ठाणे - समाजात होत असलेल्या लहान मुलींसह महिलांवरील अत्याचाराविषयी चिंता व्यक्त करत, हे अत्याचार थांबवण्याची जबाबदारी केवळ पोलिसांची नसून समाजाचीही आहे. त्यासाठी सदाचारी व सुसंस्कार शिक्षणाची गरज आहे. असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी शहापूर तालुक्यातील एका शाळेच्या पायाभरणी कार्यक्रमात केले.
राज्यपाल म्हणाले, की यापूर्वी फक्त नोकरीसाठी शिक्षण घेतले जात होते. परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नव्या शैक्षणिक धोरणानुसार सर्वांसाठी शिक्षणाचे द्वार खुले होणार असल्याने शिक्षणाला वयाची मर्यादा नसते याची प्रचिती येणार आहे.
आयोजकांचे टोचत कान -
वनवासी डोंगर खोऱ्यात राहणाऱ्या समाजाने व्यापलेल्या शहापूर तालुक्यातील किन्हवली येथील विद्या प्रसारक मंडळ संचालित विधी महाविद्यालयाचे उदघाटन व एम ए, एम कॉम, एम एस्सी या पदव्युत्तर शिक्षण देणाऱ्या महाविद्यालयाच्या इमारतींचा पायाभरणी सोहळा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते संपन्न झाला. या कार्यक्रमाला केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटील, उच्च व तंत्रशिक्षण उदय सामंत, संस्थाध्यक्ष अरविंद भानुशाली आदि उपस्थित होते. विशेष म्हणजे कार्यक्रमाला महिलांची उपस्थिती नगण्य असल्याबाबत आयोजकांचे कान टोचत महिलांना सामाजिक शैक्षणिक कार्यात ठेवून सोबत घेऊन काम करण्याची गरज व्यक्त केली. तर शिक्षण क्षेत्रात राजकारण विरहित सर्वांनीच काम केले पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले.
हे ही वाचा - 'ज्यांना पतंग उडवायची, त्यांनी उडवावी'! अखेर संजय राऊतांनी चर्चेला दिला पूर्णविराम
ठाकरे सरकारचा उल्लेख न करता उपहासात्मक टीका -
राज्यपाल यांनी आपल्या राजकीय आयुष्यातील घडलेली एक आठवण व्यक्त केली. ते स्वतः आमदार असताना एक रस्ता बनवित होते त्यास कार्यकर्त्यांनी या रस्त्याचा उपयोग काँग्रेसवाले करतील म्हणून तक्रार केली होती. मात्र रस्ता सर्वांसाठी असतो त्यावरून काँग्रेसवाले गेले तर जाऊं देत, याच रस्त्यावरून भाजप वाले, शिवसेना वाले, आघाडी बिघाडी वाले गेले तरी हरकत नसावी, असे वक्तव्य करून राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आघाडी सरकारचा उल्लेख न करता उपहासात्मक टीका केली आहे