Maharashtra Weather Update : परभणीत थंडीचा कहर, तापमान 5.5 अंशावर

author img

By

Published : Jan 30, 2022, 2:33 PM IST

parabhani cold wave

महाराष्ट्रातील वातारणात बदल झाला ( Maharashtra Weather Update ) आहे. त्यातच आता परभणी जिल्ह्यातील किमान तापमान 5.5 अंशावर ( Parbhani Weather Update ) पोहचले आहे. त्यामुळे कडाक्याची थंडी पडली आहे.

परभणी - गेल्या तीन दिवसांपासून परभणी जिल्ह्यातील वातावरणामध्ये कमालीचा बदल झाला ( Parbhani Temprature Update ) आहे. शहरात सकाळच्या सुमारास धुक्याची चादर पसरत आहे. किमान तापमान केवळ 5.5 अंशावर आल्याने कडाक्याची थंडी जाणवू लागली ( Parbhani Cold Wave ) आहे. विशेष म्हणजे या वातावरणाचा रब्बीच्या पिकांवर परिणाम होणार असून, नागरिकांचे आरोग्य देखील बिघडत आहे.

परभणी शहरासह जिल्ह्यात परवा शुक्रवार पासूनच थंडीची लाट आल्याचे दिसून येत आहे. ज्यामुळे वातावरणात कमालीचा गारवा निर्माण झाला आहे. त्यानुसार येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या हवामान विभागात शुक्रवारी सकाळी 8 अंश किमान तापमानाची नोंद झाली. तर काल शनिवारी त्यात आणखी घट होऊन किमान तापमान 5.6 अंश एवढे नोंदविण्यात आले होते. तसेच आज रविवारी (30 जानेवारी) त्यात किंचित घट होऊन किमान तापमान 5.5 अंशावर आल्याने दुसऱ्या दिवशी देखील थंडीचा कडाका कायम राहिला आहे.

शेकोट्या, गरम कपड्यांचा सहारा

सध्याच्या परिस्थितीत कडाक्याच्या थंडीपासून बचाव करण्यासाठी नागरिक शेकोट्यांचा सहारा घेताना दिसत आहेत. हुडहुडी भरवणाऱ्या या थंडीमुळे सकाळी मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या नागरिकांना देखील मोठ्या प्रमाणात गरम कपडे, कानटोपी, मफलर घालूनच बाहेर पडावे लागत आहे. गुलाबी थंडीचा आनंद घेत शहरातील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, पोलीस ग्राउंड वसमत रोड, जिंतूर रोड, नांदखेड रोड, गंगाखेड रोड तसेच अन्य भागात फिरणाऱ्यांची संख्या वाढल्याचे दिसत आहे.

परभणी जिल्ह्यात कडाक्याची थंडी पडली आहे.

रब्बी पिकांना फटका

गतवर्षी झालेल्या समाधानकारक पावसामुळे रब्बीची पिके जोमात आली होती. मात्र, आता अधिकच्या थंडीमुळे रब्बी पिकांना चांगलाच फटका बसण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात गव्हाचे पीक मोठ्या प्रमाणात आहे. शिवाय ज्वारीची कणसे भरली असून, त्यालाही या थंडीचा फटका बसणार आहे. शिवाय पहाटे पिकांवर दवबिंदू साचत असल्याने अनेक ठिकाणच्या पिकांसह फळबागांचे देखील नुकसान होणार आहे.

संसर्गजन्य आजारांची भीती

गेल्या 2 वर्षांपासून नागरिक कोरोनामुळे त्रस्त आहेत. त्यातच संसर्गजन्य आजारांना सध्याचे वातावरण पोषक असल्याचे दिसून येते. वातावरणात प्रचंड प्रमाणात गारवा निर्माण झाला असून, यामुळे सर्दी, खोकला, ताप आदी विकार बळावण्याची शक्यता आहे. ज्यामुळे नागरिकांची रोग प्रतिकारशक्ती कमी होऊन कोरोना सारख्या आजाराला बळी पडण्याची भीती व्यक्त केल्या जात आहे. त्यामुळे नागरिकांनी तोंडाला मास्क बांधूनच घराबाहेर पडावे. वारंवार सॅनिटायझरचा वापर करावा, घराबाहेर पडणे शक्यतो टाळावे, सार्वजनिक ठिकाणी एकमेकांपासून अंतर ठेवून राहावे. तसेच, कोरोनाचे लक्षणे आढळल्यास तात्काळ रुग्णालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने वेळोवेळी करण्यात येत आहे.

हेही वाचा - Maharashtra Mahavikas Aghadi Government : न्यायालयाच्या 'या' निर्णयांमुळे महाविकास आघाडी सरकार बॅकफूटवर

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.