सांगली: कोरोना काळात सगळचं ऑनलाईन झालं. तरूणाई मोबाईलमध्ये आणि गृहिणी टीव्हीवरील मालिकेत गुरफटून गेल्या. आता कोरोना काळा संपलाय. पण मुलांना लागलेले मोबाईलचे आणि गृहिणींचे मालिकांचे वेड वाढले आहे. सांगली जिल्ह्यातील कडेगाव तालुक्यातील मोहिते वडगाव गावात देखील हीच परिस्थिती होती. याचा परिणाम गावातील जिल्हा परिषद शाळेच्या पटसंख्येवर झाला होता. गावच्या सरपंचांच्या लक्षात ही बाब आली, आणि सुरू झाला सामाजिक परिवर्तनाचा अनोखा अध्याय.
साधारणपणे 3 हजार 105 लोकसंख्येचं मोहिते वडगाव आहे. सधन गाव असणाऱ्या येथील प्रत्येकाला ताकारी योजनेमुळे पाणी आल्याने ऊसाचा पैसा चांगला येऊ लागला. यातून अनेक पालकांनी आपल्या पाल्यांसाठी इंग्रजी माध्यमाची शाळी निवडली. शिवाय विध्यार्थ्यांच्या हातात मोबाईल देऊ केले. याचा परिणाम गावातल्या जिल्हा परिषदेच्या शाळेतल्या पटसंख्येवर झाला होता.
गाव एकवटलं आणि निर्णय झाला 14 ऑगस्ट रोजी सरपंचांनी पहिल्यांदा महिलांची आमसभा बोलावली. ज्यामध्ये मुलांचा मोबाईलचा वापर, घरातील टीव्ही आणि त्याचा अभ्यासावर होणार परिणाम याबद्दल प्रश्न आणि चिंता व्यक्त करण्यात आली. ज्यातून मोबाईल आणि टीव्ही ही समस्या पुढे आली. यावर पर्याय म्हणून टीव्ही आणि मोबाईल दीड तास बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. रोज सायंकाळी सात ते साडे आठ या दरम्यान प्रत्येक घरातले टीव्ही आणि मोबाईल बंद करून मुलांच्या अभ्यासासाठी हा वेळ राखीव करण्याचा निर्णय 15 ऑगस्टच्या आमसभेत पारित करण्यात आला.
महिलांच्यासाठी सुरुवातीला टीव्ही बंद करणे हा निर्णय खूप अवघड होता. कारण 7 ते 8.30 हा विविध वाहिन्यांच्यावरील मालिकांचा प्राईम टाईम. गावातील महिला सुवर्ण जाधव याबाबत सांगतात, महिलांच्यासाठी हा वेळ टीव्हीवरील मालिकांच्यासाठी राखीव. खरंतर स्वयंपाकदेखील याच वेळेत बनवायचे असतो. पण मालिकांच्यामुळे मुलांच्या अभ्यासाबरोबर स्वयंपाकाकडे दुर्लक्ष होत असे. कधी फोडणी नीट द्यायची राहून जायची तर कधी वेगवेगळ्या गोष्टी. त्यामुळे जेवणाची चव देखील बिघडायाची. मात्र, आता स्वयंपाक उत्तम होत असल्याचे सुवर्णा जाधव सांगतात.
भोंगा वाजला कि मोबाईल टिव्ही बंद 15 ऑगस्ट पासून टीव्ही आणि मोबाईल बंद करण्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे. दररोज नित्यनियमाने टीव्ही आणि मोबाईल बंद करण्यासाठी गावाला आठवण करून देण्यासाठी मंदिरावर भोंगा आहे. संध्याकाळी 7 वाजता भोंगा वाजला की मोबाईल टिव्ही बंद होतात आणि 8.30 ला सर्व गोष्टी सुरळीत होतात.