Republic Day 2023 : आज 74 वा प्रजासत्ताक दिन! वाचा, या खास दिवसाचे महत्व

author img

By

Published : Jan 25, 2023, 11:05 PM IST

Updated : Jan 26, 2023, 6:30 AM IST

Republic Day :

भारतात २६ जानेवारी या दिवसाला खास महत्त्व आहे. हा दिवस म्हणजे प्रजासत्ताक दिवस. या दिवशी नवी दिल्लीत डोळे दपून जावेत अशी परेड पाहायला मिळते. संपूर्ण जगाला भारताची काय ताकद आहे हे दिसते. याबरोबरच देशभरात अनेक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. देशातील नागरिक वेगवेगळ्या प्रकारे आपली देशभक्ती व्यक्त करतात. या दिवसाला भारतात विशेष महत्त्व आहे. कारण या दिवशी भारत पूर्णपणे स्वातंत्र झाला होता. मात्र, अनेकांना या दिवसाचे महत्त्व नक्की काया आहे हे विस्ताराने माहिती नाही.

मुंबई : २६ नोव्हेंबर १९४९ आणि २६ जानेवारी १९५० हे दोन दिवस भारताच्या इतिहासातील अत्यंत महत्त्वाचे दिवस आहेत. २६ नोव्हेंबर १९४९ रोजी घटना समितीने भारतीय राज्यघटनेचा स्वीकार केला. त्यानंतर दोनच महिन्यांत म्हणजेच २६ जानेवारी १९५० रोजी भारतीय राज्यघटनेची अंमलबजावणी केली. त्यानुसार भारत एक प्रजासत्ताक राष्ट्र बनले. या घटनांची आठवण म्हणून देशात २६ नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा करण्यात येतो. भारतीय राज्यघटनेच्या निर्मितीचा प्रवास हा अत्यंत खडतर होता.

२६ जानेवारीपासून भारताचे लोकशाही पर्व : स्वातंत्र्यांनंतर सार्वभौम भारताची राज्यघटना तयार करण्याचे काम तब्बल २ वर्षे ११ महिने आणि १८ दिवस सुरू होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखालील संविधान समितीने राज्यघटनेचा मसुदा तयार केला. हे संविधान २६ नोव्हेंबर १९४९ या दिवशी स्वीकृत करण्यात आले. देश १५ ऑगस्टला स्वतंत्र झाला असला तरी २६ जानेवारीपासून भारताचे लोकशाही पर्व खऱ्या अर्थाने सुरू झाले. भारत या दिवशी लोकशाही, सार्वभौम, गणराज्य बनला. म्हणून हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो.

भारताचा पहिला प्रजासत्ताक दिन : भारतात पहिला प्रजासत्ताक दिन १९५० साली साजरा करण्यात आला होता. १९५० रोजी आपल्याला भारताचं संविधान आणि डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्या रुपात भारताचे प्रथम राष्ट्रपती मिळाले होते. भारताच्या पहिल्या प्रजासत्ताक दिनापासून विविध देशातील राष्ट्राध्यक्ष आणि पंतप्रधानांना प्रमुख पाहुणे म्हणून बोलावण्याचीही परंपरा सुरू झाली. २६ जानेवारी १९५० रोजी या दिवशी संविधान लागू करण्यात आले, ज्याची अनेक कारणे होती. देश स्वतंत्र झाल्यानंतर २६ नोव्हेंबर १९४९ रोजी संविधान सभेने राज्यघटना स्वीकारली. त्याच वेळी २६ जानेवारी १९५० रोजी लोकशाही शासन प्रणालीसह संविधान लागू करण्यात आले. या दिवशी भारताला पूर्ण प्रजासत्ताक घोषित करण्यात आले. २६ जानेवारीला संविधान लागू करण्याचे मुख्य कारण म्हणजे १९३० मध्ये या दिवशी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने भारताच्या पूर्ण स्वातंत्र्याची घोषणा केली होती.

२६ जानेवारी १९५० रोजी संविधान लागू करण्यात आले : सन १९२९ मध्ये पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या माध्यमातून एक बैठक आयोजित करण्यात आली होती. ज्यामध्ये सर्वसंमतीने असे घोषीत करण्यात आले, की ब्रिटिश सरकारने २६ जानेवारी १९३० पर्यंत भारताला डोमिनियन दर्जा द्यावा. या दिवशी प्रथमच भारताचा स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात आला. १५ ऑगस्ट १९४७ ला स्वातंत्र्य मिळेपर्यंत स्वातंत्र्य दिन २६ जानेवारीलाच साजरा केला जात होता. २६ जानेवारी १९५० रोजी संविधान लागू करण्यात आले आणि २६ जानेवारी १९३० रोजी पूर्ण स्वराज्य घोषीत करण्याच्या तारखेला महत्त्व देण्यासाठी २६ जानेवारी हा प्रजासत्ताक दिन म्हणून घोषीत करण्यात आला.

भारत प्रजासत्ताक राष्ट्र बनला : ज्या संविधानाच्या अनुषंगाने आज देशात काम चालू आहे तो मसुदा भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून ओळखले जाणारे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी तयार केला. अनेक सुधारणा आणि बदलांनंतर, समितीच्या ३०८ सदस्यांनी २४ जानेवारी १९५० रोजी हस्तलिखित कायद्याच्या दोन प्रतींवर सह्या केल्या. त्यानंतर दोन दिवसांनी २६ जानेवारी रोजी तो देशात लागू करण्यात आला. २६ जानेवारी १९५० रोजी सकाळी १० वाजून १८ मिनिटांनी भारत प्रजासत्ताक राष्ट्र बनला. त्यानंतर बरोबर ६ मिनिटांनी १० वाजून २४ मिनिटांनी डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी भारताचे पहिले राष्ट्रपती म्हणून शपथ घेतली. या दिवशी, डॉ. राजेंद्र प्रसाद पहिल्यांदाच राष्ट्रपती म्हणून एका बग्गीतून राष्ट्रपती भवनातून बाहेर आले, जिथे त्यांनी प्रथमच लष्करी सलामी घेतली आणि त्यांना प्रथमच गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला. या दिवशी, तिरंगा फडकावण्याबरोबरच, राष्ट्रगीत गाणे, आपण भारतीय एकतर अनेक कार्यक्रम आयोजित करतो किंवा त्याचा भाग बनतो.

प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम सप्ताह : प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम सर्वसाधारणपणे २४ जानेवारीला राष्ट्रीय शौर्य पुरस्कार मिळालेल्या मुलांच्या नावाच्या घोषणेने सुरू होतो. मात्र यावेळी त्याची सुरुवात २३ जानेवारीला नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीपासून झाली आहे. आणि २५ जानेवारीच्या संध्याकाळी राष्ट्रपती राष्ट्राला संबोधित करतात. २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनाचा मुख्य कार्यक्रम आयोजित केला जातो. यादरम्यान राजपथावर परेड काढली जाते. २७ जानेवारी रोजी, पंतप्रधान परेडमध्ये सहभागी झालेल्या एनसीसी कॅडेट्सशी संवाद साधतात. आणि २९ जानेवारी रोजी रायसीना हिल्सवर बीटिंग द रिट्रीट कार्यक्रम आयोजित केला आहे. यादरम्यान तिन्ही सेवांचे बँड शानदार सुरांसह मार्चपास्ट करतात. यासह प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम संपतो.

हेही वाचा : Republic Day : ७४ वा प्रजासत्ताक दिन...तब्बल 3700 विद्यार्थ्यांनी साकारली महापुरुषांची प्रतिकृती

Last Updated :Jan 26, 2023, 6:30 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.