परभणी - तालुक्यातील साटला येथे आज मंगळवारी दुपारी ४.३०च्या सुमारास वीज पडून दोघा जणांचा मृत्यू झाला आहे. तर एकाची प्रकृती चिंताजनक असल्याने रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले आहे. शेतामध्ये काम करत असताना सदरील प्रकार घडला आहे. घटनेमुळे गावामध्ये शोककळा पसरली आहे.
शेतात काम करत असताना पडली वीज
परभणी तालुक्यातील साटला शिवारात बाळासाहेब माणिकराव काकडे (वय ६०), ऋषीकेश हरिभाऊ काकडे (वय १४) आणि हरिभाऊ बाळासाहेब काकडे हे आज मंगळवारी (५ सप्टेंबर) सायंकाळी ४.३० वाजेच्या सुमारास काम करत होते. त्याचवेळी साटला परिसरात वीजेच्या कडकडाटासह मुसळधार पावसाने हजेरी लावली. याच दरम्यान शेतामध्ये काम करत असलेल्या बाळासाहेब काकडे, ऋषीकेश काकडे आणि हरिभाऊ काकडे यांच्या अंगावर वीज कोसळली.
दोघे जागीच ठार; एकावर उपचार सुरू
या दुर्घटनेमध्ये बाळासाहेब काकडे आणि ऋषीकेश काकडे यांचा मृत्यू झाला आहे. तर हरिभाऊ बालासाहेब काकडे यांच्याही अंगावर वीज कोसळल्यामुळे त्यांना गंभीर दुखापत झाली आहे. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्यामुळे उपचारासाठी परभणी येथे हलविण्यात आले आहे. तर मृत दोन्ही व्यक्तींचे परभणी जिल्हा सामान्य रुग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन केले जाणार असल्याची माहिती रुग्णालयाच्या सूत्रांकडून देण्यात आली आहे. घटनेमुळे साटला गावात शोककळा पसरली आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच ग्रामीण पोलीस ठाण्याचे निरीक्षक गणपत राहिरे आणि त्यांचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून, पंचनामा व इतर कारवाई सुरू झाली आहे.