हिंगोली - जिद्दीने जर शेती केली तर यश हे हमखास येतेच, त्यामुळे अजिबात न डगमगता शेतीची कास धरून शेतात भगवा जातीच्या डाळींबाची लागवड केली. तिसऱ्या वर्षी पहिलाच बहर यशस्वी ठरला आहे. समाधानकारक डाळींबाला भाव मिळून डाळींबाने बांगलादेशची वाट धरली आहे.
राजेंद्र पाटील (रा. मालसेलू जि. हिंगोली) असे या शेतकऱ्याचे नाव आहे. पाटील यांना अगदी लहानपणापासूनच शेतीची आवड आहे. घरची परिस्थिती चांगली, मात्र पाटील यांचे सर्व लक्ष हे शेताकडे असायचे. सुरूवातीपासून सालगड्याच्या खांद्याला खांदा लावून पाटील यांनी शेतीचे काम केली. उच्च पदवीपर्यंत शिक्षण झाले. त्यानंतर सरकारी नोकरी न मिळाल्याने निराश न होता शेतीकडे लक्ष केंद्रित केले. तेव्हापासून पाटील यांनी अजिबात मागे वळून पाहिलेच नाही. ते केवळ शेतीतच नव्हे तर शेती बरोबरच राजकारणात देखील सक्रिय आहेत.
शेतीत नवनवीन प्रयोग करण्याचा जोपासला छंद
पाटील यांना शेतीचा फारच छंद आहे. ते नेहमीच शेतीत वेगवेगळे पीक प्रयोग करून, वर्षाकाठी 30 ते 35 लाख रुपयांचे उत्पन्न घेतात. त्यांनी गेल्या दोन वर्षापासून खरबूजाचे उत्पन्न घेण्यास सुरुवात केली आहे. यातून लाखो रुपयांचे उत्पन्न झाले असून तीन-दोन वर्षांपासून दोन एकरात भगवा जातीच्या डाळींबाची लागवड केली. त्या बागेची खूपच बरकाईने निगा केली. यामध्ये खताच्या मात्र, योग्य वेळी फवारणी, लवकर कळी तोड वेळेवरच पाणी याचे संपूर्ण नियोजन त्यांनी केले. त्यामुळे त्यांना यंदा पहिलाच बार अपेक्षेपेक्षा जास्त झाल्याचे पाटील सांगतात. यासाठी साधारणतः चार ते साडेचार लाख रुपये खर्च झला. अनुभव नसल्याने हा खर्च वाढला, मात्र आता अनुभव आल्याने कमी खर्चातही जास्त उत्पन्न कसे घेता येईल याचे नियोजन आता करणार असल्याचे पाटील यांनी सांगितले. मात्र खताच्या व औषधीच्या योग्य मात्रा दिल्याने एका डाळींबाच्या झाडाला तीस ते चाळीस किलो डाळींब लागल्याने शेवटी त्या झाडाला लाकडाचा आधार घेण्याची वेळ आल्याचे पहायला मिळाले.
शेतीच्या उत्पन्नात झालीय कमालीची वाढ
डाळींबाची बाग लावताना सुरुवातीला अवघड वाटले. आपल्याकडे बागेची निगा होईल की नाही, अर्ध्यातूंन बाग तोडण्याची वेळ तर असे एक ना अनेक प्रश्न बाग लावताना पडत होते. मात्र जिद्द सोडली नाही. लावगड करताच पाणी फवारणी, तिची सर्व निगा काळजीपूर्वक घेतली. 20 टनाची अपेक्षा होती मात्र 15 टन डाळींब निघाला. पहिलेच वर्ष असल्याने, बरे निघाले असेच म्हणावे लागेल. डाळींब चांगल्या दर्जाचे असल्याने, व्यापारी मागणी देखील प्रचंड करीत होते. मागणी वाढली म्हणून किंमत वाढली. जवळपास 78 रु प्रति किलोप्रमाणे डाळींबाची विक्री केली. तसेच यातून छाननी केलेल्या डाळींबाला देखील 40 ते 45 रु प्रति किलो भाव मिळाला. या सर्वांतून पाटील यांना 14 ते 15 लाख रुपयांचे उत्पन्न झाले आहे. खर्च वगळता दहा लाख रूपाचा निव्वळ नफा पाटील यांना मिळाला आहे. पहिल्याच वर्षी अपेक्षेपेक्षा जास्त उत्पन्न मिळाल्याचे सांगत बाग फुलवताना सुरुवातीपासूनच दोन तीन चुका झालेल्या आहेत. त्या चुका आता पुढील बार घेताना दुरुस्त करून झाडावरील सर्वच डाळींब फळाची एकच साईज कशी राहील यासाठी प्रयत्न करणार आहे. तर पाटील यांनी केलेल्या टोमॅटोला देखील यंदा चांगलीच मागणी वाढली आहे.
इतर शेतकऱ्यांना सल्ला
शेती ही तन मन धन लावून करत शेतात काय पिकतय या अगोदर बाजारात काय विकतय याचा शेतकऱ्यांनी सर्वप्रथम आढावा घेणे गरजेचे आहे. शेतीत फार काही कष्ट घेण्याची अजिबात गरज नाही. मात्र योग्य वेळ ही अजिबात वायाला जाऊ देता येत नाही. पारंपरिक शेती करत करत इतर ही निदान दोन एकरात तरी डाळींबाची बाग लावावी. तिची निगा करता करता अनुभव तर येतोच मात्र डाळींबाच्या बागेने साथ दिली तर नक्कीच आपले हजारोचे उत्पन्न लाखोंमध्ये वाढते. उत्पन्न वाढले तर शेतकऱ्याच्या डोक्यावरील कर्ज कमी होते अन आत्महत्या देखील करण्याचा विचार शेतकऱ्याच्या डोक्यात येणार नाही. निश्चितच आपल्या राज्यातील आत्महत्येचा आकडा कमी होण्यासाठी मदत होईल.