लातूर - महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने प्रवाशांच्या सोईसाठी 'व्हिटीएस' अर्थात 'व्हीकल ट्रैकिंग सिस्टम' ही प्रणाली कार्यान्वित केली आहे. यामुळे प्रवाशांना याचा लाभ होणार आहे. या प्रणालीमुळे प्रवाशांना बसचे लाईव्ह लोकेशन कळणार आहे.
- प्रत्येक हालचालीवर सिस्टीमद्वारे नियंत्रण -
राज्य परिवहन महामंडळ प्रवाशांच्या सोयीसाठी 'लालपरी'ला हायटेक करत असून प्रत्येक बसमध्ये व्हिटीएस प्रणाली कार्यान्वित केली आहे. यामुळे प्रवाशांना आपल्या बसचे लाईव्ह लोकेशन तात्काळ समजणार आहे. बसस्थानकातून गाडी सुटल्यानंतर प्रवासादरम्यानच्या प्रत्येक हालचालीवर या सिस्टीमद्वारे बसवर नियंत्रण राहणार आहे.
- या गोष्टींची कळणार माहिती -
गाडीच लोकेशन, वेग, थांबा यासंबंधीची इत्यंभूत माहिती प्रवाशांना या प्रणाली द्वारे कळणार आहे. प्रवासादरम्यान चालक, वाहक हलगर्जीपणा करत असेल तर त्याची 'वॉर्निंग बेल' बसस्थानकात तात्काळ वाजणार आहे. शिवाय बसचा अधिकृत थांबा नसताना बस थांबली तर त्याची 'अलर्ट टोन' येणार आहे. प्रणालीतील या आधुनिक बाबींमुळे चालक-वाहकांच्या निष्काळजीपणालाही चाप बसणार आहे.
- सध्या लातूर आगारातून गाड्यांचे नियंत्रण सुरू -
लातूर आगारातही व्हिटीएस प्रणाली कार्यान्वित करण्यात आली असून बसस्थानकात डिजिटल बोर्ड लावण्यात आले असून प्रवाशांना आपल्या गाडीची माहितीही मिळत आहे. गत महिनाभरापासून या प्रणालीद्वारे लातूर आगारातून गाड्यांचे नियंत्रण सुरू झाले आहे. प्रवाशांच्या सोईसाठी 'व्हिटीएस' प्रणालीचे मोबाईल ॲपही लवकर कार्यान्वित होणार असल्याचे लातूर आगाराचे सहाय्यक वाहतूक अधीक्षक हनुमंत चपटे यांनी 'ई-टीव्ही भारत'शी बोलताना सांगितले आहे.
- 'व्हिटीएस' प्रणालीमुळे प्रवाशांना या गोष्टी कळतील -
- वाहकाने बस बेजबाबदारपणे चालवणे, विनाकारण थांबणे यावर निर्बंध येणार असल्याने गाड्या वेळेवर बस स्थानकात येतील व प्रवाशांची सोय होणार आहे. शिवाय गाडीचे ब्रेक डाऊन किंवा टायर पंक्चर झाल्याची माहितीही या प्रणालीमुळे कळणार आहे.
- रोजच्यारोज गाडीचे बुकिंग या प्रणालीद्वारे केले जात असून सदरील गाडीच्या चालक-वाहकाची माहिती त्यात आहे.
- गाडी बसस्थानकातून सुटल्यापासून परत येईपर्यंत तिच्यावर 'व्हिटीस' प्रणालीचे नियंत्रण असते.
- गाडीत प्रवासी नसताना किंवा थांबा नसताना चालक-वाहकांना कुठेही गाडी थांबवता येणार नाही. तसे झाल्यास थेट बसस्थानकात याची माहिती तात्काळ मिळणार आहे.
- प्रवाशांनाही आता बस स्थानकात गाडीची तासनतास वाट पाहावी लागणार नाही. गाडीला स्थानकात पोहोचण्यास किती वेळ लागेल याची माहिती प्रवाशांना या प्रणालीद्वारे कळणार आहेत.