World Economic Forum : मुख्यमंत्री- उपमुख्यमंत्र्यांचा दावोस दौरा; परकीय गुंतवणूक आणण्याचा राज्यसरकारवर दबाव

author img

By

Published : Jan 11, 2023, 8:27 PM IST

Chief Minister and Deputy Chief Minister

राज्यामध्ये सत्तांतर झाल्यानंतर सुरुवातीच्या काळात राज्यातले मोठे प्रकल्प गुजरातला गेल्यामुळे विरोधकांनी राज्यात मोठा गदारोळ घातला होता. त्यानंतर नुकतेच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही मुंबईत येऊन पाच लाख कोटींची गुंतवणूक उत्तर प्रदेशला नेली. यावरूनही राज्य सरकारवर टीका सुरू आहे. मात्र 16 ते 20 जानेवारी असा चार दिवसांचा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचा वर्ल्ड इकॉनोमिक फोरमसाठी दावोस दौरा असणार आहे. परकीय गुंतवणूक आणण्याचा राज्यसरकारवर दबाव असल्याचे सांगितले जात आहे.

मुंबई : राज्यातील प्रकल्प गुजरातमध्ये गेल्यानंतर राज्य सरकारवर मोठ्या प्रमाणात टीका केली गेली. दरम्यान काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ मुंबईत आले होते. त्यांनी पाच लाख कोटींची गुंतवणूक महाराष्ट्रातून उत्तर प्रदेशला घेऊन गेले. यामुळे देखील सरकारवर टीका केली जात आहे. तर दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस 16 ते 20 जानेवारी दरम्यान चार दिवस वर्ल्ड इकॉनोमिक फोरमसाठी दावोस दौऱ्यावर जात आहेत. या दौऱ्यातून राज्यात किती गुंतवणूक येणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले आहे.



महाविकास आघाडीवर आरोप : राज्यात सत्तांतर झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात येणारे उद्योग गुजरातसह इतर राज्यांमध्ये गेल्यामुळे विरोधकांनी सरकारी पक्षाला चांगलंच धारेवर धरले होते. राज्यात सत्तेत आलेल्या शिंदे फडणवीस सरकार केवळ विरोधकांना दडपण्याचा काम करत आहे. सत्तेत आल्यानंतर मोठ्या प्रमाणात राज्यातील उद्योग गुजरात मध्ये गेले गुजरात मध्ये असलेल्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातून हे उद्योग गुजरातला घालवले असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात आला. तर सत्ताधारी पक्षाने उद्योग राज्याबाहेर जाण्यामागे महाविकास आघाडी जबाबदार असल्याचा आरोप केला होता.

विरोधकांचा सरकारला सवाल : उद्योगांच्या मुद्द्यावर राजकारण तापले असतानाच काही दिवसापूर्वी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ जी - २० समिट मध्ये सामील होण्यासाठी मुंबईत आले. या त्यांच्या दोन दिवसीय दौऱ्यामध्ये त्यांनी मुंबईतील उद्योजकांशी बैठका घेऊन जवळपास पाच लाख कोटीची गुंतवणूक उत्तर प्रदेशमध्ये नेली. यामुळे विरोधक अजूनच आक्रमक झाले असून योगी आदित्यनाथ मुंबईत येऊन पाच लाख कोटींची गुंतवणूक घेऊन जातात. मात्र राज्य सरकार नेमके करताय काय? असा सवाल विरोधकांकडून राज्य सरकारला विचारला जाऊ लागला आहे.


वर्ल्ड इकॉनोमिक फोरमसाठी दावोसला : वर्ल्ड इकॉनोमिक फोरमसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 16 ते 20 जानेवारी दावोसला जाणार आहेत. या वर्ल्ड इकॉनॉमी फोरम मधून राज्यात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक आणण्याचा दबाव मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यावर असणार आहे. चार दिवसाच्या या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि उद्योगमंत्री उदय सामंत हे 15 तारखेला रवाना होणार आहेत. महाराष्ट्र सहित गुंतवणूक आपल्या इथे आणण्यासाठी केंद्र सरकारची टीम, आंध्र प्रदेश तामिळनाडू आणि तेलंगणा या राज्याच्या टीम देखील सामील होणार आहेत.

परकीय गुंतवणूकीचा दबाव : इतर राज्याच्या तुलनेने महाराष्ट्रात किती प्रमाणात विदेशी गुंतवणूक आली यावर संपूर्ण राज्याचे लक्ष असणार आहे. या चार दिवसीय दौऱ्यातून मोठ्या प्रमाणात राज्यात गुंतवणूक आणावी यासाठी खास करून देवेंद्र फडणवीस मोठ्या प्रमाणात प्रयत्न करत आहेत. केंद्रातून मंत्री स्मृती इराणी, मनसुख मांडवीय अनुराग ठाकूर आणि पियुष गोयल हे देखील दावोस मध्ये दाखल होणार आहेत. तर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे देखील आपल्या टीम सहित 16 जानेवारीला दावोसला पोहोचणार आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्यावर राज्यात मोठ्या प्रमाणात या दौऱ्यातून परदेशी गुंतवणूक यावी याचा दबाव असेल असे मत राजकीय विश्लेषक प्रवीण पुरो यांनी व्यक्त केले आहे.

मागील वर्षी 80 हजार कोटीची गुंतवणूक : राज्यात सत्तांतर होण्याआधी महाविकास आघाडी सरकार असताना शिवसेनेचे नेते आणि माझी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे तसेच उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी दावस येथे दौरा केला होता. चार दिवसीय दौऱ्यातून त्यांनी राज्यामध्ये 80 हजार कोटींची गुंतवणूक आणली होती. खास करून ई-मोबिलिटी, अक्षय ऊर्जा, बॅटरी उत्पादन, डेटा सेंटर, माहिती तंत्रज्ञान या क्षेत्रात ही गुंतवणूक आणली होती. अनेक जागतिक दर्जाच्या कंपन्यांसोबत राज्य सरकारने करार केले होते. त्यामुळे आता होणाऱ्या दौऱ्यात मुख्यमंत्र्यांवर यापेक्षाही अधिक किमतीचे गुंतवणूक आणण्याचा दबाव असणार आहे.

हेही वाचा - Job : खुशखबर! महापालिका, नगरपरिषदांमध्ये ४० हजार पदांची भरती; मुख्यमंत्र्यांची घोषणा



विरोधकांची दौऱ्यावरून टीका : मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री दावोसला फेरफटका मारायला चालले आहेत. मुंबईत येऊन उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ गुंतवणूक घेऊन जात आहेत. त्याआधी महाराष्ट्रात आलेले उद्योग गुजरातला पाठवण्यात आले. हे सर्व पाहता राज्यातल्या जनतेला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडून फारशा काही अपेक्षा नाहीत असा टोला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दावोस दौऱ्यावरून मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांना लगावला आहे. राज्यात उद्योग धंद्याची वाढ व्हावी परदेशी गुंतवणूक मोठ्या प्रमाणात राज्यामध्ये सुरू व्हावी यासाठी राज्य सरकार कोणतेही महत्त्वाचा पाऊल उचलत नाही असा टोलाही नाना पटोले यांनी लगावला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.