Sangeeta Patil Story : स्वतःचा जीव धोक्यात घालून तिने केली आखाती देशात तस्करी झालेल्या महिलांची सुटका, वाचा संपूर्ण सुटकेचा थरार

author img

By

Published : Mar 17, 2023, 11:02 PM IST

Sangeeta Patil Story

संगीता पाटील या भारतीय महिलेने थेट आखाती देशांमध्ये घुसून हजारो मुलींची आणि महिलांची सुटका केली आहे. आखाती देशांमध्ये तस्कर करून नेलेल्या महिला आणि मुलींच्या सुटकेसाठी या महिलेने लढा दिला आहे.

संगीता पाटील माहिती देताना

मुंबई : सध्या राज्याच्या विधिमंडळात लव्ह जिहादवरून गदारोळ सुरू आहे. भारतातील अनेक मुली तसेच महिलांची फसवणूक करून इतर देशांमध्ये विकल्या जात असल्याचा आरोप सत्ताधारी पक्षाकडून केला जात आहे. या आरोपांवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी सुरू असतानाच एक महिला मात्र आखाती देशांमध्ये तस्कर करून नेलेल्या महिला आणि मुलींसाठी लढा देत आहे. या अस्सल मराठी महिलेने थेट आखाती देशांमध्ये घुसून हजारो मुलींची आणि महिलांची सुटका केली आहे. या महिलेने थेट आखाती देशांमध्ये जाऊन भारतीय महिलांची सुटका केली आहे.

कोविडनंतर तस्करीचे प्रमाण वाढले : संगीता पाटील असे या धाडसी महिलेचे नाव असून त्या मुंबईमध्ये एका सामाजिक संस्थेसाठी काम करतात. आपल्या या थरारक प्रवासाबाबत ईटीव्हीसोबत बोलताना संगीता पाटील यांनी सांगितले की, कोरोना काळात लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे अनेकांचे रोजगार गेले. त्यावेळी रोजगारासाठी अनेक जण इतरत्र संधी शोधत होते. यामध्ये सुशिक्षित लोकांची संख्या अधिक होती. याच काळात सुशिक्षित महिलांना आखाती देशांमध्ये नोकरीचे आमिष दाखवून त्यांची तस्करी करण्याच्या घटना देखील मोठ्या प्रमाणात वाढल्या. मला जेव्हा या तस्करीबाबत माहिती मिळाली तेव्हा मी या संपूर्ण विषयावर आधी अभ्यास केला. त्यानंतर मी ओमानमध्ये जाऊन या महिलांची सुटका करण्याचा निर्णय घेतला.

जस्ट डायल महत्वाचा दुवा : पुढे बोलताना संगीता पाटील म्हणाल्या की, मी जेव्हा या संपूर्ण प्रकरणांचा अभ्यास केला त्यावेळी माझ्या लक्षात आलं, ही जी काही तस्करी झालेली आहे त्याच्यामध्ये एक समान दुवा आहे. तो म्हणजे 'जस्ट डायल' हा नंबर. यातील बहुतांश लोक हे जस्ट डायलच्या संपर्कातून एजंटला कनेक्ट झाले आणि त्या एजंटने या महिलांची आखाती देशांमध्ये विक्री केली. त्यामुळे या महिलांनी ज्या प्रकारे आखाती देशांमध्ये जायला जे काही केलं तेच मी करण्याचं ठरवलं. त्याच घटना क्रमाप्रमाणे मी देखील जस्ट डायलशी संपर्क साधला. त्यांनी मला काही एजंटचा नंबर दिला जे आखाती देशांमध्ये तुम्हाला नोकरी देतात.


ओमानमध्ये मजुरांची कमी : आम्ही जेव्हा संगीता पाटील यांना आखातीन देशांमध्ये नोकरी देतात म्हणजे नोकरीचे नेमकं स्वरूप काय असतं? हा प्रश्न विचारला असता त्यांनी सांगितलं की, "ही नोकरी म्हणजे घरकाम, नर्स, केअर टेकर अशा स्वरूपाची असते. ओमान हा एक श्रीमंत देश आहे. त्यामुळे त्या देशांमध्ये जवळपास सर्वच लोक अरबपती आहेत. त्या देशात खालच्या दर्जाची काम करायला हलकी काम करायला कोणीही स्थानिक मजूर नाहीत. त्यामुळे त्यांना मजुरांची मोठ्या प्रमाणात आवश्यकता असते. मला जस्ट डायल कडून नंबर मिळाल्यानंतर मी काही एजंटची संपर्क साधला. तेव्हा एजंटने मला ओमानमध्ये जाण्याचं कारण विचारलं. मी त्यांना नोकरी हे कारण सांगितले.


3 लाखात माझी विक्री : सुटकेचा थरार सांगताना संगीता पाटील पुढे म्हणाल्या की, एजंटने सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून माझा पासपोर्ट विजा तयार केला आणि माझ्या विमानाचे तिकीट काढून दिला. मी जेव्हा ओमानमध्ये पोहोचले त्यावेळी एक साधारण 23 ते 25 वयाचा तरुण मला घेण्यासाठी ओमान विमानतळावर आला होता. त्याची भाषा मला कळत नव्हती माझी भाषा त्याला कळत नव्हती. मात्र, त्याच्याकडे माझा फोटो होता आणि माझ्याकडे त्याचा फोटो होता. तो मला ओमान विमानतळापासून जवळपास 60 ते 70 किलोमीटर दूर असलेल्या एका शहरात घेऊन गेला. तिकडे गेल्यावर मला कळाले की माझी तीन लाख रुपयांमध्ये विक्री करण्यात आली आहे.


घरच्यांना देखील माहिती नाही : पुढे बोलताना संगीता पाटील यांनी सांगितले की, जेव्हा तो तरुण मला भेटला त्यावेळी त्याने माझा पासपोर्ट काढून घेतला होता. मात्र, माझा मोबाईल माझ्याकडे होता. मी घरी खोटे सांगून बाहेर पडले होते. पोलिसांना देखील खोटे सांगितले होते. मी सर्वांना नोकरीचे कारण देऊन ही रिस्क घेतली होती. मात्र, माझ्या संघटनेच्या कार्यकर्त्यांच्या मी संपर्कात होते. मी काय करते, कुठे जाते याची इतमभूत माहिती मी त्या सर्व कार्यकर्त्यांना वेळोवेळी देत होते. आमच्याच संघटनेचा एक कार्यकर्ता ओमानमध्ये आहे. तो सतत माझ्या संपर्कात होता. मी सर्वांना सांगून ठेवलं होतं जर दोन दिवस माझ्याशी संपर्क होऊ शकला नाही तर समजून जायचं मी संकटात आहे. त्यानुसार सर्व अलर्ट होते.


अनेक महिलांवर अत्याचार : संगीता पाटील यांनी सांगितले की, मी जेव्हा ओमानमध्ये गेले त्यावेळी त्यांनी मला एका रूममध्ये ठेवले. या रूममध्ये माझ्यासारख्याच आणखी काही भारतीय महिला होत्या. त्या सर्व इतर राज्यातील होत्या. या महिला मला सांगत होत्या ताई तुम्ही इकडे येऊन चूक केलीत. तुमची फसवणूक करण्यात आली आहे. तेव्हा मी त्या महिलांना धीर देऊन सांगितले माझी फसवणूक नाही झाली. मी तुमची सुटका करण्यासाठी इथे आली आहे. तेव्हा त्या महिलांना काहीसा भावनिक आधार मिळाला. संताप जनक गोष्ट म्हणजे या महिलांना ज्या खोल्यांमध्ये ठेवण्यात आले होते. या खोल्यांना आत मधून कोणतीही कडी नव्हती. जो काही दरवाजा बंद व्हायचा तो बाहेरून बंद व्हायचा. त्यामुळे रात्री अपरात्री कोणीही या महिलांच्या खोलीमध्ये येऊ शकत होते. यातील अनेक महिलांवर अत्याचार करण्यात आले होते.


महिलांना गुलाम म्हणून राबवल जाते : संगीता पाटील यांनी सांगितले की, ही सर्व परिस्थिती बघून माझा निर्णय पक्का झाला. या महिलांची इथून सुटका करायची. त्यानुसार आतापर्यंत आम्ही 27 महिलांची सुटका केली आहे. यामध्ये पंजाब, केरळ, तामिळनाडू, हैदराबाद, महाराष्ट्र अशा विविध राज्यातील महिलांचा यात समावेश आहे. दुःख या गोष्टीच आहे की हे सर्व भारतातील काही मोठे लोक आणि ओमान मधील काही मोठे लोक यांच्या संमतीने होतं. ही तस्करी नवीन नाही. हे फार वर्षापासून चालत आलं आहे. मात्र, या महिलांची सुटका करणे हे एकाही नेत्याला मंत्र्याला वाटत नाही. ही खेदाची गोष्ट आहे. आज देखील हजारो महिला या आखाती देशांमध्ये कैदेत आहेत. त्यांना गुलाम म्हणून राबवले जाते.

60 टक्के मुस्लिम महिलांची तस्करी : सध्या राज्यात एका बाजूला लव्ह जिहाद हे वादाचे प्रकरण ठरत आहे. मात्र, यावरती कोणतच सरकार ठोस पावलं उचलत नाही. सत्ताधारी विरोधक यांच्यात सभागृहात गदारोळ फक्त सुरू राहतो. संगीता पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, तस्करी करण्यात आलेल्या महिलांमध्ये सर्वात जास्त प्रमाण हे मुस्लिम महिलांच आहे. त्यांनी सांगितले तस्करी करण्यात आलेल्या महिलांमध्ये 60 टक्के महिला या मुस्लिम समाजाच्या त्यांना आढळल्या. तर, 40 टक्के महिला या हिंदू होत्या. त्यामुळे या सर्व तस्करीच्या गुन्हेगारीकडे धार्मिक नाहीतर माणूस म्हणून बघण्याची गरज आहे.

सुशिक्षित तरुणांची देखील तस्करी : संगीता पाटील यांनी सांगितलेली आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे, "आखाती देशांमध्ये फक्त महिलाच नाही तर महिलांहून अधिक पुरुष देखील या आखाती देशांमध्ये गुलाम म्हणून अडकले आहेत. आम्ही फेब्रुवारी महिन्यात एका बीडच्या तरुणाची सुटका केली. तो आता पुन्हा आपल्या घरी परतला आहे. हा तरुण उच्चशिक्षित असून त्याला आपल्या देशामध्ये नोकरी नाही. त्यामुळे तो आखाती देशांमध्ये गेला आणि त्याची फसवणूक झाली. तिकडे तो सफाई कामगाराचे काम करत होता. मात्र, आमच्या संघटनेने त्याला मदत करून तो आता अखेर घरी परतला आहे.

माहिती देणे गरजेचे : शेवटी इतकाच सांगतो की, अनेकांना आर्थिक अडचणी असतात या अडचणी सोडवण्यासाठी अनेक जण परदेशात जातात. पण, पैसे कमवण्याच्या गडबडीत अनेक लोक हे विसरून जातात. आपण ज्या व्यक्तीच्या मार्फत परदेशात नोकरीसाठी जात आहोत त्या व्यक्तीची विश्वासार्थता किती आहे, हे देखील माहिती करून घेत नाहीत. त्यामुळे परदेशात जाण्याआधी जेव्हा पोलीस तुमच्या घरी व्हेरिफिकेशनसाठी येतात त्यावेळी तुम्ही पोलिसांना परदेशात कोणत्या ठिकाणी आणि कोणत्या कामासाठी जात आहे याची खरी आणि इत्यंभूत माहिती देणे गरजेचे आहे. कारण, आपल्या देशात स्वतःचा जीव धोक्यात घालून दुसऱ्याची सुटका करणाऱ्या संगीता पाटील फार कमी आहेत.

हेही वाचा : Mumbai HC order To MP Nimbalkar: खासदार रणजीत सिंह नाईक निंबाळकर यांना 30 मार्च रोजी उच्च न्यायालयात हजर होण्याचे निर्देश

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.