नागपूर - सध्या मनसे प्रमुख राज ठाकरे कधीकाळी काँग्रेस आणि त्यानंतर भारतीय जनता पक्षाचे प्राबल्य राहिलेल्या विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. ठाकरे यांचा हा पाच दिवसीय विदर्भ दौरा आहे. (Raj Thackeray is on a Vidarbha tour) यामध्ये ते सुरुवातीचे दोन दिवस नागपुरमध्ये होते. आता पुढे ते चंद्रपूरला आणि नंतर अमरावतीला जाणार आहेत. एकाच दौऱ्यात तीन जिल्हे आणि पाच दिवस त्यांनी हा दौरा केला आहे. सध्या राज ठाकरे विदर्भात पक्षावाढीसाठी तयारीला लागले आहेत अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. दरम्यान, विदर्भाकडे दुर्लक्ष झाल्याचे त्यांनी मान्य करत पुन्हा अशी चुक होणार नाही अशी कबूलीही त्यांनी दिली आहे.
ठाकरेंनी कधीही विदर्भाचा एवढा विचार केला नव्हता - महाराष्ट्राच्या सत्तेचा मार्ग हा विदर्भातून जातो हे बहुदा राज ठाकरे यांना पटलेले दिसतंय. गेल्या १६ वर्षात कधीही पक्ष कार्यकर्त्यांना इतके महत्व मिळाले नव्हते तेवढे या सुरू असलेल्या राज ठाकरे यांच्या दौऱ्यात मिळाले आहे. राज ठाकरे यांनी बैठकीत आलेल्या प्रत्येक कार्यकर्त्यांचे म्हणणे अतिशय गांभीर्याने ऐकून घेतले. (Mararashtra Navnirman Party) त्यांचे मुद्दे समजून घेतले, कार्यकर्ते म्हणून त्यांना येत असलेल्या सर्व अडचणीही जाणून घेतल्या, त्यामुळे कार्यकर्त्यांच्या अपेक्षा आणि आत्मविश्वास वाढला आहे. मनसेच्या स्थापनेनंतर १६ वर्षात राज ठाकरेंनी कधीही विदर्भाचा एवढा विचार केला नव्हता म्हणून नेते आणि कार्यकर्ते दुरावले गेले होते. मात्र, त्यांच्या दौऱ्याने पुन्हा तरुण कार्यकर्त्यांची फौंज तयार होणार आहे असा अंदाज वर्तवला जात आहे.
मी विदर्भात पुन्हा येईल - दोन वर्ष कोरोनात गेली त्यामुळे विदर्भाकडे दुर्लक्ष झाल्याचे राज ठाकरे यांनी मान्य केला आहे. मात्र,पुन्हा अशी चूक होऊ देणार नाही अशी देखील ग्वाही त्यांनी दिली आहे . कोल्हापूर आणि कोकण दौरा आटोपल्यानंतर पुन्हा एकदा विदर्भाचा दौरा करणार असल्याचं त्यांनी जाहीर केल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह वाढलेला आहे.
कार्यकर्ते केंद्रबिंदू मानून - राज ठाकरे यांनी नागपूर दौऱ्यात प्रत्येक कार्यकर्त्यांचं म्हणणं अगदी गांभीर्य आणि ऐकून घेतलं. अनेकांनी स्थानिक नेत्यांच्या संदर्भात तक्रारीचा पाढाचं वाचला,त्यामुळे राज ठाकरे यांनी नागपूरची अख्खी कार्यकारांनीच बरखास्त केली. लवकरच नवीन कार्यकारणी जाहीर केली जाणार आहे, यावरून राज ठाकरे नागपूर आणि विदर्भ संदर्भात गंभीर असल्याचं चित्र निर्माण झालं आहे.
महानगरपालिकेत मनसेची ताकद वाढणार - विदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला खूप मोठी संधी आहे असा दावा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते प्रकाश महाजन यांनी केलेला आहे. विदर्भात पक्षाची मोर्चे बांधणी आणि कार्यकर्त्यांची फौज उभी होईल. महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने पक्षाची मोर्चे बांधणी होणार आहे. राज ठाकरे यांच्या विदर्भ दौऱ्यामुळे कार्यकर्त्यांचं मनोबल उंचावलं असून याचा थेट परिणाम निवडणुकीच्या निकालांमध्ये दिसेल असा दावा प्रकाश महाजन यांनी केला आहे.
मनसेची मरगळ दूर झाली - 2007 आणि 2012 साली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे दोन नगरसेवक नागपूर महानगरपालिकेत होते. मात्र, त्यानंतर पक्ष नेतृत्वाचे विदर्भाकडे किंबहुना नागपूरकडे दुर्लक्ष झालं, त्यामुळे नागपुरात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा विस्तार होऊ शकला नाही. मात्र, आता राज ठाकरे स्वतः जातीन विदर्भाच्या राजकारणात लक्ष घालत असल्यामुळे कार्यकर्त्यांवर आलेली मरगळ दूर झाली असल्याचे मत ज्येष्ठ पत्रकार विकास वैद्य यांनी व्यक्त केला आहे.