जळगाव जिल्ह्यात डेंग्यूची साथ तीव्र; आरोग्य यंत्रणेची वाढली चिंता

author img

By

Published : Sep 21, 2021, 3:34 PM IST

Updated : Sep 21, 2021, 6:31 PM IST

dengue cases

जिल्ह्यात डेंग्यूचे संकट उभे राहिले आहे. पावसाळा सुरू झाल्यानंतर आतापर्यंत म्हणजेच, जून ते सप्टेंबर या 4 महिन्यांच्या काळात ठिकठिकाणी डेंग्यूच्या 30 पेक्षा अधिक रुग्णांची नोंद झाली आहे. चिंतेची बाब म्हणजे, जळगाव महापालिका हद्दीत गेल्याच महिन्यात झालेल्या सर्वेक्षणात डेंग्यू वेगाने हातपाय पसरत असल्याचे स्पष्ट झाले होते. जळगावात तब्बल 16 हजारांपेक्षा अधिक घरांमध्ये डेंग्यूच्या अळ्या आढळून आल्या होत्या.

जळगाव - जिल्ह्यात पावसाचा जोर कायम असल्याने साथीच्या आजारांनी डोके वर काढले आहे. कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात असला तरी डेंग्यूच्या आजाराने थैमान घातल्याने आरोग्य यंत्रणेची चिंता वाढली आहे. डेंग्यूसदृश आजाराच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. सप्टेंबर महिन्यात आतापर्यंत जिल्ह्यातून 50पेक्षा अधिक संशयित रुग्णांच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी 'एनआयव्ही'कडे पाठवण्यात आले आहेत. या नमुन्यांच्या अहवालांची प्रतीक्षा आहे. दुसरीकडे, खासगी रुग्णालयेदेखील डेंग्यूसदृश्य रुग्णांनी फुल्ल असल्याने आजाराची तीव्रता अधिक असण्याची शक्यता आहे.

जळगावात डेंग्यची साथ

दवाखाने रुग्णांच्या गर्दीने फुल्ल -

जिल्ह्यात डेंग्यूचे संकट उभे राहिले आहे. पावसाळा सुरू झाल्यानंतर आतापर्यंत म्हणजेच, जून ते सप्टेंबर या 4 महिन्यांच्या काळात ठिकठिकाणी डेंग्यूच्या 30 पेक्षा अधिक रुग्णांची नोंद झाली आहे. चिंतेची बाब म्हणजे, जळगाव महापालिका हद्दीत गेल्याच महिन्यात झालेल्या सर्वेक्षणात डेंग्यू वेगाने हातपाय पसरत असल्याचे स्पष्ट झाले होते. जळगावात तब्बल 16 हजारांपेक्षा अधिक घरांमध्ये डेंग्यूच्या अळ्या आढळून आल्या होत्या. शहरासह जिल्ह्यात थंडी-तापाचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर असून, दवाखाने रुग्णांच्या गर्दीने फुल्ल आहेत.

जिल्ह्यातील 130 अहवाल प्रलंबित -

प्रभारी जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. लांडे यांनी डेंग्यूच्या साथीविषयी 'ईटीव्ही भारत'ला माहिती देताना सांगितले की, जळगाव जिल्ह्यात जानेवारी ते सप्टेंबर या 9 महिन्यांच्या कालावधीत डेंग्यू सदृश्य आजाराची लक्षणे असलेल्या एकूण 390 संशयित रुग्णांच्या रक्ताचे नमुने घेण्यात आलेले होते. त्यात 42 रुग्णांचे अहवाल डेंग्यू पॉझिटिव्ह आढळून आले. यात 260 नमुने हे ग्रामीण भागातील तर 130 नमुने हे शहरी भागातील होते. पॉझिटिव्ह आढळलेल्या 42 नमुन्यांमध्ये 29 नमुने ग्रामीण भागातील व 13 नमुने शहरी भागातील होते. सध्या डेंग्यूची लागण झालेले 7 रुग्ण हे रुग्णालयात उपचार घेत आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यातील 130 नमुन्यांचा अहवाल प्रलंबित आहे, अशी माहिती डॉ. लांडे यांनी दिली.

हेही वाचा - जळगावात पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळली तीन मजली इमारत; पाहा व्हिडिओ

पावसाळ्यात वाढली डेंग्यूची तीव्रता -

जिल्ह्यात पावसाळा सुरू झाल्यानंतर म्हणजेच जून महिन्यापासून डेंग्यूचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर आढळून येत आहेत. जून महिन्यात 12 तर जुलैत 3, तर ऑगस्ट महिन्यात 11 रुग्ण आढळले होते. सप्टेंबरमध्येही डेंग्यूसदृश्य रुग्णांची संख्या वाढत आहे. आतापर्यंत जिल्ह्यातून 50 पेक्षा अधिक संशयित रुग्णांच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी एनआयव्हीकडे पाठवले आहेत. दरम्यान, जिल्ह्यात अलीकडेच दोन तरुणांचा डेंग्यूसदृश्य आजाराने मृत्यू झाला आहे. त्यातील एक तरुण हा यावल शहरातील तर दुसरा भुसावळ शहरातील रहिवासी होता.

डेंग्यूवर गुळवेल अधिक प्रभावी -

डेंग्यूच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत माहिती देताना जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे सहायक प्राध्यापक डॉ. मिलिंद कांबळे यांनी सांगितले की, डेंग्यूच्या आजाराने बाधित रुग्णाच्या रक्तातील प्लेटलेटसचे प्रमाण कमी होत असते. यात ताप येणे, डोकेदुखी, अंगावर पुरळ येणे अशी मुख्य लक्षणे असतात. आयुर्वेदात तापाचा ज्वर कमी करण्यासाठी गुळवेल हे अत्यंत प्रभावी औषध सुचवले आहे. गुळवेल सहजासहजी उपलब्ध होतो. गुळवेलचा रस किंवा त्याचे चूर्ण सहज बाजारात उपलब्ध असते. लहान मुलांना डेंग्यू प्रतिबंध म्हणून चॉकलेटपेक्षा आवळा, आवळ्याचा मुरब्बा खायला द्यावा. यात व्हिटॅमिन सी व शरीराला मजबूत करणारे अनेक घटक असतात. डेंग्यू झाल्यानंतर गुळवेलचा वापर खूप फायदेशीर ठरतो. डेंग्यूमध्ये आहाराची विशेष काळजी घ्यायला हवी. रुग्णाची पचनक्षमता कमी झाल्याने त्याला भूक लागल्यावरच थोडे-थोडे खायला द्यावे, यात सुरुवातीला डाळ किंवा भाताचे पाणी द्यावे. नंतर भूक व पचनक्षमता वाढल्यानंतर नियमित जेवण द्यावे, असेही डॉ. कांबळे यांनी सांगितले.

Last Updated :Sep 21, 2021, 6:31 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.