नंदुरबार - शहरातील बिस्मिला चौक परिसरात काल रात्री दोन गटात दगडफेकीसह तुंबळ हाणामारी झाली. दोन युवकांच्या लघुशंका करण्याच्या जागेवरून सुरू झालेल्या वादाचे पर्यवसान दगडफेकीत झाले. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल होत त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी तीन अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या होत्या. रात्रीच्या या संपूर्ण घटनेत ३३ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून सहा जणांना ताब्यात घेण्यात आले आहेत. रात्रीच्या उपद्रवात दोन दुचाकी जाळण्यात आल्या तर एक पोलीस वाहनाची काच फोडण्यात आली आहे.
किरकोळ वादातून दोन गटांत दगडफेक
सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास नंदुरबार शहरातील बिस्मिल्ला चौकात युवकांनी दोन युवकांच्या लघुशंका करण्याच्या जागेवरून सुरू झालेल्या वादाचे पर्यवसान दगडफेकीत झाले आहे. यात दोन्ही गटांकडून विटा दगड व खाली बाटल्यांचा जोरदार मारा करण्यात आला. यात अनेक जण किरकोळ जखमी झाले, तर अनेक वाहनांचेदेखील नुकसान झाले आहे.
पुन्हा त्याच ठिकाणी दगडफेक
मंगळवारी सकाळी साडेबाराच्या सुमारास पुन्हा याच ठिकाणी काही युवकांसह उपद्रव्यांनी गर्दी करत पुन्हा दगडफेक केली आणि एक वाहन जाळत काही घरांचे नुकसान करण्याचा प्रयत्न केला. घटनास्थळी दाखल पोलीस फौजफाटा आणि जिल्हा पोलीस दल याठिकाणी तत्काळ दाखल झाल्याने उपद्रव्यांनी पोबारा केला. मात्र, या घटनेनंतर शहरात तणावपूर्ण शातंता असून बिस्मिला नगरमध्ये मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला असून आजच्या दगडफेकीतील उपद्रव्यांना ताब्यात घेण्यासाठी पोलीस रवाना झाले आहेत. सध्या याठिकाणची परिस्थिती नियंत्रणात असून कोणीही अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन पोलीस अधीक्षक महेंद्र पंडितांनी केले आहे.
३३ जणांवर दंगलीचा गुन्हा दाखल
सोमवारी मध्यरात्री दगडफेक आणि बाटलीफेक प्रकरणी दोन्ही गटातील ३३ जणांवर गुन्हा दाखल तर ०६ जणांना घेतले ताब्यात घेतले आहे. तर पुन्हा सकाळी झालेल्या दगडफेकीतील संशयितांवर पोलीस नजर ठेवून आहेत. संशयितांना ताब्यात घेण्यासाठी पोलिसांकडून पथके नेमण्यात आली आहेत.
घटना घडताच पोलीस दाखल
घटना घडताच पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, अप्पर पोलीस अधीक्षक विजय पवार, उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर, नंदुरबार शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अर्जुन पडले, वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश मोरे यांच्यासह पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.
'शहरात शांतता, नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये'
मंगळवारी दुपारी दगडफेकीची वार्ता शहरात पसरल्यानंतर शहरात धावपळ उडाली. व्यावसायिकांनी आपले व्यवस्थापन बंद करण्यास सुरुवात केली व वेगवेगळ्या अफवांना ऊत येऊ लागला. याबाबत पोलीस अधीक्षकांना माहिती मिळाली. त्यांनी कर्मचाऱ्यांना शहरात तैनात करून अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन केले.