अकोला - जिल्ह्यातील लसीकरणाची टक्केवारी ही मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यात लसीकरणाची टक्केवारी वाढविण्यासाठी ॲक्शन प्लॅन तयार करण्यात आलेला आहे. नोव्हेंबर महिन्यात पूर्ण जिल्हा हा लसीकरण युक्त झाला पाहिजे, या दृष्टिकोनातून सर्वच कर्मचाऱ्यांना निर्देशित केलेले आहे. ग्रामीण भागामध्ये लसीकरणाची मोहीम तीव्र करण्यासाठी संबंधित कर्मचाऱ्यांना आदेशित केलेले आहे. जर एखादा कर्मचारी काम करत नसेल तर त्याचा गोपनीय अहवाल हा तहसीलदारांमार्फत प्राप्त झाल्यानंतर त्यांच्यावर कारवाई करणार असल्याचा इशारा निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी आज दिला आहे.
जिल्ह्यांमध्ये लसीकरणाच्या पहिला डोसची टक्केवारी ही 52% झालेली आहे. तर दुसरीकडे दुसरा डोस घेणाऱ्यांची संख्याही त्यापेक्षाही कमी आहे. जिल्ह्याचा लसीकरणामध्ये शेवटून पाचमध्ये क्रमांक लागत असल्यामुळे जिल्ह्यातील लसीकरण मोहीम ही नोव्हेंबर महिन्यात पूर्ण करण्यासाठी शासन कामाला लागले आहे. या संदर्भामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे नुकत्याच घेतलेल्या बैठकीमध्ये जिल्ह्यातील लसीकरणाचे प्रमाण वाढविण्या संदर्भात सूचना केलेल्या आहेत. त्यासाठी ऍक्शन प्लॅन तयार करण्याचेही त्यांनी सांगितले आहे. या धर्तीवरच निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांच्या नेतृत्वामध्ये तसेच आरोग्य अधिकार्यांच्या देखरेखीखाली ऍक्शन प्लॅन तयार करण्यात आलेला आहे. त्या नुसार जिल्ह्यातील प्रत्येक गावात प्रत्येक घरात जाऊन लसीकरण झाले किंवा नाही या संदर्भात माहिती घेण्यात येणार आहे. दोन जणांचे एक पथक हे लसीकरणासाठी तयार राहणार आहे.
लसीकरणाच्या संदर्भामध्ये काम न करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे तक्रार किंवा त्या संदर्भात माहिती मिळाल्यास त्याचा गोपनीय अहवाल तयार करून संबंधित कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी दिला आहे. जिल्ह्यातील लसीकरण मोहीम तीव्र करण्यासाठी हा उपक्रम घेण्यात येत असल्याचे ते म्हणाले आहे. त्यासोबतच प्रत्येक कर्मचार्याच्या घरात लसीकरण झाले किंवा नाही झाले या संदर्भात ही माहिती घेण्यात येणार आहे आणि त्यांना लसीकरण करून घेण्याचेही सांगण्यात येणार आहे. प्रत्येक शाळा आणि महाविद्यालयांमध्ये पण लसीकरण मोहिमेचा संदर्भामध्ये माहिती घेऊन संबंधितांना लसीकरणासाठी प्रोत्साहित करण्याचे काम करण्यात येणार आहे. लसीकरण मोहीम ही तीव्र करून त्यामध्ये जिल्ह्यातील लसीकरण पूर्ण करण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्हा लसीकरण नियुक्त करण्यासाठी ही मोहीम प्रभावीपणे राबविण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.