bogus jobs scam chandrapur महाऔष्णिक वीज केंद्रातील प्रकल्पग्रस्तांना डावलून इतरांनाच नोकऱ्या, अधिकारी अडचणित

author img

By

Published : Sep 18, 2022, 4:55 PM IST

Updated : Sep 19, 2022, 4:59 PM IST

चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्रातील प्रकल्पग्रस्त भरती घोटाळा

चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्रात जमिनी जाणाऱ्या प्रकल्पग्रस्तांना नोकरी देण्याऐवजी बोगस कागदपत्रे सादर करून इतरांनाच नोकऱ्या देण्यात ( bogus jobs scam chandrapur ) आल्या. सामाजिक कार्यकर्ते बळीराज धोटे यांनी हा घोटाळा समोर आणला. मात्र त्यांच्यावर एका अधिकाऱ्याने तब्बल 25 कोटी मानहानीचा दावा ठोकला होता.

चंद्रपूर : चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्रात जमिनी जाणाऱ्या प्रकल्पग्रस्तांना नोकरी देण्याऐवजी बोगस कागदपत्रे सादर करून इतरांनाच नोकऱ्या देण्यात ( bogus jobs scam chandrapur ) आल्या. सामाजिक कार्यकर्ते बळीराज धोटे यांनी हा घोटाळा समोर आणला. मात्र त्यांच्यावर एका अधिकाऱ्याने तब्बल 25 कोटी मानहानीचा दावा ठोकला होता. मात्र, प्रशासनाच्या कागदपत्रांच्या पडताळणीच्या चौकशीत 188 पैकी तब्बल 100 जणांचे कागदपत्रे बोगस असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आता बळीराज धोटे हेच संबंधित अधिकाऱ्याला कोर्टात खेचण्याचा तयारीत आहे.

महाऔष्णिक वीज केंद्रातील प्रकल्पग्रस्तांना डावलून इतरांनाच नोकऱ्या, अधिकारी अडचणित

बड्या अधिकाऱ्यांवर कारवाई कधी होणार? जिल्हा पुनर्वसन अधिकारी कार्यालय आणि वीज केंद्रातील मानव संसाधन विभागातील बड्या अधिकाऱ्यांच्या संगनमतायाशिवाय इतका मोठा घोटाळा होणे शक्य नाही. समोर आलेला घोटाळा मोठा असून याची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे. मानव संसाधन उप महाव्यवस्थापक अरविंद वानखेडे आणि तत्कालीन जिल्हा पुनर्वसन अधिकारी यांच्या कार्यशैलीवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यामुळे या चौकशीत मोठ्या अधिकाऱ्यांवर कारवाई होते की, लहान कर्मचाऱ्यांना गळाला लावून हा तपास थांबतो याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.


वीज केंद्रातील मानव संसाधन विभाग, जिल्हा पुनर्वसन कार्यालय आणि दलालांच्या रॅकेटने बेरोजगारांकडून कोट्यवधी रुपये उकळले. प्रकल्पग्रस्त असल्याची बोगस कागदपत्रे तयार केली आणि वीज केंद्रात प्रशिक्षणार्थी म्हणून त्यांना नोकरी लावून दिली. मार्च 2021 मध्ये भरती झालेल्या 60 पैकी 25, तर नोव्हेंबर 2021 मध्ये निवड झालेल्या 128 उमेदवारांच्या यादीतील तब्बल 75 प्रकल्पग्रस्तांची कागदपत्रे बोगस असल्याचे आता समोर आले आहे. हा घोटाळा सामाजिक कार्यकर्ते बळीराज धोटे यांनी उघडकीस आणला. याप्रकरणात आधीच काही जणांना अटक झाली आहे.

3 नोव्हेंबर 2021 ला चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्रातील मानव संसाधन विभागाचे उप महाव्यवस्थापक अरविंद वानखेडे यांनी 128 प्रकल्पग्रस्त उमेदवारांची निवड यादी जाहीर केली. या वीज केंद्रात सुरुवातीला प्रशिक्षणार्थी म्हणून 15 हजार रुपये मानधनावर सामावून घेतले जाते. यादीतील अनेक प्रकल्पग्रस्त बोगस असल्याची शंका काहींना आली. ज्यांच्याकडे शेतजमीन नव्हती ते सुद्धा प्रकल्पग्रस्त म्हणून दाखविण्यात आले होते. या निवड यादीवर धोटे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आक्षेप घेतला. निवड प्रक्रियेत गैरव्यवहार झाला आहे. यात कोट्यवधी रुपयांची देवाणघेवाण झाली आहे, अशी तक्रार तत्कालीन ऊर्जामंत्री, महाजकोनचे व्यवस्थापकीय संचालक, वीज केंद्राचे मुख्य अभियंती पंकज सपाटे यांच्याकडे केली.

आमदार सुभाष धोटे ( MLA Subhash Dhote ) यांनी यासंदर्भात विधिमंडळात प्रश्न उपस्थित केला. त्यानंतर ऊर्जामंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिले. वीज केंद्राचे मुख्य अभियंता पंकज सपाटे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना यासंदर्भात पत्र लिहिले. मार्च आणि नोव्हेंबर 2021 मध्ये निवड झालेल्या प्रकल्पग्रस्त उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी करावी, अशी विनंती या पत्रात केली. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने जिल्हा पुनर्वसन अधिकारी विशाल मेश्राम यांनी या निवड यादीतील प्रकल्पग्रस्तांच्या कागदपत्रांची पडताळणी सुरु केली. तेव्हा या दोन्ही निवड प्रक्रियेतील एकूण एकूण 188 प्रकल्पग्रस्तांपैकी तब्बत 100 जणांची कागदपत्रे बोगस असल्याचे समोर आले.

या उमेदवारांना आता अपात्र ठरविण्यात आले. दरम्यान, हा भरती घोटाळा उघडकीस आणल्यानंतर वीज केंद्राच्या मानव संसाधन विभागाचे उपमुख्य महाव्यवस्थापक अरविंद वानखेडे यांनी धोटे यांच्यावर 25 कोटींचा मानहानीचा दावा ठोकला. सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. यासंदर्भात आता वानखेडे यांनी बोलण्यास नकार दिला. माझ्या अधिकारात ही बाब येत नाही, असे त्यांनी सांगितले. दुसरीकडे वानखेडे यांच्यावर अब्रुनुकसानीचा दावा ठोकण्याची तयारी धोटे यांनी केली आहे.



होय आमच्या विभागाकडून चूक झाली - मुख्य अभियंता : याबाबत वीज केंद्राचे मुख्य अभियंता पंकज सपाटे यांच्याशी संपर्क केला असता आमच्या विभागाकडूनही चूक झाल्याचे त्यांनी मान्य केले. याबाबत राज्यस्तरीय समिती नेमण्यात आली असून ती याची सखोल चौकशी करत आहे. त्यासाठी आमच्या विभाकडुन आम्ही पूर्ण सहकार्य करीत असल्याचे त्यांनी ईटीव्ही भारतला सांगितले.


सूत्रधार बनले प्रकल्पग्रस्त : याप्रकरणात आधीच दलाल गणेश दिवसे, सचिन पाचभाई , विशाल देवतेळे, भारत थेरे, जितेंद्र रायपुरे, जयवंत गणवीर, आकाश कासवटे आणि गणेश केदारपवार यांच्यावर दुर्गापूर पोलिस ठाण्यात भादंवी 420, 468, 471, 511 आणि 34 अंतर्गत गुन्हा दाखल झालेला आहे. विशेष म्हणजे, या रॅकेटचा सुत्रधार गणेश दिवसे याने स्वतः बोगस कागदपत्रे तयार करुन वीज केंद्रात नोकरी मिळविली आहे. मार्च 2021 पूर्वी 594 प्रकल्पग्रस्तांना प्रशिक्षणार्थी म्हणून वीज केंद्रात सामावून घेण्यात आले. तिथेसु्द्धा बोगस प्रकल्पग्रस्त आहे, असा दावा धोटे यांनी केली.

Last Updated :Sep 19, 2022, 4:59 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.