हिंगोली - नवरी-नवरदेव बोहल्यावर चढणार, त्याची अंतिम तयारी झालेली असताना अचानक वरतीमध्ये डीजेच्या तालावर नाचण्याच्या कारणावरून प्रचंड वाद निर्माण झाला. वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. तर काहींनी तलवारी काढल्या. यात चार ते पाच जण गंभीर जखमी झाल्याची धक्कादायक घटना सेनगाव तालुक्यातील तळणी येथे घडली. दरम्यान चौकशीसाठी आलेल्या पोलीस पथकाने चौकशी केली असता लक्षात आले की नवरी अल्पवयीन आहे. त्यामुळे हा विवाहच रोखला आहे.
मंडपात पोहोचायला उशीर - सेनगाव तालुक्यातील तळणी येथील मुलीचे लग्न सापटगाव येथील दत्तराव जाधव यांच्या मुलाशी जुळले होते. काल दुपारी 1 वाजता तळणी येथील आंबेडकर भवन येथे लग्नसोहळा पार पडणार होता. वधू पक्षाकडून लग्न वेळेवर लावण्याचा आग्रह होता. मात्र वर मंडळी लग्न मंडपात पोहोचण्यास उशीर झाला. वराकडील मंडळी डीजेमध्ये नाचण्यात व्यस्त होती. अनेकदा विनवणी करूनही वर मंडळींकडून दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे शाब्दिक वाद उद्भवला. त्या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले आणि वाद विकोपाला गेल्यावर काहींनी चक्क तलवारी काढल्या. शिवाय वऱ्हाडी मंडळीने घरावर दगडफेक देखील केली. यामध्ये चार ते पाच जण जखमी झाले. जखमींना तात्काळ शासकिय रूग्णालयात दाखल करण्यात आले.
वधु निघाली अल्पवयीन - घटनेची माहिती मिळताच नरसी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सुनील गिरी हे पथकासह घटनास्थळी पोहोचले. त्यांनी महिला व बालकल्याण विभागाला संपर्क साधून त्यांचेही पथक पाचारण करण्यात आले. जन्म तारखेची चौकशी केली असता वधु अल्पवयीन असल्याचे उघड झाले. त्यामुळे पथकाने हा विवाह रोखला अन् वधूच्या आई वडिलांचे समुपदेशन केले.
वराने केले पलायन - नवरदेव आपल्या जखमी मित्रांसोबत रुग्णालयात गेला. तर इकडे वधु कडील मंडळी वराची प्रतिक्षा करत बसले होते. बराच वेळ होऊनही फोनवर प्रतिसाद देत नव्हते. तर दुसरीकडे याप्रकरणी अजूनही गुन्हा दाखल झाला नसल्याचे नरसी पोलीस ठाण्याचे सपोनि सुनील गिरी यांनी सांगितले.