Kidnapping : मार्केटयार्डातील अपहरणाचा मास्टरमाईंड निघाला सरपंच, खंडणीसाठी तिघांचे केले होते अपहरण

author img

By

Published : Jan 14, 2023, 10:06 AM IST

फाईल फोटो

पुण्यात काल दुपारी 50 लाखाच्या खंडणीसाठी मार्केटयार्डातून तिघांचे अपहरण करण्यात आले होते. या अपहरण नाट्याला आता वेगळे वळण लागले असून, या प्रकरणाचा मास्टरमाईंड श्रीगोंदा तालुक्यातील वांगदरी गावचा सरपंच असल्याचे समोर आले आहे. सध्या तो फरार असल्याचे पोलिसांनी माहिती देताना सांगितले आहे.

पुणे : पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पाच पथकांनी तांत्रिक विश्लेषन व नगर पोलिसांच्या मदतीने तिघांना काही तासात श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी येथील एका लॉजवरून ताब्यात घेतले आहे. प्रवीण शिर्के, विजय खराडे आणि विशाल मदने असे तिघांचे नावं आहेत. (रा. नगर) तर, त्यांचे इतर साथीदार फरार झाले असून, पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. याप्रकरणी शुक्रवार (दि. 13 जानेवारी)रोजी मार्केटयार्ड पोलीस ठाण्यात तिघे संशयित आरोपी व त्यांच्या सहा ते सात साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका अपहरण व्यक्तीच्या भावाने फिर्याद दिली आहे.

साथीदारांना संशय आला : आदेश नागवडे अस सरपंचाचे नाव आहे. काळे पैसे पांढरे कारण्यासाठी सरपंचाने अपहरण झालेल्यांकडे 34 लाख रुपये दिले होते. प्रोसेसिंग फी आणि टोकन अमाऊंटच्या नावाखाली हे पैसे त्यांनी घेतले होते. सरपंचाला 10 कोटी रुपये पांढरे करून हवे होते. मात्र, ठरल्याप्रमाणे अपहरण झालेल्या व्यक्तींनी त्यांना काळ्याचे पांढरे पैसे करून दिले नाहीत. त्यामुळे सरपंच व त्याच्या साथीदारांना संशय आला. त्यातूनच त्यांनी या तिघांचे अपहरण केले आहे.

कंपनीच्या कामानिमित्त ते पुण्यात : पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, अपहरण व्यक्तीमधील एकजण फिर्यादींचा भाऊ आहे. ते मुळचे मुंबई साकीनाका येथील राहणारे आहेत. तेथील एका कंपनीत ते प्रतिनिधी म्हणून काम करतात. तर, इतर दोन व्यक्तीमध्ये एक नातेवाईक आहे. तर, तिसरा त्यांचा मित्र आहे. कंपनीच्या कामानिमित्त ते पुण्यात आल्याची माहिती आहे. गुरूवारी दुपारी ते मार्केटयार्ड परिसरात आले असताना, बारा वाजताच्या सुमारास तिघांचे अपहरण करण्यात आले होते.

आरोपींचा शोध सुरू : अपहरणकर्त्यापैकी एकाने व्हॉट्सअपद्वारे व्हिडीओ कॉल करून कंपनी प्रतिनीधी असणार्‍या प्रमुख व्यक्तीच्या भावाला तिघांचे अपहरण केल्याची माहिती दिली. तसेच, त्यांना मारहाण करत असल्याचे देखील दाखवले. त्यानंतर तिघांना सोडवायचे असल्यास पुण्यातील एम. जी. रस्ता येथील एका अंगडीयाकडे 50 लाख रुपये खंडणी देण्याची मागणी आरोपींनी केली होती. त्यानंतर फिर्यादींनी शुक्रवारी सकाळी मार्केटयार्ड पोलिसांना याची माहिती दिली. दरम्यान, अपहरणाची माहिती मिळताच गुन्हे शाखेकडून पाच पथके तयार करून आरोपींचा शोध सुरू करण्यात आला.

चारचाकी गाड्या जप्त : या तपासात प्रत्येकाला विभागून काम देण्यात आले आहे. पोलिसांनी तांत्रिक विश्लेषन आणि परिसरातील सीसीटीव्ही कॅमेर्‍यावरून आरोपींचा माग काढण्यास सुरवात केली. आरोपी हे श्रीगोंदा येथे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यानुसार पथकाने नगर स्थानिक पोलिसांच्या मदतीने सापळा रचून श्रीगोंदा येथील एका लॉजमधून तिघांना ताब्यात घेतले. यावेळी काही आरोपी पसार झाले असून, त्यांचा शोध घेण्यात येत आहे. आरोपाींच्या ताब्यातून एक फॉर्च्यूनर आणि एक क्रेटा अशा दोन चारचाकी गाड्या जप्त करण्यात आल्या आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.