प्रहारकडून रस्त्यांवरील खड्डे बुजवून परभणी महानगरपालिकेचा निषेध

author img

By

Published : Aug 22, 2021, 6:53 PM IST

Prahar Janashakti Paksha Agitation Parbhani

मुख्य बाजारपेठ असलेल्या शिवाजी चौक व गांधी पार्क भागात, तसेच संपूर्ण शहरात गेल्या अनेक दिवसांपासून रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडले आहेत. आज रविवारी प्रहार जनशक्ती पक्षाच्यावतीने हे खड्डे बुजवून महानगरपालिकेचा निषेध करण्यात आला.

परभणी - येथील मुख्य बाजारपेठ असलेल्या शिवाजी चौक व गांधी पार्क भागात, तसेच संपूर्ण शहरात गेल्या अनेक दिवसांपासून रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडले आहेत. आज रविवारी प्रहार जनशक्ती पक्षाच्यावतीने हे खड्डे बुजवून महानगरपालिकेचा निषेध करण्यात आला.

माहिती देताना प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष

हेही वाचा - सेलुतील उद्योजक करवांचा खूनच; लाच प्रकरणातून झाला उलगडा, 5 जण अटकेत

यावेळी मनपाची ग्रामपंचायत करावी, अशी मागणी करण्यात आली. शिवाय या आंदोलनानंतरही मनपाला जाग न आल्यास मनपा कार्यालयापुढील रस्त्यावर खड्डे खोदण्यात येतील, असा इशारा पक्षाच्या वतीने देण्यात आला आहे.

मुख्य बाजारपेठेतच खड्ड्यांची समस्या गंभीर

पावसाळ्याच्या पार्श्‍वभूमीवर शहरातील रस्ते, नाल्या दुरुस्त करणे अपेक्षित होते, परंतु परभणी शहर महापालिकेकडून या कामांकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसून आले. परिणामी पावसाळ्यात इंचभर खोल असलेले खड्डे आता फूटभर होऊन बसले आहेत. परभणी शहरातील मुख्य बाजारपेठ समजल्या जाणाऱ्या शिवाजी चौक, गांधी पार्क, गुजरी बाजार या भागांतील रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडल्याने वाहनचालकांना सोडाच पायी चालणाऱ्यांना देखील मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. तर शहरातील अन्य भागातील रस्त्यांची काय परिस्थिती असेल, याचा यावरूनच अंदज येईल.

खड्ड्यात पडून दुचाकीस्वार जोडप्याचा अपघात

विशेष म्हणजे, शहरातील जुना पेडगाव रोड भागात पाऊस सुरू असताना शुक्रवारी एका दुचाकीस्वार जोडप्याचा भल्यामोठ्या खड्ड्यात पडून अपघात झाला. यात त्यांना गंभीर इजा झाली. अशी समस्या परभणी शहरातील वसमत रोड, जुना पेडगाव रोड, गंगाखेड रोड, दर्गा रोड, कारेगाव रोड, वांगी रोड, नांदखेडा रोड आदी भागात देखील निर्माण झाली आहे. या भागात खड्ड्यांमुळे लहान-मोठे अपघात नित्याचे झाले आहेत. एकूणच परभणी शहरातील सर्वच भागांमध्ये खड्ड्यांची समस्या गंभीर होत चालली आहे. या पार्श्वभूमीवर प्रहार जनशक्ती पक्षाच्यावतीने आज हे आणखी आंदोलन करण्यात आले.

'परभणी' ग्रामपंचायत करा

सुमारे दहा वर्षांपूर्वी परभणी नगरपालिकेची महानगरपालिका झाली. शहराला लोकसंख्येच्या प्रमाणात महापालिकेचा दर्जा तर मिळाला, परंतु शहरवासीयांना ग्रामपंचायतीच्या सुविधा मिळत असल्याचा आरोप प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष शिवलिंग बोधने यांनी केला. त्यामुळे, आपण दोनच दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून 'परभणी' ची ग्रामपंचायत करावी, अशी मागणी केली असल्याचे सांगितले.

महापालिकेपुढचा रस्ता खोदू

यापूर्वी देखील प्रहार जनशक्ती पक्षाच्यावतीने शिवाजी चौकातील खड्ड्यांमध्ये बेशरमाचे झाड लावून आंदोलन करण्यात आले होते. त्यावेळी मनपाने थातूरमातूर स्वरुपात ते खड्डे बुजवले. परंतु, गेल्या काही दिवसांत हे खड्डे जैसे थे झाले आहेत, त्यामुळे महानगरपालिकेने शहरातील सर्वच भागातील व मुख्य बाजारपेठेतील रस्त्यांवर पडलेले खड्डे कायमस्वरुपी बुजवावेत, अशी मागणी करत पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आज दुपारी मुरुम व खडी टाकून हे रस्ते बुजवून अनोखे आंदोलन केले. तसेच, महापालिकेने शहरातील खड्डे तात्काळ न बुजवल्यास महापालिका कार्यालयापुढील रस्त्यावर खड्डे खोदण्यात येतील, असा इशारा जिल्हाध्यक्ष शिवलिंग बोधन यांनी दिला.

हेही वाचा - 'इसिस'च्या संपर्कातील चार संशयीतांपैकी एकाला न्यायालयाकडून जामीन

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.