Prithviraj Chavan : राज्यातील राजकीय परिस्थिती अस्थिर; माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे मोठे वक्तव्य

author img

By

Published : Apr 27, 2023, 6:10 PM IST

Prithviraj Chavan

कराड बाजार समिती निवडणुकीच्या प्रचार सभेत बोलताना राज्यातील राजकीय परिस्थिती सध्या अस्थिर असल्याचे वक्तव्य माजी मुख्यमंत्री तथा कराड दक्षिणचे आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी केले आहे.

सातारा : राज्यातील राजकीय परिस्थिती सध्या अस्थिर असल्याचे मोठे वक्तव्य माजी मुख्यमंत्री तथा कराड दक्षिणचे आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी केले आहे. कराड बाजार समितीच्या निणडणूक प्रचार सभेत ते बोलत होते. कराड बाजार समितीच्या निवडणुकीसाठी झालेली भाजप-राष्ट्रवादीची युती ही दुष्ट आणि अभद्र युती असल्याचा जोरदार हल्लाबोलही त्यांनी केला.

विलासकाकांच्या पश्चात पहिली निवडणूक : पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, यशवंतराव चव्हाण यांच्या संकल्पनेतून कराडची बाजार समिती स्वातंत्र्यापूर्वी निर्माण झाली. स्वातंत्र्य सैनिक शामराव पाटील हे पहिल्यांदा सभापती झाले. त्यानंतर विलासकाकांनी बाजार समितीच्या प्रगतीसाठी घाम गाळला. कराडसारख्या मोठ्या शहरात मोठी जागा मिळवत फळ, भाजीपाला मार्केट, बैल बाजार, मसूर, उंब्रज येथे उप आवार या सुविधा त्यांनी निर्माण केल्या. बाजार समितीकडे आज दहा कोटी रुपयांचा नफा आहे. विलासकाकांच्या पश्चात पहिली निवडणूक होत आहे.

विरोधकांनी संस्था बळकावल्या : भाजपचे प्रदेश सरचिटणीस अतुल भोसले, राष्ट्रवादीचे आमदार बाळासाहेब पाटील यांच्यावर घणाघाती टीका करताना पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, कराड तालुक्यातील विशिष्ट लोकांनी आयुष्यभर केवळ संस्था बळकावल्या. त्यातून त्यांनी स्वतःचे आर्थिक विश्व उभे केले. अशा लोकांच्या हातात कराडची बाजार समिती द्यायची का? विरोधकांनी दुष्ट, अभद्र युती करून बाजार समितीला गिळंकृत करण्यासाठी आखलेला डाव मतदारांनी उधळून लावण्याचे आवाहन त्यांनी केले.

विलासकाकांनी निस्पृहपणे संस्था उभारल्या : सहकारातील संस्था विलासकाकांनी निस्पृहपणे उभ्या केल्याचे पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले. काकांनी घडवलेले कार्यकर्ते आयुष्यभर त्यांना विसरणार नाहीत. बाजार समितीच्या निवडणुकीत विलासकाकांचे इमान राखण्याची वेळ आली आहे. मतदारांनी लोकनेते विलासराव पाटील (काका) पॅनेलच्या सर्वसामान्य उमेदवारांना मतदान करण्याचे आवाहन त्यांनी केले.

प्रस्थापित आणि सरंजामदारांची युती : विलासकाकांनी अनेक वर्षांपासून सर्वसामान्यांना सत्तेमध्ये स्थान दिले. अनेक वर्षे संघर्ष केला. तो संघर्षाचा वारसा घेवून मी पुढे चाललो असल्याचे उदयसिंह पाटील म्हणाले. प्रस्थापितांना सत्तेसाठी आणि काहींना आमदारकीसाठी बाजार समितीची सत्ता हवी आहे. त्यासाठी प्रस्थापित आणि सरंजामदार निवडणुकीत एकत्र आले असल्याचा आरोप उदयसिंह पाटील यांनी केला.

हेही वाचा - Thane Crime : गर्भवती महिलेच्या पोटात लाथ मारल्याने गर्भातील अर्भकाचा मृत्यू

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.