Maharashtra Politics : भीमशक्ती-शिवशक्तीच्या युतीनंतर शिंदे आणि फडणवीस दिल्ली दौऱ्यावर
Updated on: Jan 24, 2023, 10:31 AM IST

Maharashtra Politics : भीमशक्ती-शिवशक्तीच्या युतीनंतर शिंदे आणि फडणवीस दिल्ली दौऱ्यावर
Updated on: Jan 24, 2023, 10:31 AM IST
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी युतीची घोषणा केली. या युतीच्या घोषणेनंतर अवघ्या काही तासांतच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस तातडीने दिल्लीला रवाना झाले आहेत. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन ठाकरेंना रोखण्यासाठी प्रयत्न करावे, अशी विनंती करणार असल्याचे समजते.
मुंबई : शिवसेनेत पडलेल्या फुटीचा फायदा घेऊन भाजप आणि शिंदे गटाने पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना एकाकी पाडण्याची रणनीती आखली. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेतून शिवसेनेला हद्दपार करण्याचा भाजपचा प्रयत्न सुरू केला. परंतु, एकेकाळचे कट्टर विरोधक असलेले काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची भक्कम साथ ठाकरेंना मिळत आहे. भाजप आणि शिंदे गटाच्या या प्रयत्नांना उद्धव ठाकरे यांच्याकडून चोख प्रत्युत्तर दिले जात आहे. आता महाविकास आघाडीत वंचित आघाडीचा समावेश झाल्याने शिवसेनेची ताकद वाढली आहे.
शिवशक्ती आणि भीमशक्ती एकत्र : देशात हुकूमशाहीची राजवट सुरू आहे. केंद्रीय तपास यंत्रणांचा धाक दाखवून राजकीय नेतृत्व संपवण्याचा घाट घातला जातो आहे. वैचारिक प्रदूषण वाढले आहे. लोकशाहीला मारक ठरतील अशा गोष्टी दिवसेंदिवस वाढत आहेत. लोकशाहीचे पावित्र टिकवणे आणि राजकारणातील वाईट चालीरीती रोखण्यासाठी शिवशक्ती आणि भीमशक्ती एकत्र आल्याचे सांगत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी वंचित आघाडीसोबत युती केल्याचे स्पष्ट केले. प्रकाश आंबेडकर देखील भाजप आणि आरएसएसच्या मनुस्मृती हिंदुत्ववादाच्या विचारसरणीची चिरफाड केली.
शिंदे गटाची धडधड वाढली : काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस यानंतर वंचित आघाडी आगामी निवडणुकीच्या तोंडावर महाविकास आघाडीत सामील झाली आहे. त्यामुळे भाजप आणि शिंदे गटाची धडधड वाढली आहे. उद्धव ठाकरे यांना नामोहरण करण्याच्या अनेक क्लुप्त्या वापरून ही भाजपला अपेक्षित यश येत नाही. उलट उद्धव ठाकरे विरोधकांची मोट बांधणी करत, राज्यात भाजपविरोधी वातावरण तयार करत आहेत. भाजप त्यामुळे हतबल झाला असून आता थेट शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना रोखण्याच्या हालचाली दिल्लीतून सुरू झाल्याचे समजते.
शिंदे आणि फडणवीस दिल्लीला रवाना : याच पार्श्वभूमीवर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त तैल चित्राचे अनावरण केल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तातडीने दिल्लीला रवाना झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची आज भेट घेऊन नव्या राजकीय स्थितीवर चर्चा करणार आहेत. दरम्यान, उद्धव ठाकरे किंवा आदित्य ठाकरे यांच्या विरोधात केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवाईच्या फास आवळला जाईल, अशी राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. मात्र, या बैठकीत कोणती डाळ शिजणार, याकडे सर्वांचे लक्ष्य लागले आहे.
राज्यपालांच्या राजीनाम्यावर चर्चेची शक्यता : राज्यपाल पदावरून मुक्त करा, अशी विनंती भगतसिंह कोश्यारी यांची पंतप्रधान मोदी यांच्याकडे केली आहे. या संदर्भात राजभवनाने जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकातून राज्यपाल कोश्यारी यांनी ही माहिती दिली. त्यामुळे राज्यपाल राजीनामा देण्याच्या तयारी असल्याची चर्चा आहे. त्यामुळे पंतप्रधानांसोबत आणि गृहमंत्र्यांसोबतच्या भेटीत या विषयावर चर्चा होण्याची देखील शक्यता आहे.
हेही वाचा : Superstition Act : काही लोकांचे दुकाने बंद होतील म्हणून अंधश्रद्धा कायद्याला विरोध -जयंत पाटील
