Ratnagiri News : संजय कदम शिवसेनेच्या ठाकरे गटात गेले तर त्यांची राजकीय आत्महत्या - योगेश कदम
Updated on: Jan 22, 2023, 1:35 PM IST

Ratnagiri News : संजय कदम शिवसेनेच्या ठाकरे गटात गेले तर त्यांची राजकीय आत्महत्या - योगेश कदम
Updated on: Jan 22, 2023, 1:35 PM IST
संजय कदमांच्या घरवापसीच्या चर्चांमुळे सध्या राज्याच्या राजकारणात विविध प्रतिक्रीया येत आहेत. ठाकरे गटाची ताकद वाढवण्यासाठी आणि योगेश कदम यांना कडवे आव्हान देण्याससाठी संजय कदम ठाकरे गटात जात आहेत, असे म्हटले जात आहे. त्यावर योगेश कदम यांनी प्रतिक्रिया दिली.
रत्नागिरी : खेड-दापोलीमधील राष्ट्रवादीचे माजी आमदार संजय कदम हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात गेले, तर ही त्यांची राजकीय आत्महत्या ठरेल. पण ते तिकडे जात आहेत, ही माझ्यासाठी आनंदाची बाब आहे, ते ज्या दिवशी प्रवेश करतील त्या रात्री मी निवांत झोपेन, अशी प्रतिक्रिया शिंदे गट आमदार योगेश कदम यांनी दिली आहे. ते रत्नागिरीत बोलत होते. खेड-दापोलीमधील राष्ट्रवादीचे माजी आमदार संजय कदम हे ठाकरे गटात जाणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. यावर बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.
दापोली, खेड शिवसेनेचा बालेकिल्ला : दापोली - मंडणगड - खेड विधानसभा मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत योगेश कदम निवडून आले होते. त्यांनी राष्ट्रवादीचे तत्कालीन आमदार संजय कदम यांचा पराभव केला होता. दरम्यान शिवसेनेतील बंडखोरीनंतर योगेश कदम हे एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले. त्यामुळे त्यांना तगडे आव्हान देण्यासाठी राष्ट्रवादीचे माजी आमदार संजय कदम हे शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा आहेत. शिवसेनेच्या नेत्यांकडून तसे संकेत मिळत आहेत. मूळचे शिवसैनिक असलेल्या संजय कदमांच्या घरवापसीमुळे ठाकरे गटाची ताकद इथे वाढू शकते. त्यामुळे योगेश कदम यांच्यासमोर पुन्हा एकदा संजय कदम यांचे आव्हान असू शकते.
संजय कदम माझे आव्हान नाहीत : याबाबत योगेश कदम यांना विचारले असता, ते म्हणाले की संजय कदम यांना मी माझे आव्हान समजत नाही, मी जेव्हा शिंदे साहेबांसोबत जाण्याचा निर्णय घेतला तेव्हा मतदारसंघातील सर्वच शिवसैनिक माझ्यासोबत आहेत. वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचा हा लाडका मतदारसंघ आहे. दापोली मतदारसंघाने नेहमीच शिवसेनेवर प्रेम केलेले आहे. जेव्हा संजय कदम हे राष्ट्रवादीतून शिवसेनेत गेले तेव्हा या व्यक्तीने खेडच्या तीनबत्ती नाक्यात भगवा जाळून बाळासाहेबांचे पोस्टर्स फाडले होते. अशा व्यक्तीला उद्धव ठाकरे स्वीकारायला तयार होतात? त्यावेळेला तुम्ही तुमचीच विचारधारा संपवताय असे मला वाटते. त्यामुळे त्यांच्या या प्रवेशाला मी अजिबात महत्व देत नाही, संजय कदम यांचा राजकीय दृष्टीकोन हुशारीचा असता तर त्यांनी हा निर्णय घेतला नसता, त्यामुळे त्यांची ही राजकिय आत्महत्या ठरेल असे मला वाटते असे योगेश कदम यांनी म्हटले आहे.
