Ujani Dam Issue : उजनीचे पाणी नेमकं कोणी पळवलं?; वाचा, काय आहे प्रकरण...

author img

By

Published : Jun 2, 2022, 8:31 PM IST

Ujani Dam

उजनी धरणातील पाणी वाटपावरून आधीच मराठवाडा विरुद्ध सोलापूर यांच्यात रणकंदन सुरू ( Ujani Dam Issue ) होते. मात्र, आता धरणातील पाणी हे पुणे जिल्हातील बारामती आणि इंदापूरकडे वळवण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला आहे.

सोलापूर - उजनी धरणातील पाणी वाटपावरून आधीच मराठवाडा विरुद्ध सोलापूर यांच्यात रणकंदन सुरू ( Ujani Dam Issue ) होते. मात्र, आता धरणातील पाणी हे पुणे जिल्हातील बारामती आणि इंदापूरकडे वळवण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला आहे. त्यामुळे जिल्ह्यात याविरुद्ध रोष व्यक्त होत आहे. त्यानिमित्ताने उजनीच्या पाण्याबाबत घेतलेला आढावा...

यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते पायाभरणी - महाराष्ट्रातील अनेक कोयना, जायकवाडी यासारखी मोठी धरणे आहेत. तसेच, उजनी हे प्रमुख धरण आहे. कृष्णा नदीची उपनदी असलेल्या भीमा नदीवर धरण बांधण्याचा आराखडा सर्वात पहिल्यांदा एका ब्रिटीश अभियंत्याने १९०२ साली तयार केला होता. त्या ब्रिटीश अधिकाऱ्याचे नाव होते एफ.एच.बोवेल. मात्र, भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 1960 साली महाराष्ट्र देखील वेगळे राज्य झाले, अन् त्याचे मुख्यमंत्री बनले यशवंतराव चव्हाण. यशवंतराव चव्हाणांनी ७ मार्च १९६४ साली पुणे-सोलापूर जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या माढा तालुक्यात उजनी धरणाची पायाभरणी केली. "विठ्ठला मला माफ कर बाबा, मी औचित्यभंग करतोय. तुझी चंद्रभागा मी अडवलीय मला पदरात घे," असे कुदळ मारताना यशवंतराव चव्हाणांनी म्हटलं. त्यानंतर १९८० साली ह्या धरणाचे काम पूर्ण झाले. १९८४ सालापासून उजनीत पाणीसाठा होऊ लागला. धरणाची पाणीसाठी क्षमता १२३ टीएमसी. उपयुक्त पाणीसाठा ५४ आणि मृतसाठा ६३ तर, अतिरिक्त पाणीसाठा ६ टीएमसी आहे. धरणाची सुरुवात झाल्यानंतर दुष्काळी असलेला सोलापूर जिल्ह्यात कृषीक्रांती झाल्याने शेतकऱ्यांची भरभराट झाली. उजनीच्या पाण्यावर शेतकऱ्यांनी उस, फळबागा यांसारख्या पिकांना प्राधान्य दिले. त्यामुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात सहकारी आणि खाजगी कारखाण्यांची उभारणी झाली.

अद्यापही 'या' भागातील योजना अपुऱ्या - सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळी भागाला आणि पिण्यासाठी पाणी हा उजनी धरण निर्मितीचा मुळ उद्देश होता. त्यातध्ये शेतील बारामाही पाणी देण्यात येत असे. मात्र, ते शक्य नसल्याने ८० च्या दशकात तत्कालीन मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांनी बारामाहीच्या व्यतिरिक्त आठमाही सिंचन योजना सुरु केली. त्याने दक्षिण सोलापूर, मंगळवेढा आणि अक्कलकोट सारख्या तालुक्यांना पाणी मिळण्याचा मार्ग खुला झाला. पण, अपुऱ्या सिंचन योजना, पाणीपुरवठ्यामुळे अद्यापही येथील परिसरात पाणी पोहचले नाही. तसेच, जिल्ह्यातील आष्टी, शिरापूर, सीना माढा, या उपसा सिंचन योजनेसह अनेक योजना अपुऱ्या आहेत. तसेच, सोलापूर शहर, मोहोळ आणि अन्य तालुक्याचा पाणी प्रश्न तसाच लटकला आहे. त्यातच बारामती आणि इंदापूरला पाणी देण्याचा निर्णय घेण्यात आल्याने वादाला तोंड फुटले आहे.

पाण्याची पळवापळवी - सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी असलेल्या उजनीतून सोलापूर शहरासह जिल्ह्यातील शेतीला पाणी देण्यात येते. मात्र, ज्या सोलापूर शहराला चार दिवसांतून एकदा पाणी येते, जिल्ह्यातील शेतकऱ्यांची तहान भागवली जात नाही, त्यातच उजनीतील पाण्याची पळवापळवी सुरु आहे. उजनी धरणातून मराठवाड्याला पाणी देण्याचा निर्णय यापूर्वीच झाला आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील कोळेगाव बंधाऱ्यात उजनी धरणातून पाणी दिले जाते. तसेच, २०१९ साली उजनी धरणातून लातूरला पाणी नेण्यासाठी ३६५ कोटींचा निधी मंजूर करण्यात आल्याची माहिती तत्कालीन पाणीपुरवठामंत्री बबनराव लोणीकर यांनी दिली होती. मात्र, धरणाच्या निर्मितीमध्ये सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे योगदान मोठं आहे. अनेक शेतकऱ्यांची घरंदारं याच धरणात गेली आहेत. असे असतानाही अनेक लाभार्थी शेतकरी आजही उजनी धरणातील हक्काच्या पाण्यापासून वंचित आहेत. अद्यापही सोलापूर जिल्ह्यातील शेवटच्या टोकापर्यंत पाणी पोचले नाही.

काय आहे लाकडी निंबोडी उपसा सिंचन योजना - धरण उशाला आणि कोरड घशाला, अशी अवस्था सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी आणि नागरिकांची झाली आहे. मात्र, सोलापूर जिल्ह्याचे पालकत्व स्विकारलेले पालकमंत्री दत्ता भरणे यांनी इंदापूर आणि आपल्या नेत्यांचा तालुका बारामतीसाठी लाकडी-निंबोडी उपसा सिंचन योजना २०२१ साली मंजूर केली होती. पण, जिल्ह्यात याबाबत माहिती कळताच जोरदार आंदोलन करण्यात आली. सोलापूर विरुद्ध इंदापूरातील नागरिक शेतकरी एकमेकांसमोर ठाकले. आंदोलनाची आक्रमकता पाहता, असा कोणताही निर्णय घेतला नसल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले. परंतु, अलिकडेच या योजनेसाठी ३४८ कोटी रुपयांची मंजुरी शासनाने दिल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर आता पालकमंत्री भरणे यांच्याविरोधात सोलापूर जिल्ह्यातील नागरिक आक्रमक झाले आहेत.

पालकमंत्री बदलाची चर्चा अन् भरणेंचा संताप - उजनीच्या पाणीप्रश्नावरुन पालकमंत्री भरणे यांच्या जिल्ह्यातून चौफेर टीका केली जात आहे. त्यातच पालकमंत्री बदलाची चर्चा सुरु आहे. मात्र, यावर प्रसारमाध्यमांनी काही दिवासंपूर्वी भरणे यांना विचारले असता उद्नीग्न अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. "पालकमंत्री बदलणे म्हणजे बाजारातील भाजीपाला वाटतो का? पत्रकारांनी जबाबदारीने बातमी दिली पाहिजे. पालकमंत्री बदलणे एवढे सोप्पे नसते. पालकमंत्री हा जिल्ह्याच प्रमुख असतो. जिल्ह्याची काळजी घेणं ही त्यांची जबाबदारी असते," असे पालकमंत्री भरणे यांनी आपली बाजू सावरत पत्रकारांना खडसावले आहे.

हेही वाचा - UPSC Maharashtra Topper : लहानपणी पाहिलेले स्वप्न साकार झाले; प्रियंवदा म्हाडदळकर यांची विशेष मुलाखत

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.