पालघर - जिल्ह्यातील ऐतिहासिक गडकोटांचा मानबिंदू असणाऱ्या जंजिरे वसई किल्ल्यातील नरवीर चिमाजी आप्पा स्मारकात भारताच्या स्वतंत्र्यपूर्व काळातील राष्ट्रध्वजास मानवंदना देण्यात आली. सकाळी ठीक ८.३० वाजता किल्ले वसई मोहीम परिवार व युवा शक्ती प्रतिष्ठानचे प्रतिनिधींच्या साक्षीने राष्ट्रध्वजास मानवंदना देऊन जयजयकार करण्यात आला. यंदा या ध्वजास 114 वर्ष पूर्ण झाली आहेत. कार्यक्रमाला किल्ले वसई मोहिमेच्या संवर्धन मोहीम प्रमुख दिपाली पावसकर व उत्तर कोकण लिपी मंडळाच्या प्रमुख दिव्या राऊत प्रमुख मान्यवर म्हणून उपस्थित होत्या.
हेही वाचा - नालासोपाऱ्यात भरदिवसा साक्षी ज्वेलर्स मालकाची लुटमार करून हत्या
युवा शक्ती प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रशांत सातवी व किल्ले वसई मोहिमेचे प्रमुख श्रीदत्त राऊत यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून दुर्गमित्रांना व देशप्रेमी युवकांना राष्ट्रध्वजाच्या मोहिमेबाबत मार्गदर्शन केले. यावेळी क्रांतिवीर मादाम कामा व स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या सन १९०७ मधील स्वातंत्र्य चळवळीतील आठवणींना उजाळा देण्यात आला.
पालघर जिल्ह्यातील गडकोटांवर राष्ट्रध्वजाच्या विक्रमी मोहिमेचे नियोजन यंदा कोरोना विषयक सर्व जबाबदारी लक्षात घेऊन ठराविक स्थळांवर मर्यादित करण्यात आलेले आहे. संपूर्ण भारतात किल्ले वसई मोहीम अंतर्गत स्वतंत्र्यापूर्व काळातील राष्ट्रध्वजास सातत्याने १५ वर्षे विविध गडकोटांवर मानवंदना देणारा हा एकमेव उपक्रम म्हणून ओळखला जातो.
यंदाचा वाढता कोरोना संकटाचा प्रादुर्भाव पाहता नियोजित संकल्प उपक्रमात विविध दुर्गमित्र पूर्ण काळजी व अत्यंत सावधगिरी बाळगून केवळ स्थानिक दुर्गमित्रांचे सहकार्य घेऊन राष्ट्रध्वजाचे स्मरण व मानवंदना उपक्रम पूर्ण केले. यंदाही युवा शक्ती प्रतिष्ठान पालघर, समस्त दुर्गमित्र परिवार महाराष्ट्र, उत्तर कोकण लिपी मंडळ यांचे सदर उपक्रमात सक्रिय योगदान लाभले.
जगातील सर्व राष्ट्रांना आपले स्वतंत्र ध्वज आहेत. त्या ध्वजांना तेथील जनमानसात स्वतंत्र मान आणि आदर आहे. २२ ऑगस्ट १९०७ रोजी जर्मनमधील स्टुटगार्ड या शहरात जागतिक समाजवाद्यांची परिषद भरली होती. त्या ठिकाणी भारताच्या प्रतिनिधी म्हणून असलेल्या मादाम कामांनी युनियन जॅक न घेता आपल्या कल्पनेने साकार केलेला स्वतंत्र असा ध्वज भारताचा म्हणून सादर केला. ऑगस्ट १९३७ मध्ये या ध्वजाचे भारतात आगमन झाले. पुण्यात पोहचल्यावर ध्वजाची मोठी मिरवणूक काढण्यात आली. केसरीवाडा ते पुणे रेल्वे स्थानक या मार्गावर निघालेल्या या मिरवणुकीत खुद्द स्वातंत्र्यवीर सावरकर सहभागी झाले होते. ध्वजाच्या आरेखनात स्वा. सावरकरांचे योगदान होते.
हेही वाचा - पालघर जिल्हा मुख्यालयाचे लोकार्पण