औरंगाबाद - राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे आज औरंगाबादसह वैजापूर दौऱ्यावर आहेत. या दौऱ्याच्या आधीच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा कार्याध्यक्ष अभय पाटील चिकटगावकर यांनी पदाचा राजीनामा दिल्याने शहरात राजकीय खळबळ उडाली आहे. तसेच प्रदेशाध्यक्षांच्या कार्यक्रमात उपस्थित राहणार नसून पक्ष सोडण्याचे कारण वैयक्तिक असल्याचे अभय पाटील चिकटगावकर यांनी सांगितले.
अभय पाटील यांनी राजीनामा का दिला याबद्दल माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर यांच्याशी आमचे प्रतिनिधी यांनी संपर्क साधला असता, अभय पाटील यांनी राजीनामा का दिला हे मला सांगता येणार नाही. तुम्ही त्यांनाच विचारा. मी मात्र पक्षाचा एक सर्वसामान्य कार्यकर्ता आहे आणि शेवटपर्यंत असेल, असे ते म्हणाले. तसेच तुमच्यात काही राजकीय द्वेष आहे का? या प्रश्नावर म्हणाले, राजकीय द्वेष असते तर मी पक्षाचा आमदार असताना अभय पाटलांना तिकीट का दिले असते. हा सरळ साधा विषय आहे.