हिंगोलीत आणखी एका शेतकऱ्याची आत्महत्या, दोन वर्षात 73 शेतकऱ्यांनी स्वतःला संपवले

author img

By

Published : Sep 3, 2021, 9:41 AM IST

Updated : Sep 3, 2021, 9:51 AM IST

hingoli farmers suicide

हिंगोली जिल्ह्यामध्ये शेतकरी आत्महत्येचे सत्र सुरूच आहे. कोरोना काळात तब्बल 73 शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले आहे. अशातच गुरूवारी वसमत तालुक्यातील कोठारी येथील बद्रीनाथ पांडुरंग नरवाडे यांनी कर्जाला कंटाळून आत्महत्या केली आहे.

हिंगोली : जिल्ह्यामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून शेतकरी आत्महत्येचे सत्र सुरूच आहे. या कोरोना महामारीच्या काळामध्ये एक-दोन नव्हे तर तब्बल 73 शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले आहे. अशातच गुरूवारी वसमत तालुक्यातील कोठारी येथील एका अल्पभूधारक शेतकऱ्याने कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्याच्या स्थितीमध्ये शोकाकूल वातावरण निर्माण झाले आहे.

कर्जामुळे परिस्थिती डबघाईला

बद्रीनाथ पांडुरंग नरवाडे (वय ३० वर्षे. रा. कोठारी ता. वसमत) असं आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. नरवाडे यांच्या वडिलांकडे एकूण अडिच एकर शेती आहे. याच शेतीवर त्यांनी महाराष्ट्र ग्रामीण बँकेकडून 60 हजार रुपये कर्ज उचलले आहे. तसेच घर संसार चालविण्यासाठी मित्र व नातेवाइकाकडून पैसे उसने घेतले आहेत. मात्र पेरणीनंतर पावसाने ओढ दिली आणि नंतर अतिवृष्टी झाल्याने शेतातील हातातली उभे पीके जाण्याच्या मार्गावर आहेत. याच चिंतेमध्ये बद्रीनाथ गेल्या अनेक दिवसापासून राहत होते. अशाच त्यांना आपले घर कसे चालवायचे? हा प्रश्न पडला. याच नैराश्यातून त्यांनी आपल्या शेतात गळफास घेऊन मृत्यूला कवटाळले.

शेतात जाऊन येतो म्हणाले अन्...

बद्रीनाथ हे शेतामध्ये जाऊन पाहणी करून वेळेवर घरी परतत होते. नेहमीप्रमाणे ते शेतामध्ये जाऊन येतो असे म्हणून निघून गेले. मात्र बराच वेळ होऊनही ते घरी परतले नव्हते. त्यामुळे शेतामध्ये जाऊन नातेवाईकांनी पाहणी केली. तर बद्रीनाथ यांचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला. घटनेची माहिती मिळताच कुरूंदा पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक सुनिल गोपीनवार, सपोउपनी ए. टी. वाळके यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा केला आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. याप्रकरणी कुरुंदा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

अवघ्या दोन वर्षात 73 शेतकऱ्यांची आत्महत्या

हिंगोली जिल्ह्यांमध्ये शेतकरी हे चांगलेच अडचणीत सापडले आहेत. विशेष म्हणजे कोरोना महामार ने तर सर्वांचेच कंबरडे मोडले आहे. यामध्ये शेतकरी देखील अडकले आहेत. शेतमालाला भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. त्यामुळे घर-संसार चालवायचा कसा? हा प्रत्येक शेतकऱ्यासमोर प्रश्न उभा ठाकला आहे. अशा परिस्थितीमध्ये शेतकरी नैराश्यात जात आहेत. जवळपास या दोन वर्षांमध्ये तबल 73 शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले आहे. यामध्ये सन 2020 मध्ये एकूण 52 तर शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. यामध्ये 46 शेतकऱ्यांना शासनाकडून लाभ देखील मिळाला. 5 शेतकऱ्यांचे प्रस्ताव अपात्र ठरवण्यात आले आहेत. तर सन 2021 मध्ये ऑगस्ट महिन्यापर्यंत 21 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. यामध्ये 12 शेतकऱ्यांना शासनाचा लाभ देण्यात आला आहे. तर एक शेतकरी मात्र अपात्र असल्याची माहिती प्रशासनाकडून मिळाली आहे.

आत्महत्येचे मुख्य कारण

दिवसेंदिवस नैराश्य वाढत चालले आहे. त्यामुळे नैराश्य हेच आत्महत्येचे प्रमुख कारण दिसत आहे. शेतकऱ्याला नैराश्यामधून बाजूला जायचे असेल तर शेतकऱ्यांनी शेतीबरोबरच अनेक जोड व्यवसाय करणे हे गरजेचे आहे. केवळ शेतीवरच अवलंबून असल्याने, पिकांची नासाडी झाल्यानंतर शेतकरी नैराश्यात जात आहेत. त्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. यातून तणाव निर्माण होतो अन शेतकरी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलतो.

या कारणाने आणखी येते नैराश्य

नैसर्गिक आपत्ती व अशाश्वतता, फक्त शेतीवर अवलंबून राहणे, व्यवसायिकरित्या शेतीकडे न वळणे, स्वतः व्यापार न करणे, खर्चिक चालीरितींना बळी पडणे, लग्नात होणारा अवास्तव खर्च, हुंडा, अंध श्रद्धांमुळे होणारा खर्च देखील आत्महत्येसाठी प्रवृत्त करतो.

उपाययोजना

आपल्या स्वतःमध्ये जरी थोडाफार बदल जाणवला तर निश्चितच मानसोपचार तज्ज्ञांकडे जाऊन योग्य तो सल्ला घ्यावा. यामध्ये प्रामुख्याने आपल्याला कधी अडचण जाणवली तर आपल्या मित्र व नातेवाईकांना अडचणी सांगाव्यात. जेणेकरून यातून काही प्रमाणात का होईना मार्ग निघतोच. तसेच वारंवार नैराश्य येत असेल तर मानसोपचार तज्ज्ञांकडे जाऊन सल्ला घ्यावा. व्यसनाधीनतेने कोणताही चांगला उपाय होत नाही, तर माणूस त्याच्या बळी पडून स्वतःला संपविण्याच्या मागे लागतो. पारंपरिक शेती न करता व्यवसायिकरित्या शेती करावी, अंधश्रद्धेपासून दूर राहण्याचा सल्ला मानसोपचार तज्ज्ञ नरेंद्र नरोड यांनी दिला आहे.

हेही वाचा - 'रिकामी सिलिंडर घेऊन रस्त्यावर उतरणाऱ्या हेमा मालिनी, स्मृती इराणी आता कुठे आहेत?'

Last Updated :Sep 3, 2021, 9:51 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.