ठाणे - देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व खासदारांना गाव दत्तक ( Sansad Adarsh Gram Yojana ) घेण्याचे आवाहन केले होते. या गावांमध्ये पायाभूत सुविधा देण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यासाठी पाठबळही दिले होते. अशातच ठाण्याचे खासदार राजन विचारे ( Thane MP Rajan Vichare ) यांनी डायघर भागातील पिंपरी हे गाव दत्तक ( Pimpri village adopted ) घेतले होते. या गावाचा आढावा घेतला असता या गावात पायाभूत सेवांचा अभाव ( Lack of basic services in Pimpri ) असल्याचे दिसून आले आहे. विविध समस्याही या गावात भेडसावत असल्याचे गावकरी सांगतात.
गावकऱ्यांना मुलभूत सुविधांची अपेक्षा : खासदार राजन विचारे यांनी दत्तक घेतलेले पिंपरी हे गाव स्वतःची एक अनोखी बाब सांगत आहे. 1961 साली कोयना धरण बांधत असताना विस्थापित झालेल्या सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यातील पिंपरी हे गाव पुनर्वसन करून राज्य सरकारने ठाणे जिल्ह्यात बसवले. हे वसवताना त्यांना अनेक आश्वासने दिली होती. या आश्वासनाची पूर्तता आजही झालेली नाही, असे ग्रामस्थ सांगतात. 60 वर्षानंतर देखील पिंपरी या गावात नागरिकांना सुविधा मिळण्यासाठी वणवण फिरावे लागत आहे. आजही मंत्रालयाचे फेरे मारावे लागत आहेत. सरकारी नोकरीचा आवेश हवेत विरले. त्यासोबत मोफत वीज मिळालेच नाही आणि पायाभूत सुविधा आजही उपलब्ध नाही, अशा परिस्थितीत या गावातील 3500 हजार लोकसंख्या सुविधांच्या प्रतीक्षेत आहेत.
अशी आहे खासदार आदर्श ग्राम योजना : पंतप्रधान मोदींनी १५ ऑगस्ट २०१४ रोजी केलेल्या भाषणात सांसद आदर्श ग्राम योजनेचा उल्लेख केला होता. या योजनेनुसार प्रत्येक सांसदाने (खासदाराने) आपाआपल्या क्षेत्रात एक गाव दत्तक घेऊन ते २०१६ सालापर्यंत आदर्श करून दाखवयाचे आहे. शिवाय त्याने २०१९सालापर्यंत दोन गावे आदर्श केली असावीत, अशी अपेक्षा केली होती. या योजनेसाठी जनभागीदारी आवश्यक आहे. सांसद आदर्श ग्राम योजना तीन टप्प्यात राबवली जाणार असून, अल्पकाळातील कामे तीन महिन्यात पूर्ण करावी लागणार आहेत. यामध्ये गावची स्वच्छता, अंगणवाडीत मुलांचा प्रवेश, गावात झाडे लावणे आणि आरोग्य सुविधा पुरवणे या सारखे कामे करावी लागणार आहेत. तर मध्यम मुदतीची कामे एक वर्षात आणि दीर्घ मुदतीची कामे वर्षापेक्षा अधिक काळता पूर्ण करावी लागणार आहेत. विशेष बाब म्हणजे गावाचा वाढदिवसही साजरा करण्यात येतो. त्यादिवशी गावाबाहेरील व्यक्तिंना बोलवून त्यांचा सन्मान करणे, ज्येष्ठ नागरिक, सैनिक, शहिदांच्या कुटुंबियांचा सन्मान करण्याची जबाबदारीही गाव दत्तक घेणाऱ्या खासदाराचीच असणार आहे.
पाणी आणि रस्त्यांसाठी देखील प्रतीक्षाच : या गावात गेल्यावर नागरिकांना घरांपर्यंत पोहोचण्यासाठी व्यवस्थित रस्ते नाहीत. पिण्यासाठी पाणी नाही, अशावेळी गावातील विहिरी आणि बोरवेल यांच्यामुळे उपलब्ध झालेल्या पाण्यावरच संपूर्ण गाव अवलंबून आहे. या गावाचा आता नवी मुंबई महानगर पालिकेत समावेश होणार आहे. आता तरी या सुविधा मिळतील, अशी अपेक्षा नागरिकांनी वक्त केली आहे.
'खासदार गावात आलेच नाही' : खासदार राजन विचारे यांनी दत्तक घेतलेल्या या गावातील नागरिकांनी राजन विचारे यांनी गाव दत्तक घेतल्यापासून गावात आलेच नाही, असा आरोप केला आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हेतू सफल झाला नसल्याचे गावकरी सांगत आहेत.