सांगली : देशातील बीबीसीच्या कार्यालयांवर इन्कम टॅक्स डिपार्टमेंटकडून टाकण्यात आलेल्या धाडीवरून राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. आमच्या विरोधात कोणतीच बातमी देऊ नये अशी मानसिकता काही लोकांची झाली आहे. अशी टीका करत बीबीसीच्या वरील धाडीचे आंतरराष्ट्रीय स्तरावर पडसाद उमटतील असे मत जयंत पाटील यांनी व्यक्त केले आहे. ते सांगलीच्या इस्लामपूर या ठिकाणी बोलत होते.
धाड पडण्याची पहिलीच घटना: आंतरराष्ट्रीय वृत्तसमूहाच्या बीबीसीच्या भारतातील दिल्ली आणि मुंबई येथील कार्यालयांवर इन्कम टॅक्स डिपार्टमेंट कडून मंगळवारी धाडी टाकण्यात आल्या आहेत. यावरून केंद्र सरकारवर विरोधकांच्याकडून जोरदार टीका करण्यात येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही केंद्राच्या कार्यपद्धतीवर टीका केली आहे. याबाबत जयंत पाटील म्हणाले की, स्वतंत्र भारतात वृत्तवाहिनी आणि विशेषत आंतरराष्ट्रीय वृत्तवाहिनीवर धाड पडण्याची पहिलीच घटना असावी. तसेच आमच्या विरोधात कोणतीच बातमी देऊ नये, अशी मानसिकता आता काही लोकांची झालेली दिसते. याचे आंतरराष्ट्रीय पडसाद उमटतील.
बीबीसीचे रिप्युटेशन फार मोठे: देशात व्यक्ती स्वातंत्र्य आणि व्यक्त होण्याचे स्वातंत्र्य या दोन्ही गोष्टींची गळचेपी होते. हे पुन्हा एकदा जगाला कळेल, विशेषता इंग्लंड हा देश लोकशाही प्रधान देश आहे. लोकशाही मानणारा आहे. अमेरिका असेल किंवा युरोप खंड असेल आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या देशात बीबीसीचे रिप्युटेशन फार मोठे आहे. त्यामुळे बीबीसीवर धाड घालणे हे फार शॉकिंग आहे. आंतरराष्ट्रीय समुदायाला देखील शॉकींग आहे. त्याच्यामुळे भारताच्या प्रतिमेबद्दल माणसं वेगळा विचार करायला लागतील आणि देशात बातम्या दाखवत असताना कशी बंधन आहेत. त्याचे आणखी एक उदाहरण लोकांच्या समोर येते का ? असा त्याचा अर्थ आहे, असे मत ही राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केले आहे.
राजकारणातील चित्र दुरुस्त झाले पाहिजे: तसेच राजकारणातील घसरत चाललेल्या पातळी बाबत ते म्हणाले की, व्यक्ती देशाच्या राजकारण फार मोठ्या प्रमाणात सुरू झाले आहे. विरोध करेल त्याच्यावर अनेक अपत्य आणली जात आहे, असे चित्र भारतात उभे राहिले जात आहे. असे पूर्वी नव्हते बरेच मैत्रीचे चांगले संबंध असायचे, विरोधात टीका केली तरी दहा मिनिटात एकमेकांच्या गळ्यात गळा घालून फिरणारे विरोधक देखील महाराष्ट्रात आपण 25 ते 30 वर्षात पाहिले आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील राजकारणातील चित्र दुरुस्त झाले पाहिजे.