नाशिकमध्ये मुसळधार.. सोमेश्वर धबधबा पुन्हा प्रवाहित, पाहा धबधब्याचे विहंगम दृश्य

author img

By

Published : Sep 22, 2021, 8:09 PM IST

Heavy rains in Nashik

नाशिक शहरात झालेल्या संततधार पावसामुळे आणि गंगापूर धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्याच्या विसर्गाने सोमेश्वर धबधबा प्रवाहित झाला आहे. गंगापूर धरण क्षेत्रातील मुसळधार पावसाने धरण ९९ टक्के भरल्याने धरणातून मोठ्या प्रमाणातून विसर्गाला सुरुवात करण्यात आली आहे

नाशिक - गेल्या २४ तासात शहरात झालेल्या संततधार पावसामुळे आणि गंगापूर धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्याच्या विसर्गाने सोमेश्वर धबधबा प्रवाहित झाला आहे. गंगापूर धरण क्षेत्रातील मुसळधार पावसाने धरण ९९ टक्के भरल्याने धरणातून मोठ्या प्रमाणातून विसर्गाला सुरुवात करण्यात आली आहे.


नदीकाठच्या गावांनी सतर्क राहावे -

गोदावरी आणि आळंदी नदीच्या संगमावर असलेल्या सोमेश्वर धबधबा त्यामुळे खळाळून वाहतोय तर गोदावरी नदी पात्रात ही पाण्याचा मोठा प्रवाह पाहायला मिळतोय त्यामुळे नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तर सोमेश्वर धबधबा परिसरातील लोखंडी कठडे तुटल्याने या परिसरात सुरक्षेच्या कारणास्तव जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. गेल्या २४ तासात इगतपुरी तालुक्यात आणि धरण क्षेत्रात विक्रमी पाऊस झाल्याने वैतरणा धरण पुन्हा एकदा १०० टक्के भरले आहे. त्यामुळे धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलेला आहे. धरणातून सुमारे तीन हजार क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलेला आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. गेल्या २४ तासांपासून वैतरणा परिसरात मुसळधार पाऊस झाल्याने धरणातून पाण्याच्या विसर्गला सुरुवात करण्यात आली आहे.

नाशिकमध्ये मुसळधार.. सोमेश्वर धबधबा पुन्हा प्रवाहित

मुख्यतः वैतरणा धरणातून मुंबईला पाणीपुरवठा होत असतो. त्यामुळे मुंबईकरांची पाण्याची चिंता पुन्हा एकदा मिटली आहे. इकडे नाशिक शहरात आणि गंगापूर धरण क्षेत्रात सुरु असलेल्या संततधारेमुळे गंगापूर धरण ९९ टक्के भरले आहे. आज सकाळी नऊ वाजता धरणातून १,१०० क्‍यूसेस, दुपारी १२ वाजता २,००० क्यूसेस, त्यानंतर १ वाजता ६,००० क्यूसेस, दुपारी ४ वाजता धरणाचे सर्व दरवाजे उघडण्यात आले व ८,००० क्यूसेस पाण्याचा विसर्ग करण्यात आलेला आहे. दुपारपर्यंत पावसाची संततधार सुरूच राहिल्याने दुपारनंतर पाण्याचा विसर्ग वाढविण्यात येईल. त्यामुळे नदीकाठच्या गावांनी सतर्क राहावे, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

हे ही वाचा - कमी लसीकरण झालेल्या जिल्ह्यांनी लसीकरणाचा वेग वाढवा, मुख्यमंत्र्यांच्या सूचना

रामकुंड परिसरासह नदीपात्रातली काही मंदिरेही पाण्याखाली -

नाशिक शहराबरोबरच ग्रामीण भागाला सकाळपासून पावसाने झोडपून काढल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. नाशिक शहरात तसेच धरण पाणलोट क्षेत्रात कालपासूनच मुसळधार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे धरण पाणलोट क्षेत्रातील पाण्यात प्रचंड वाढ झाली. गोदावरीचे उगमस्थान असलेल्या त्र्यंबकेश्वर तालुक्यात रात्रीपासूनच मुसळधार पाऊस कोसळतोय तर मालेगाव, इगतपुरी तालुक्याला पावसाने झोडपून काढले आहे. त्याचबरोबर सुरगाणा, दिंडोरी, पेठ या तालुक्यात आजही पावसाचा जोर कायम राहिला आहे. नाशिक शहरात आज सकाळपासूनच पावसाचा जोर कायम राहिल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे.


गंगापूर धरणातील जलसाठा ९९ टक्क्यांवर पोहोचल्याने जलसंपदा विभागाने गेल्या आठवड्यापासून टप्प्या-टप्प्याने विसर्ग सुरू केलाय. त्यामुळे गोदावरीला पूर आला आहे. पाण्याचा जलस्तर वाढल्याने रामकुंड परिसरासह नदीपात्रातली काही मंदिरेही पाण्याखाली गेली. हवामान विभागाने शनिवार, रविवारपासून मुसळधार पावसाचा अलर्ट दिला होता. संततधार पावसामुळे नदीकाठच्या लोकांनाही सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. दरम्यान गोदावरीला आलेल्या पुरामुळे व्यावसायिकांनी नदीकाठची दुकाने सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित केली आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.