भाड्याने वाहन देताना काळजी घ्या अन्यथा तुमचा कट रचून होऊ शकतो खून!

author img

By

Published : Aug 20, 2021, 4:19 PM IST

हिंगोली खून

वाहन भाडेतत्वावर नेऊन त्याचा खून करून त्याच्याकडील वाहन लांबविले आहे. तर चालकाचा गळा आवळून खून करून एका उसाच्या शेतात मृतदेह फेकून देण्यात आला आहे. युसुफ नोरंगाबादी (रा. गरमाळ, ता. हिंगोली) असे मृताचे तर आकाश बाळासाहेब मस्के, जयराम गणेश शेळके आणि शिवाजी गणपत दशरथे अशी आरोपींची नावे आहेत.

हिंगोली - दिवसेंदिवस आलिशान गाड्या घेणाऱ्याची संख्या वाढत असली तरी ही भाड्याने वाहने नेणारेही काही कमी नाहीत. मात्र भाड्याने वाहन नेल्यानंतर तुमचा कट रचून खून केला जाऊन तुमचे वाहन लांबविले जाऊ शकते. अशीच घटना घडली आहे हिंगोली जिल्ह्यातील एका वाहन चालकासोबत घडली आहे. त्याचे वाहन भाडेतत्वावर नेऊन त्याचा खून करून त्याच्याकडील वाहन लांबविले आहे. तर चालकाचा गळा आवळून खून करून एका उसाच्या शेतात मृतदेह फेकून देण्यात आला आहे.

गळा आवळून खून

युसुफ नोरंगाबादी (रा. गरमाळ, ता. हिंगोली) असे मृताचे तर आकाश बाळासाहेब मस्के, जयराम गणेश शेळके आणि शिवाजी गणपत दशरथे अशी आरोपींची नावे आहेत. मिळालेल्या माहितीनुसार आरोपीने हिंगोली येथील जिल्हा परिषद मैदान परिसरातून 11 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजता परभणी येथे जाणे आहे, असे म्हणून नोरंगाबादी यांची स्कॉर्पिओ किरायाने नेत अपहरण केले. गाडी नेल्यानंतर आरोपीने बीड जिल्ह्यात चालक नोरंगाबादी यांचा गळा आवळून खून केला, अन् मृतदेह एका उसाच्या शेतात फेकून दिला. बरेच दिवस उलटूनही नोरंगाबादी हे घरी न परतल्याने त्यांच्या घरच्यांची हिंगोली शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.

पोलिसांनी गतीने फिरवली तपासाची चक्रे

तक्रार दाखल होताच पोलीस अधीक्षक राकेश कलासागर, अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे, सहायक पोलीस अधीक्षक यतीश देशमुख, उपविभागीय पोलीस अधिकारी विवेकानंद वाखारे, स्थानिक गुन्हे शाखेचे पो. नि. उदय खंडेराय यांच्या मार्गदर्शनाखाली स. पो. नि. अनिल काचमाडे, पो. उप. नि. शिवसांब घेवारे, किशोर पोटे, नितीन केनेकर, संभाजी लेकुळे आदी कर्मचाऱ्यांच्या पथकाने तपासाची चक्रे फिरवून प्रथम उस्मानाबाद जिल्ह्यात बेंबळी पोलीस स्टेशनअंतर्गत आरोपीने बेवारस सोडलेली स्कॉर्पिओ ताब्यात घेतली. नंतर हरवलेल्या व्यक्तीचा शोध सुरू केला. यामध्ये आरोपी आकाश मस्के (रा. अंबाजोगाई), जयराम शेळके (रा. दाती, जि. हिंगोली), शिवाजी दशरथे या तीन आरोपींना वेगवेगळ्या ठिकाणावरून पथकाने ताब्यात घेतले.

कारागृहातून बाहेर पडल्यानंतर सुरू केला व्यवसाय

पोलिसांनी ताब्यात घेतलेले हे तिन्ही आरोपी परभणी येथील कारागृहात शिक्षा भोगत होते. तिथेच त्यांची ओळख झाली. कारागृहाबाहेर पडल्यानंतर त्यांनी हा वाटमारीचा व्यवसाय सुरू केला. आरोपीने मृत नोरंगाबादी यांचे अपहरण केले, अन तिकडे नेऊन गळा अवळून खून केला. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्रातील चालक अन् मालक हादरून गेले आहेत.

भाडे ठरवताना काळजी घेणे गरजेचे

कोणीही भाड्याची गाडी ठरवण्यासाठी आले असता त्याचा संपूर्ण पत्ता, मोबाइल नंबर यासह त्याच्या आधार कार्डमधील माहिती, आधार कार्डची झेरॉक्सदेखील सोबत ठेवत आपल्या मालकाला मोबाइलद्वारे पाठवावी. तसेच भाडे कुठून कुठे नेण्यात येत आहे, याचीदेखील माहिती देत, कुठे वाहन थांबले तर मालकाशी अधून-मधून संपर्क साधण्याचे आवाहन हिंगोली पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.