अमरावती - सोळा विविध वनस्पतींची सोळा पाने महादेवाला वाहून आज सुवासिनींनी हरितालिकेची पुजा केली. गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी निरंकार उपवास ठेवून सुवासिनी ही पुजा करतात.
आघडा, केनाच्या पानांना महत्व
हरतालिकेच्या पर्वावर नदी किंवा तलावातील वाळू घरी आणून महादेवची पिंड तयार केली जाते. या पुजेदरम्यान सोळा प्रकारच्या वनस्पतींची सोळा पाने महादेवाच्या पिंडीवर वाहण्यात येतात. यापैकी आघाडा आणि केना या वनस्पतीच्या पानांना सर्वाधिक महत्त्व आहे. यासोबतच धोत्र्याच्या फळालाही या पूजेत मान आहे.
महिला करतात रात्रभर जागरण
दिवसभर निरंकार उपास करून हरतालिकेचे व्रत करणाऱ्या महिला रात्रभर जागरण करून, देवाचे नामस्मरण भजन तसेच विविध कार्यक्रम साजरा करतात. या पर्वावर एकाच कुटुंबातील सर्व महिला एकत्र येतात. तसेच, अनेक ठिकाणी शेजारच्या महिला एकत्रित येऊन हरतालिकेची पूजा करतात. हरतालिके निमित्त महिला सजून-धजून महादेवाची आराधना करतात.
अशी आहे मान्यता
पार्वती मातेने महादेवाची प्राप्ती करण्यासाठी निरंकार उपवास करून व्रत केले होते. त्या व्रताचे नाव हरतालिका असल्याचे सांगितले जाते. यामुळेच हरतालिकेच्या पर्वावर महिला निरंकार उपास करून हरतालिकेची पूजा करतात, अशी माहिती निकिता उमक यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना दिली. निकिता उमक यांच्या घरी मोनिका उमक, प्रीती गवई, दामिनी श्रीखंडे, प्रगती उसगावकर ,जयश्री वानखडे, सारिका खेरडे या महिलांनी एकत्रित येऊन हरतालिकेची पूजा केली.