हिंदी दिवस विशेष : चंद्रपुरात बहुभाषिक मिनी इंडियाला जोडणारी 'हिंदी भाषा'; हिंदीच्या प्रभावाचा रंजक इतिहास

author img

By

Published : Sep 14, 2021, 7:20 PM IST

Hindi language day

चंद्रपूरसारख्या जिल्ह्यावर हिंदी भाषेचा मोठा पगडा आहे. येथे दोन अनोळखी मराठी व्यक्तींचा पहिला संवाद देखील हिंदीतूनच होतो. कुठल्याही भागावर एखाद्या भाषेचा प्रभाव आहे हे बघायचे असल्यास त्या ठिकाणी असलेली फलके, पाट्या, बोर्ड बघितले की लगेच कळते. चंद्रपुरात हिंदीत लागलेल्या पाट्या आणि फलके सहज बघायला मिळतात.

चंद्रपूर - चंद्रपूरसारख्या जिल्ह्यावर हिंदी भाषेचा मोठा पगडा आहे. येथे दोन अनोळखी मराठी व्यक्तींचा पहिला संवाद देखील हिंदीतूनच होतो. कुठल्याही भागावर एखाद्या भाषेचा प्रभाव आहे हे बघायचे असल्यास त्या ठिकाणी असलेली फलके, पाट्या, बोर्ड बघितले की लगेच कळते. चंद्रपुरात हिंदीत लागलेल्या पाट्या आणि फलके सहज बघायला मिळतात. ही सळमिसळ इतकी झालीय की मराठी भाषेमध्ये असलेल्या अनेक फलकांत हिंदी शब्द बेमालूमपणे मिसळल्याचे दिसून येते. आज हिंदी भाषा दिनानिमित्त चंद्रपूर जिल्ह्यावर या हिंदी भाषेच्या प्रभावावर प्रकाश टाकणार आहोत.

भारत देश हा विविध भाषा, संस्कृती, जाती, पंथ, संप्रदायाने नटलेला देश आहे. या भौगोलिक, सांस्कृतिक वेगळेपणाचा मिलाप जेव्हा होतो त्यावेळी एक वेगळीच संस्कृती निर्माण होत असते. याच आपापल्या वेगळेपणाच्या देवाणघेवाणीतून एक माणूस म्हणून आपण जवळ येतो. एकमेकांच्या वेगळेपणाला समजून घेतो, एकेमकांच्या गोष्टी स्वीकारू लागतो आणि पुढे एक समाज म्हणून आपण घडत असतो जातो. म्हणूनच आज मध्यप्रदेशातील इंदोरसारख्या शहरात मोठ्या संख्येने मराठी लोक वसलेले आहेत. मात्र, त्यांच्या भाषेच्या शैलीत आणि आपल्या भाषेच्या शैलीत मोठा फरक आहे. गोव्यासारख्या राज्यात पोर्तुगीज भाषेचा प्रभाव आहे. तिथे इंग्रजी मोठया प्रमाणात बोलली जाते. केरळ आणि तामिळनाडूमध्येही इतर भाषिक पर्याय म्हणून इंग्रजीचा वापर होतो. देशात सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या हिंदी भाषेचे देखील असेच आहे. प्रत्येक राज्यात या भाषेच्या शैलीत बदल होतो. मग तो उत्तरप्रदेश असो की मध्यप्रदेश, उत्तराखंड असो की बिहार. महाराष्ट्रा सारख्या मराठी राज्यातील पूर्व विदर्भावर हिंदीचा मोठा प्रभाव आहे. मराठी असो की अन्यभाषिक त्यात पहिला संवाद होतो तो हिंदीतूनच. क्या चल रहा है, कितने का दिया, भैया थोडा बाजू हटो ,असे संवाद अगदी सहज कानावर पडतात. चंद्रपूर जिल्ह्यातील हिंदी भाषेचा हा प्रभाव आहे. मात्र या प्रभावाला ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे.

चंद्रपुरात बहुभाषिक मिनी इंडियाला जोडणारी 'हिंदी भाषा'
गोंडकालीन इतिहासात बहुभाषिकतेचा प्रभाव -
चंद्रपूर जिल्ह्यावर गोंड राजांचे साम्राज्य होते. त्याकाळी मुघल साम्राज्यात गोंडकालीन राज्याची नोंद होती. अकबराने तयार केलेल्या ऐतिहासिक 'अकबरनामा' या ग्रंथात गोंडराज्याची नोंद आहे. मुघलांच्या दरबारी गोंड राज्याला मान्यता होती. त्यांना शाह नावाने उपाधी दिली जायची. म्हणूनच अनेक राजांच्या नावामध्ये याचा उल्लेख असतो. त्यावेळी मुघलांशी जो पत्रव्यवहार व्हायचा त्यावर हिंदी, मराठी, उर्दू, फारसी, पर्शियन भाषेचा प्रभाव होता. जशी व्यवस्था तसाच प्रभाव हा समाजावर पडत असतो. त्यामुळे या भागावर अनेक भाषांचा प्रभाव पडायला लागला.


हे ही वाचा - National Hindi language day - आज राट्रीय हिंदी भाषा दिन, पहा ईटीव्ही भारत'चा हा खास रिपोर्ट


हिंदी राज्यात सामावलेले चंद्रपूर -

जरी येथील बहुतांशी लोक मराठी बोलत असले तरी चंद्रपूर जिल्हा हा पूर्वीपासून हिंदी भाषिक प्रांतात येत होता. 1861 मध्ये ब्रिटिशांनी आपला कारभार चालवायला मध्य प्रांताची स्थापना केली. यात पूर्वीचा नागपूर, आताचा मध्यप्रदेश, छत्तीसगड समाविष्ट होता. त्यामुळे हिंदी भाषेचा प्रभाव येथे मोठया प्रमाणात होता. नंतर 24 ऑक्टोबर 1936 मध्ये मध्य प्रांत आणि मराठी भाषिक बेरार हा प्रांत आपसात जोडण्यात आला. ज्याला सीपी (सेंट्रल प्रोव्हिन्स) आणि बेरार असे म्हटले जाते. त्यावेळी राज्यकारभार चालविण्यासाठी अधिकृत भाषा म्हणून हिंदी आणि इंग्रजीचाच वापर व्हायचा. महाराष्ट्र राज्याची स्थापना होईपर्यंत म्हणजे 1960 पर्यंत चंद्रपूर जिल्हा हा याच प्रांताचा एक भाग होता. त्यामुळे येथील संस्कृती, बोलीभाषा, पेहराव, खानपान यावर हिंदी संस्कृतीचा पगडा आहे.

बहुभाषिक लोकांच्या संवादाचा दुआ ठरली हिंदी -

1870 साली चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्गुस कोळसा खान सुरू झाली. याच काळात छत्तीसगड येथे कोळशाच्या खाणी सुरू झाल्या होत्या. तेथील अनेक कुशल कामगार हे येथे येत होते. यानंतर जिल्ह्यात अनेक कोळसा खाणी सुरू झाल्यात. रोजगाराच्या शोधात अनेक राज्यातील लोक येथे स्थलांतरित झाले आणि ते येथेच स्थायिक झाले. आंध्रप्रदेशची सीमा जिल्ह्याला लागूनच असल्याने येथे तेलुगू भाषिक लोकांचेही वास्तव्य होते. जिल्ह्यात इतर मोठमोठे उद्योग सुरू झाले. कागदाचा कारखाना बल्लारपूर पेपरमिल, अंबुजा आणि एल अँड टी सिमेंट, मोठं मोठे पोलाद उद्योग असे उद्योगांचे जाळे पसरत गेले. त्यामुळे देशभरातील अनेक राज्यातील लोक येथे आले. त्यांच्या मूळ भाषेमध्ये संवाद होऊ शकत नव्हता. अशावेळी येथील हिंदीच्या प्रभावाची मोठी मदत झाली. हिंदी भाषाच इतर लोकांच्या संवादाचा दुवा ठरली. घुग्गुस, बल्लारपूर, मांजरी ही अशी ठिकाणे आहेत जिथे मराठीपेक्षा हिंदीच अधिक बोलली जाते.

हे ही वाचा - 14 सप्टेंबर : हिंदी दिवस का साजरा केला जातो?


व्यापार आणि व्यवसायाचा प्रभाव -

चंद्रपूर जिल्ह्यात व्यापारी वर्ग हा बहुतांशी हिंदीभाषिक आहे. त्यांच्या सोबत व्यवसाय, व्यवहार करणारे, त्यांच्या हाताखाली काम करणारे यांच्यावर देखील या भाषेचा प्रभाव पडला. आज व्यवहार आणि व्यावसायासाठी बहुतांशी हिंदी भाषेचाच उपयोग केला जातो.

चंद्रपूर जिल्ह्यात मिनी इंडिया -

चंद्रपूर जिल्हा हा खऱ्या अर्थाने देशाचे प्रतिनिधित्व करणारा जिल्हा आहे. कारण येथे प्रत्येक भाषेचा, प्रांताच्या व्यक्तीचे वास्तव्य आहे. पंजाबी, सिंधी, गुजराती, बंगाली, तेलुगू, तामिळ, कन्नड, उडिया, राजस्थानी, हरियाणवी, बिहारी, उत्तर भारतीय अशा सर्व भाषा प्रांताचे लोक येथे गुण्यागोविंदाने नांदत आहेत. या सर्व भाषिकांना जोडण्याचे काम हिंदी भाषेने केले आहे. या माध्यमातून एकमेकांची संस्कृती, राहणीमान, खानपान, पेहराव यांची आदानप्रदान झाली आहे, होत आहे. चंद्रपूर जिल्ह्याचे हे वैशिष्ट्य आहे. जे हिंदी भाषेच्या प्रवाहामुळे शक्य झाले.

अनेक मराठी साहित्यिक, मॅगसेसे पुरस्कार विजेते याच मातीतले -

हिंदीचा प्रभाव असला म्हणजे लोकांना मराठी येत नाही असे नव्हे. येथील आजही मुख्य भाषा ही मराठीच आहे. मराठी भाषेतील अनेक दिग्गज या जिल्ह्यातील आहेत. मानवी संवेदनांचे मर्म आपल्या कवितेतून रेखाटणारे कवी ग्रेस याच जिल्ह्यातील मातीतले. कवी वसंत आबाजी डहाके ह्यांचे तरुणपण येथेच गेले. मॅगसेसे पुरस्काराद्वारे सन्मानित समाजसेवी बाबा आमटे आणि असे अनेक दिग्गज याच मातीतून घडले आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.