नवी मुंबई - नवी मुंबई शहर तसेच उरण पनवेल परिसरात अनंत चतुर्दशीनंतर पुन्हा येणाऱ्या संकष्ट चतुर्थीला गणरायाचे आगमन होते. या चतुर्थीला साखरचौथ असे संबोधले जाते. कित्येक घरात मोठ्या उत्साहाने बाप्पा बसविले जातात. दीड दिवस, अडीच दिवस तसेच पाच दिवसांच्या बाप्पाचे आगमन या दिवशी होते. विशेष म्हणजे रायगड जिल्ह्यात याला गौरा गणपती म्हणून संबोधले जाते.
जल्लोषात निघतात मिरवणुका
नवी मुंबई परिसरात तसेच रायगडमधील पेण, उरण, पनवेल परिसरात अनंत चतुर्दशीनंतर येणाऱ्या संकष्ट चतुर्थीला बाप्पांचे मोठ्या उत्साहात जल्लोषात आगमन होते. हे बाप्पा आणतेवेळी मिरवणुका निघतात. मात्र सद्यस्थितीत असलेले कोरोनाचे सावट पाहता सर्वत्र विशेष काळजी घेऊनच बाप्पा घरी किंवा सार्वजनिक मंडळात आणले जातात.
मखर सजवून केली जाते प्राणप्रतिष्ठापना
साखरचौथीच्या बाप्पांचे मोठ्या उत्साहात स्वागत केले जाते. आदल्या दिवशी बाप्पांची पत्री आणली जाते त्यामध्ये तेरडा नागवेल नारळी ची वेल अशा अनेक वनस्पती असतात दुसऱ्या दिवशी सकाळी गणपती बाप्पांची प्राणप्रतिष्ठा केली जाते. दीड दिवस अडीच दिवस आणि पाच दिवस अशा आपल्या इच्छेप्रमाणे हे बाप्पा घरात विराजमान होतात. बाप्पाचे मोठ्या उत्साहाने विसर्जन केले जाते.
पितृपंधरवड्यात वद्य चतुर्थीला केले जाते व्रत
पितृपंधरवड्यात वद्य चतुर्थीला हे साखरचौथीचे व्रत केले जाते. गणेश चतुर्थीला चंद्रदर्शन केले जात नाही. मात्र साखर चौथीला चंद्रदर्शन केल्यानंतरच उपवास सोडला जातो. विशेष म्हणजे साखर चौथीला साखरेचे मोदक बनविले जातात. संकष्टीच्या व्रताची सांगता ही साखर चौथीला केली जाते. साखर चौथीला जे भक्त 11 संकष्टी किंवा 21 संकष्टीचे व्रत करतात त्याचे उद्यापन साखर चौथीला केले जाते.