांची निवास व भोजन व्यवस्था आयोजकांच्यावतीने विनामुल्य केली जाणार आहे.

तब्बल 2 हजार प्रतिनिधी : राज्य व राज्याबाहेरील साधारणपणे 2 हजार साहित्यिक, कवी, विचारवंत तसेच साहित्य रसिक प्रतिनिधी म्हणून उपस्थित राहण्याचा अंदाज आहे. या प्रतिनिधींना दि.3 फेब्रुवारीच्या सकाळपासून दि.5 फेब्रुवारीच्या रात्रीपर्यंत चहा, नास्ता, भोजन व राहण्याची व्यवस्था उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्यासाठी 4 हजार इतके प्रतिनिधी शुल्क आकारण्यात येत आहे. प्रतिनिधी नोंदणीसाठी संमेलनाचे कार्याध्यक्ष प्रदीप दाते 9422144817, मुख्य कार्यवाह विलास मानेकर 9422104252 व निमंत्रक डॅा.रविंद्र शोभणे 9822230743 यांच्याशी संपर्क साधता येईल.

500 खोल्या राखीव : संमेलनानिमित्त येणारे निमंत्रित व प्रतिनिधींची राहण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. या प्रतिनिधींसाठी वर्धा शहर व परिसरात विविध ठिकाणी 500 खोल्या आयोजकांच्यावतीने राखीव करण्यात आल्या आहे. त्यात सेवाग्राम येथील यात्री निवास, हिंदी विश्वविद्यालय, राष्ट्रभाषा प्रचार समिती, स्वाध्याय मंदिर, एमगिरी, बापुराव देशमुख अभियांत्रिकी महाविद्यालय, बच्छराज भवनसह शहरातील इतर खाजगी बहुतांश हॅाटेल्समधील खोल्यांचा समावेश आहे. निमंत्रित व प्रतिनिधींना या ठिकाणाहून संमेलनस्थळी ने-आण करण्यासाठी ठराविक वेळेत वाहने राहणार आहे.

5 हजार लोकांची भोजन व्यवस्था : संमेलनासाठी येणारे निमंत्रित, प्रतिनिधी, आयोजनातील कार्यकर्ते व शुल्क भरून भोजन व्यवस्थेचा लाभ घेऊ ईच्छिणाऱ्यांसाठी आयोजकांच्यावतीने दररोज 5 हजार व्यक्तींचे भोजन तयार केले जाणार आहे. या व्यवस्थेसाठी स्वतंत्र भोजन समिती गठीत करण्यात आली आहे.


100 पुस्तकांच्या प्रकाशनाचा अंदाज : प्रत्येक साहित्य संमेलनात मोठ्या प्रमाणावर पुस्तकांचे प्रकाशन होत असते. वर्धा येथील या संमेलनात तीन दिवसात 100 पेक्षा अधिक पुस्तके प्रकाशित होतील, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. पुस्तक प्रकाशनासाठी 80 बाय 60 फुटाचा स्वतंत्र मंडप उभारण्यात आला आहे. वेगवेगळ्या मान्यवरांच्याहस्ते या मंडपात पुर्णवेळ केवळ पुस्तकांचे प्रकाशन होईल.

1 लाख साहित्य रसिक देणार भेट : संमेलनात वर्धा व परिसरातील जिल्हे तसेच राज्य व राज्यबाहेरून अनेक साहित्य रसिक येणार आहे. तिनही दिवस मोठ्या प्रमाणावर गर्दी राहणार आहे. जवळपास 1 लाख साहित्य रसिक येतील, असा अंदाज आयोजकांनी व्यक्त केला.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.