नारायण राणेंनी उगाच फुशारक्या मारू नये - खासदार विनायक राऊत

author img

By

Published : Sep 8, 2021, 6:53 PM IST

shiv sena mp vinayak raut criticized narayan rane over chipi airport inauguration date

चिपी विमानतळाच्या उद्घाटन तारखेवरून नारायण राणे आणि शिवसेना खासदार विनायक राऊत यांच्यात कलगीतुरा रंगला आहे. राणेंनी उद्घाटनाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची उपस्थिती गरजेची नसल्याचे सांगितलं होतं. त्यावरून विनायक राऊत यांनी राणेंवर टीका केली आहे.

सिंधुदुर्ग - केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यातील चर्चेनुसार चिपी विमानतळाच्या उद्धाटनाची तारीख ठरली आहे. त्यामुळे नारायण राणेंच्या फुशारक्यांना किंमत नाही. त्यांनी उगाच फुशारक्या मारू नये, अशी टीका शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी सिंधुदुर्गात माध्यमांशी बोलताना केली आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी चिपी विमानतळाची तारीख जाहीर केली होती. त्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या उद्घाटनासाठी हवेतच असं काही नाही, असेही म्हटलं होतं. त्यावरून विनायक राऊत यांनी राणेंवर टीका केली आहे.

एअरपोर्टवरून नियमितपणे हवाई वाहतूक करण्याचं निश्चित झालं
चिपी विमानतळ व्हावं म्हणून मी चार वेगवेगळ्या बैठका घेतल्या. केंद्रीय मंत्री गजपती राजू, कॅप्टन पुरी त्या आधी सुरेश प्रभू आणि ज्योतिरादित्य शिंदे अशा चार हवाई वाहतूक मंत्र्यांसोबत बैठका घेतल्या. गेल्या सहा वर्षांपासून एव्हिएशन कमिटीत हा मुद्दा लावून धरला होता. या सर्व प्रयत्नांना अखेर यश आले. या एअरपोर्टवरून नियमितपणे हवाई वाहतूक करण्याचे निश्चित झाले. कालच उद्धव ठाकरे यांनी ज्योतिरादित्य शिंदेंसोबत सकाळी 11 वाजता चर्चा केली आणि काल उद्घाटनाचा दिवस ठरला. दोघांनी चर्चा करून दिवस ठरवला, असेही विनायक राऊत म्हणाले.

खासदार विनायक राऊत बोलताना...
मी स्वतः ज्योतिरादित्य शिंदेंशी बोललो
माझे ज्योतिरादित्य यांच्याशी बोलणं झाले. ते माझ्याशी मराठीतच बोलतात. मला ते म्हणाले, विनायकभाऊ, मी स्वत: येणार आहे. मुख्यमंत्र्यांसोबत येणार आहे. तिथून नवी मुंबईत जाणार आहे, असे ज्योतिरादित्य यांनी सांगितलं. काल ज्योतिरादित्य शिंदे यांच्याशी बोलणं झाल्यावर मुख्यमंत्र्यांनी मला 12 वाजता फोन करून सांगितलं की, आम्ही 9 तारीख फिक्स केली. मी त्यांना सांगितलं तुमच्या सोयीनुसार तारीख ठरवा, अशी माहितीही त्यांनी दिली.
एअरपोर्ट महाराष्ट्र सरकारच्या मालकीचा
काही अज्ञान माणसाला कळत नाही. त्यांना इंग्रजी समजत नाही. त्यामुळे मी तुम्हाला सांगितलं. हा एअरपोर्ट एमएमआयडीसीचा आहे. पीपीपी मॉडेलवरील आहे. तो महाराष्ट्र सरकारचाच आहे. केंद्राने केवळ लायसन्स दिलं आहे. हा प्रकल्प पूर्णपणे महाराष्ट्राचाच आहे. आता जे बडेजाव मारतात फुशारकी मारतात ते म्हणतात मुख्यमंत्र्यांना बोलवण्याची गरज नाही. यांना आधी प्रोटोकॉल कळतो का? मुख्यमंत्री राहिलेला माणूस आणि केंद्रात मंत्री आहे. यांना समजत नाही महाराष्ट्र सरकारच्या मालकीचा एअरपोर्ट आहे, तिथे मुख्यमंत्र्यांच्याच उपस्थितीत कार्यक्रम होणार, असेही विनायक राऊत म्हणाले.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.