नांदेड - राहुल गांधी ( Rahul Gandhi ) यांची भारत जोडो यात्रा सध्या महाराष्ट्रात सुरू आहे. यामध्ये आज शिवसेना नेते आदित्य ठाकरे सहभागी झाले आहेत. शिवसेनेने काँग्रेसच्या या भारत जोडो यात्रेला पाठिंबा दिला आहे. आज आदित्य ठाकरे प्रत्यक्ष या यात्रेत राहुल गांधी यांच्यासोबत सामिल ( Aaditya Thackeray in Bharat Jodo Yatra ) झाले.
लोकशाही टिकावी म्हणून भारत जोडो यात्रेत सहभाग - मागील तीन-चार महिन्यांपासून जे सरकार अस्तित्वात आहे ते घटनाबाह्य सरकार आहे. आणि अशा या घटनाबाह्य सरकारच्या वागणुकीमुळे आपल्या देशात घटनेला आणि लोकशाहीला धोका निर्माण झाला आहे. राज्यघटना धोक्यात आली आहे. म्हणून देशातील लोकशाही टिकून राहावी म्हणून आम्ही भारत जोडो यात्रेत सहभागी होत असल्याचे माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी सांगितले.
कॉंग्रेसचे आणि आमचे संबंध चांगले - आदित्य ठाकरे भारत जोडो यात्रेत सहभागी होत असल्यामुळे राज्यातील सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांनी त्यांच्यावर टीका केली होती. या टीकेवर प्रतिक्रिया देत आदित्य ठाकरे म्हणाले की, बाळासाहेंबामध्ये आणि इंदिरा गांधींमध्ये चांगले संबंध होते. अनेकादा प्रणव मुखर्जींसाठी असतील किंवा मंत्रीपदासाठी असेल आम्ही एकत्र बैठकी घेतल्या. आमचे संबंध चांगले आहेत यासाठी आम्ही यात्रेत सहभागी झालो.
सरकारला केला सवाल - पोलिस स्टेशनवर गोळीबार करणारे मंत्री त्यांना चालतात. सरकारने हे घाणरेडे राजकारण करायचे सोडून, ओला दुष्काळ कधी जाहीर करतात याचे उत्तर सरकारने दिले पाहिजे, असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे.
जनतेचे प्रेम हेच आमच्यासाठी ऊर्जा - सध्या सुरू असलेले समाज विरोधी कार्य बंद करून खऱ्या अर्थाने लोकशाही, संविधान जिवंत ठेवायचे असेल तर सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे. त्यासाठी राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रा सुरू केली आहे. भारतीय समाज मनात ही भावना तयार करण्यासाठीच गेल्या दोन महिन्यापासून दररोज 25 किलोमीटर चालत राहुल गांधी पदयात्रा करीत आहेत. यामध्ये अजिबात थकवा जाणवत नाही, असे राहुल गांधी सांगत आहेत. कारण जनतेचे प्रेम हेच आमच्यासाठी ऊर्जेचे कार्य करीत असल्याचे राहुल गांधी यांनी सांगितले.
संजय राऊत सहभागी होण्याची शक्यता - राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा सध्या महाराष्ट्रात आहे. या यात्रेसाठी महाविकास आघाडीच्या सर्वच नेत्यांना आमंत्रीत केले आहे. त्यानुसार मित्र पक्षाचे नेते भारत जोडो यात्रेत सामील होणार आहेत. काल राष्ट्रवादीचे जयंत पाटील, सुप्रिया सुळे आणि जितेंद्र आव्हाड हे पण यात्रेत सहभागी झाले होते. संजय राऊत हे पण या यात्रेत सहभागी होऊ शकतात, असे सांगण्यात येत आहे.