सांस्कृतिक दहशतवादाचा बळी, किरण माने!

author img

By

Published : Jan 14, 2022, 12:04 PM IST

किरण माने

देशाचे नागरिक म्हणून आपली मते मांडण्याचा प्रत्येकाला अधिकार आणि स्वातंत्र्य आहे. पंरतु वेगळे मत मांडले गेले तर त्यावर तुटून पडणे, ट्रोल करणे आणि धमक्या देणे असे अनुभव अनेकवेळा येत असतो. असाच अनुभव अभिनेता किरण माने यांना सध्या येतोय. इतेच नाही तर ते मालिकेत काम करीत असलेल्या वाहिनीवरही दबाव आणून त्यांना मालिकेतून बाहेरही काढण्यात आलंय. याबद्दल आमच्या प्रतिनिधीने त्यांच्याशी केलेली बातचीत..

मुंबई - आजचा समाज व्यक्त होतोय. समाजाला सोशल मीडिया हे उत्तम माध्यम मिळालेय ज्यावर अनेकजण बिनदिक्कत व्यक्त होताना दिसताहेत. समाज माध्यमांच्या लोकप्रियतेमुळे अनेक चांगल्या वाईट गोष्टी, वाईट जास्त, घडताना दिसत आहेत. ट्रोलिंग आणि ‘पाठी लागणे’ हे नित्याचे झाले असून त्यामुळे मनोरंजनसृष्टीतील अनेकांचे बळी जाताहेत. नुकताच असा एक बळी गेलेला दिसतोय, जो आहे अभिनेते किरण माने यांचा, ज्याला सांस्कृतिक दहशतवादाचा बळी म्हणता येईल. यासंदर्भात आमचे प्रतिनिधी कीर्तिकुमार कदम यांनी अभिनेते किरण माने यांच्याशी संवाद साधला. स्टार प्रवाह वाहिनीच्या प्रतिसादाची वाट बघत असताना हे लिहिले गेलेय.

किरण माने
किरण माने
“मी पुरोगामी विचारांचा माणूस आहे. छत्रपती शिवराय, शाहू, फ़ुले, आंबेडकर, तुकोबा राया, ज्ञानेश्वर माउली यांच्या विचारांना फॉलो करतो. मी ते विचार सोशल मीडियावर मांडत असतो, अगदी तुकारामाचे विद्रोही अभंग सुद्धा. ज्या अभंगामुळे एका विशिष्ट विचारधारेच्या माणसांनी त्यांना त्रास दिला ते अभंग मी पोस्ट करीत असतो. ज्या विचारधारेनं शिवरायांच्या राज्याभिषेकाला नकार त्याबद्दल मी व्यक्त होत असतो. परंतु जे मी बोलतो ते बऱ्याच जणांना खपत नाही. माझी ही विचारधारा बऱ्याच जणांना मान्य नाही. मी कधीही कुणाला किंवा कशावरही अश्लील अथवा अर्वाच्य भाषेत टीका करीत नाही. प्रत्येक माणसाकडे एक राजकीय भूमिका असते तशी माझीही आहे. आणि ती असावी आणि आपली मतं मांडण्याचा अधिकार जोपासावा. संविधानानं मला सत्ताधाऱ्यांवरदेखील टीका करण्याचा अधिकार दिलाय’, किरण माने सांगत होते.

ते पुढे म्हणाले, “आम्ही कॉलेजात असताना नाटकं करायचो आणि राजीव गांधींवर टीका करणारी नाटकं पण केलीयेत. परंतु त्यावेळेला आम्हाला कोणीही, तत्कालीन सत्ताधाऱ्यांनीही, अडविलं नाही. परंतु आत्ताच असं का घडतंय, की एक विचारधारेला विरोध ‘वाटला’ की लगेच ‘अंगावर धावून येणं’ होतं. ३-४ दिवसांपूर्वी मी एक ‘राजकीय’ खोचक-तिरकस-विनोदी पोस्ट टाकली होती. कोणीतरी ग्रह करून घेतला की ती त्यांच्या नेत्याबद्दलच आहे आणि मला आई-बहिणीवरून शिव्या घातल्या गेल्या. ‘तू समजतो कोण स्वतःला, तुझी बायको अशी, तुझी आई तशी’ अशा पद्धतीने ट्रोलिंग सुरु झाले. बऱ्याचदा अशावेळी बरेच जण माघार घेतात परंतु माघार घेणाऱ्यांपैकी मी नाहीये. मी ‘लॉजिकली’ प्रत्युत्तरं देतो. माझी एका प्रसिद्ध चॅनेलवर ‘मुलगी झाली हो’ ही सिरीयल सुरु आहे. यातून काढून टाका असे कॅम्पेन त्यांनी सुरु केले. मी बधत नाही असे बघून, कदाचित, त्यांनी त्या चॅनेलवर दबाव टाकला असावा. आणि मला निरोप आला की मला मालिकेतून अर्धचंद्र देण्यात आला आहे.”

साधारणतः कोणाचा दबाब येण्याची शक्यता वाटते असे विचारल्यावर त्यावर बोलताना माने म्हणाले, “राजकीय पोस्ट करतो म्हणून एका महिलेनं तक्रार केली असं मला कळलंय. अजूनतरी अधिक माहिती समोर आलेली नाही. या घटनेमुळे खचायला झालं किंवा नैराश्य आलं असं अजिबात नाहीये. मी छत्रपती शिवराय, शाहू, फ़ुले, आंबेडकर यांच्या विचारांचा भोक्ता आहे त्यामुळे मी कधीच खचून जाणार नाही. मी सोशल मीडियावर टाकलेली पोस्ट हेच सांगतेय.”

याचे परिणाम काय होतील याबद्दल किरण माने यांना चिंता नाही. “खरंतर माझ्यावर विनाकारण आघात झालाय. परंतु आता मला हे बघायचंय की इंडस्ट्रीमधील किती लोकं माझ्या पाठीशी उभे राहतात. कारण आज माझ्यावर ही वेळ आलीय ती उद्या त्यांच्यावरपण येऊ शकते. आज माझा आवाज दाबला गेलाय, उद्या त्यांचा आवाज दाबला जाईल. आता टाकण्यात आलेली बंधनं भविष्यात वाढत जाण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात ही झुंडशाही ठेचायची हीच वेळ आहे”, किरण माने पोटतिडकीने सांगत होते.

या सर्व प्रकरणानंतर किरण माने यांनी सोशल मीडियावर अशी पोस्ट टाकली ज्याचे काही स्तरांतून कौतुक होतेय. त्यांनी लिहिले आहे की, “काट लो जुबान, आंसूओं से गाऊंगा.... गाड दो, बीज हूँ मैं, पेड बन जाऊंगा !”

हेही वाचा - ‘नाय वरनभात लोन्चा...'चे दिग्दर्शक महेश मांजरेकरांनी चित्रपटातील आक्षेपार्ह दृश्ये वगळली!

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.