रत्नागिरी - के. पी गोसावी याच्या अटकेनंतर राष्ट्रवादीकडून राष्ट्रवादीचे नेते खासदार सुनील तटकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. केंद्रीय तपास यंत्रणा किंवा राज्य सरकारच्या तपास यंत्रणा यांच्याकडून एखाद्या प्रकरणात कारवाई केली जाते. त्यावेळी त्या संदर्भात बोलणे उचित नाही, अशी प्रतिक्रिया खासदार सुनील तटकरे यांनी आज दापोलीत दिली आहे. दरम्यान, तटकरे म्हणाले की, तपास यंत्रणेला त्यांची कारवाई पूर्ण करू द्या, कारवाई केल्यानंतर त्यातील नेमकं काय सत्य आहे याची माहिती जनतेसमोर यावे असही तटकरे म्हणाले आहेत.
पुणे पोलिसांकडून गोसावीला अटक करण्यात आली
आर्यन खान ड्रग्ज प्रकरणातील वादग्रस्त पंच किरण गोसावी याला पुणे पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. रात्री उशिरा पुण्यातील गुन्हे शाखाकडून गोसावीला अटक करण्यात आली आहे. गेल्या तीन दिवसांपासून गोसावी पुणे पोलिसांना शरण येणार असल्याच सांगितले जात होते. दरम्यान, काल पुण्यातील कामशेत भागात किरण गोसावी येऊन पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार झाला होता.अखेर पुणे पोलिसांकडून गोसावीला अटक करण्यात आली असून आज त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. किरण गोसावीवर फसवणुकीचा गुन्हा दाखल असून त्यांच्या विरोधात लुक आऊट नोटीस जारी करण्यात आली होती.
याआधी गोसावीच्या महिला सहकाऱ्याला अटक -
फसवणुकीच्या गुन्ह्यात फरार असलेल्या किरण गोसावीच्या महिला सहकाऱ्याला यापूर्वी पुणे पोलिसांनी अटक केली आहे. शेरबानो कुरेशी, असे त्या महिलेचे नाव आहे. शेरबानो कुरेशीसह गोसावीने पुण्यातील तरुणाची तीन लाखांची फसवणूक केली होती.
के. पी. गोसावी नेमका कोण? -
किरण गोसावी हा देशभरात, परदेशात नोकरी मिळवून देणाऱ्या के. पी. जी. ड्रीम्ज रिक्रूटमेंट कंपनीचे मालक असल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे के. पी. जी. ड्रीम्ज कंपनीचे मुंबई आणि नवी मुंबईत कार्यालय आहे. बड्या पोलीस अधिकाऱ्यांच्या संपर्कात, खासगी गुप्तहेर अशीही के. पी. गोसावी याची ओळख आहे. तसेच आर्यन खान प्रकरणात किरण गोसावी हा पंच आहे.
काय आहे नेमके प्रकरण?
2018 मध्ये गोसावी याने आपल्या फेसबुक अकाऊंटवर मलेशियात हॉटेलमध्ये नोकरीची संधी असण्यासंदर्भात पोस्ट टाकली होती. त्या पोस्टवर चिन्मय देशमुख या तरुणाने प्रतिसाद दिला होता. त्यांच्याकडून तीन लाख रुपये घेऊन गोसावीने त्याला मलेशियाला पाठविले. मात्र, तेथे नोकरी न दिल्याने तो भारतात परत आला. त्यानंतर त्याने फरासखाना पोलिसांकडे तक्रार दिली होती. या गुन्ह्यात गोसावी फरार होता. त्यामुळे फसवणुकी संदर्भात फरासखाना पोलीस किरण गोसावीचा शोध घेत होते. तक्रारदार चिन्मय देशमुख याच्या माहितीनुसार गोसावीने आपल्यासह पालघर, मुंबई, आंध्र प्रदेश येथील अनेकांची नोकरीच्या आमिषाने फसवणूक केली आहे. दिल्लीतील तरुणांनाही त्याने फसविले आहे.
हेही वाचा - हजारो क्विंटल संत्रा फेकल्या रस्त्यावर, शेतकरी झाला हतबल;ईटीव्ही भारत'कडून आढावा