मराठा आरक्षण देण्याची राज्य सरकारची इच्छाशक्ती नाही; भाजप आमदार राणा पाटील यांचा मुख्यमंत्र्यांवर आरोप

author img

By

Published : Aug 28, 2021, 8:46 PM IST

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा देताना एसईबीसी प्रवर्गाची निवड करणाऱ्यांचे आयुष्यच पणाला लागले. सरकारने कोणतीही तज्ञ समिती गठित न करता एसईबीसीच्या उमेदवारांना पूर्वलक्षी प्रभावाने ईडब्ल्यूएसचा पर्याय निवडता येईल, असा शासन निर्णय काढला होता.

उस्मानाबाद - मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर भाजप आक्रमक होताना दिसत आहे. भाजपचे तुळजापूर मतदारसंघाचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून पत्र लिहले. मराठा आरक्षण देण्याची राज्य सरकारची इच्छाशक्ती नसल्याचा आरोप पाटील यांनी पत्रात केला आहे.

भाजपचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी मराठा आरक्षणावरून आक्रमक भूमिका घेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहले आहे. त्यांनी पत्रात म्हटले, की महाविकास आघाडी सरकार सत्तेत आले. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केले, हा काही योगायोग नव्हता. कारण आपले सरकार मराठा आरक्षणासंदर्भात बाजू मांडण्यात कमकुवत राहिले. सरकार अपयशी झाल्याचे उभ्या महाराष्ट्राने पाहिले आहे. न्यायालयीन लढ्या दरम्यान वकील आणि सरकार यामध्ये समन्वयाचा अभाव, कोणतीही व्यूहरचना नसणे, यातून आपली मराठा आरक्षण देण्याची इच्छा शक्ती नव्हती हे सिद्ध झाले, असा आरोप राणा पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या पत्रात केला आहे.

हेही वाचा-कोरोना चाचणी नसेल तर रेशनही नाही; पंढरपुर तालुक्यातील 21 गावांत प्रशासनाकडून कठोर उपाययोजना


एसईबीसी प्रवर्गावरूनही महाविकास आघाडीवर टीका-
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा देताना एसईबीसी प्रवर्गाची निवड करणाऱ्यांचे आयुष्यच पणाला लागले. सरकारने कोणतीही तज्ञ समिती गठित न करता एसईबीसीच्या उमेदवारांना पूर्वलक्षी प्रभावाने ईडब्ल्यूएसचा पर्याय निवडता येईल, असा शासन निर्णय काढला होता. या निर्णयामुळे अनेक घटनात्मक पेच निर्माण झाले आहेत. किंबहुना हे जाणून बुजून निर्माण व्हावेत, अशीच तर आपली इच्छा नाही ना? अशी शंका समाज बांधवांच्या मनात उपस्थित झाल्याचा दावा आमदार पाटील यांनी केला आहे.

हेही वाचा-मुंबईकरांची चिंता वाढली : नऊ दिवसात रुग्ण दुपटीचा कालावधी ३१० दिवसांनी घसरला

मराठा समाजाच्या संयमाचा अंत पाहू नका- राणा पाटील
पुरोगामी महाराष्ट्रात नेहमी मोठ्या भावाची व समजूतदारपणाची भूमिका घेणाऱ्या मराठा समाजाचा हक्काचा आरक्षण आपण हिरावून घेतला आहे. यानंतर चुकीचे शासन निर्णय काढून तोंडाला पाने पुसली. आता तर तुम्ही आमच्या अस्तित्वावरच घाव घालत आहात. मराठा समाजाच्या संयमाचा अंत पाहू नका, असा इशारादेखील राणा पाटील यांनी पत्रात दिला आहे.

हेही वाचा-नारायण राणेंचे मानसिक स्वास्थ्य ठीक व्हावे म्हणून शिवसैनिकांनी प्रार्थना करावी - संजय राऊत

मराठा समाजातील मागास सिद्ध करण्याची जबाबदारी राज्य मागासवर्ग आयोगाकडे द्यावी-
लवकरात लवकर जे काही रिक्त जागा, भरती प्रक्रिया व रखडलेल्या नियुक्त्या संदर्भात तांत्रिक व घटनात्मक पेच निर्माण झाले आहेत. त्यावर तातडीने संरक्षण समिती गठीत करून माहाविकास आघाडी सरकारने सुस्पष्ट धोरण ठरवून कृती केली पाहिजे. तसेच मराठा समाजातील मागास सिद्ध करण्याची जबाबदारी राज्य मागासवर्ग आयोगाकडे दिली पाहिजे, अशी मागणी देखील पाटील यांनी पत्रात केली आहे.

मराठा समाजाला योग्य प्रतिनिधित्व दिले पाहिजे, नाहीतर हे ठाकरे सरकारचे लोक विध्वंसकारी राज्य म्हणून ओळखले जाईल, देखील पत्रात नमूद करण्यात आले आहे. आमदार राणा पाटील तथा राष्ट्रवादीचे माजी नेते यांनी विविध मागण्यांसह ठाकरे सरकारवर टीकादेखील केली आहे. या पत्रावरून भाजप मराठा आरक्षणाबाबत भविष्यात अधिक आक्रमक होईल, हे स्पष्ट झाले आहे.

दोन वर्षांपूर्वी राणा जगजितसिंह पाटील यांचा भाजपमध्ये प्रवेश
राणा जगजितसिंह पाटील यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत दोन वर्षापूर्वी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. यानंतर, हा पक्षप्रवेश पुत्र प्रेमापोटी होत असल्याचे म्हणून सुप्रिया सुळे यांनी पाटील घराण्यावर निशाणा साधला होता. मात्र, धनंजय मुंडे यांनी हा पक्षप्रवेश पुत्र प्रेमापोटी नसून, राणाजगजितसिंह पाटील यांनी पत्नी प्रेमापोटी केल्याची टीका कार्यकर्ता संवाद मेळाव्यात केली होती.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.