IIT Mumbai Student Suicide : आयआयटीतील विद्यार्थ्याच्या आत्महत्या प्रकरणी जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न, भाजपचा आरोप

author img

By

Published : Apr 12, 2023, 7:01 PM IST

bjp mla Ram Satpute Amar Sable

दर्शन सोळंकी या मुंबई आयआयटीतील विद्यार्थ्याच्या आत्महत्या प्रकरणात जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप भाजपचे आमदार राम सातपुते व आमदार अमर साबळे यांनी केला आहे. तसेच कॅम्पसमधील फुटीरतावादी गटापासून विद्यार्थ्यांनी सावध राहावे, अस सल्लाही त्यांनी दिला आहे.

मुंबई : आयआयटी मुंबईचा दलित विद्यार्थी दर्शन सोळंकी याने जातीय भेदाला कंटाळून 12 फेब्रुवारी 2023 रोजी आत्महत्या केल्याचा आरोप त्याच्या पालकांनी आणि दलित विद्यार्थी संघटनांनी केला आहे. मात्र या संदर्भात फुटीरतावादी गट आणि काही संघटना समाजात जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यांच्यापासून विद्यार्थ्यांनी सावध राहावे, असे भारतीय जनता पक्षाचे आमदार अमर साबळे व राम सातपुते यांनी म्हटले आहे. तसेच काँग्रेसचे माजी राज्यसभा खासदार व कुलगुरू डॉ. भालचंद्र मुणगेकर आणि या प्रकरणाचा पाठपुरावा करणाऱ्या संघटनांवर देखील त्यांनी आरोप केला आहे.

दर्शनची सुसाईड नोट सापडली : ते पुढे म्हणाले की, 'कुलगुरू डॉ. भालचंद्र मुणगेकर, काँग्रेस पक्षाचे गुजरातमधील आमदार जिग्नेश मेवाणी तसेच आयआयटी बॉम्बेच्या काही डाव्या आणि फुटीरतावादी गटांनी या प्रकरणी सत्य समोर येण्याआधीच समाजाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. दर्शनला न्याय मिळाला पाहिजे असे आमचे म्हणणे आहे. मात्र दर्शनचाच मित्र आरमान खत्री याच्याबद्दल दर्शनची एक सुसाईड नोट सापडली आहे. त्यामुळे उगीच दुसरीकडे बोट दाखवून खोटा प्रचार करू नये आणि समाजात तेढ निर्माण करू नये'. आयआयटी मधील डाव्या आणि फुटीरतावादी संघटना नेमकं तेच करत असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला आहे.

तपासात घरच्यांची भूमिका नोंदवली नाही : दर्शन सोळंकी याचा मृत्यू जातीय भेदभावातून झाला. याबाबतचा त्याच्या कुटुंबाने सातत्याने आरोप केला आहे. मात्र पोलिसांच्या तपासामध्ये तसेच आयआयटीने केलेल्या अंतर्गत तपासात देखील मृत दर्शनच्या घरच्यांची भूमिका नोंदवून न घेता तपास केला गेला. हा अहवाल वैज्ञानिक संस्थेने अवैज्ञानिकरित्या तयार केल्याचे त्यावेळेस म्हटले होते. तसेच माजी खासदार आणि कुलगुरू डॉक्टर भालचंद्र मुणगेकर यांनी देखील या अहवालावर सडेतोड टीका केली होती. त्यानंतर दर्शनच्या एका मित्राने दर्शनला धमकी दिल्याची बाब पोलिसांच्या तपासातून समोर आली. तो मित्र म्हणजे अरमान खत्री होता असे पुढील तपासात उघडकीस आले.

कुटुंबियांची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार : एसआयटीद्वारे स्थापन केलेल्या तपास पथकाने देखील दर्शनबाबतचे आमचे म्हणणे नोंदवून घेतले नाही, अशी तक्रार दर्शनच्या पालकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली होती. त्याच वेळेला राष्ट्रीय अनुसूचित जाती जमाती आयोग यांनी देखील आयआयटी मुंबई यांना दणका देत ॲट्रॉसिटी कायदा नुसार समुपदेशन केंद्रामधील एका व्यक्तीला निलंबित करण्याचे निर्देश दिले होते. तसेच ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत अनेक महत्त्वाच्या बाबींची कार्यवाही आयआयटी मुंबईने करणे अपेक्षित आहे, असे देखील त्या आदेश पत्रात नमूद केलं होतं.

हेही वाचा : Nagpur Vajramuth Sabha : नागपूरच्या वज्रमुठ सभेत गर्दीचा उच्चांक मोडला जाईल - खासदार विनायक राऊत

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.