Goa Election : निवडणुका ठरलेल्या वेळेतच - मुख्यमंत्री

author img

By

Published : Aug 12, 2021, 4:20 PM IST

goa

गोवा विधानसभा निवडणूक मुदतीपूर्वी घेतली जाणार नाही. निवडणूक फेब्रुवारी 2022 नंतरच घेतली जाणार आहे, असा पुनरुच्चार मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केला. दरम्यान, भाजपने निवडणुकीच्या कार्याला सुरुवात केल्याचे दिसत आहे. तर निवडणुका उशिरा घेतल्यास त्याचा फायदा भाजपलाच होणार असल्याचे बोलले जात आहे.

पणजी - गोव्यात भाजपने प्रत्येक मतदारसंघात आपली ताकद वाढवण्यास सुरुवात केली आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे यांच्यासह पक्षाच्या नेत्यानी राज्यातील विविध मतदारसंघाचे दौरे करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे राज्यात मुदतपूर्व निवडणुका होणार का? असा प्रश्न एका बाजूने उपस्थित केला जात आहे. मात्र, गोवा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी यास साफ नकार देत निवडणुका फेब्रुवारी 2022 नंतरच होणार असल्याचे सांगितले आहे.

'राज्यात खाण महामंडळ सुरू करणार

'राज्यातील खाणी सुरू करण्यासाठी सरकारने खाण महामंडळ सुरू करण्याचे ठरवले आहे. तशी प्रक्रियाही सुरू करण्यात आली आहे. तसा प्रस्तावही नुकत्याच झालेल्या पावसाळी अधिवेशनात मांडण्यात आला होता. या प्रस्तावाला राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांनी मान्यता देताच पुढील कार्यवाही सुरू केली जाणार आहे', असे मुख्यमंत्री सावंत यांनी म्हटले आहे.

निवडणुका उशिरा झाल्यास भाजपला फायद्याचेच?
सध्या राज्यात भाजप सरकार राबवत असलेले अनेक महत्वाकांक्षी प्रकल्प पूर्णत्वाच्या दिशेने आहेत. यात मुंबई गोवा महामार्गाचे चौपदरीकरण, झुआरी नदीवरील नवा सागरी सेतू, तसेच मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळाचे कामही जोरात सुरू आहे. निवडणुकीपूर्वी मुंबई गोवा महामार्ग तसेच झुआरी सागरी सेतू प्राधान्याने पूर्णत्वास नेण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. त्यासाठी सरकारने दोन्ही कंत्राटदारांना डिसेंबर 2021 ची मुदत दिली आहे. त्यामुळे दोन्ही प्रकल्पांचे सध्या भर पावसातदेखील काम सुरू आहे. हे दोन्ही प्रकल्प येत्या निवडणुकीत भाजपची जमेची बाजू ठरणार आहे.

अटल सेतू पुढचे 100 दिवस वाहतुकीसाठी बंद

मांडवी नदीवरील तिसरा पूल म्हणजेच अटल सेतू. या सेतूमुळे राज्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला होता. दिवंगत मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे स्वप्न असलेला अटल सेतू त्यांच्या कारकिर्दीत पूर्ण झाला. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते उद्घाटनही झाले. मात्र अवघ्या तीन वर्षांत या सेतुवर भले मोठे खड्डे पडले. त्यामुळे दुरुस्तीसाठी मेरशी जंकशन ते पर्वरीपर्यंतची मार्गिका वाहतुकीसाठी पुढील 100 दिवस बंद ठेवण्यात आली आहे. या काळात हॉट मिक्सिंग पध्दतीने रस्ता बनवण्याचे काम करण्यात येणार आहे.

येथे क्लिक करा आणि वाचा गोव्यासंबंधीच्या इतर बातम्या

हेही वाचा - Pornography Case: अभिनेत्री गहना वशिष्ठला दिलासा नाही, अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.