महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी भुजबळांची निर्दोष मुक्तता; अंजली दमानिया जाणार उच्च न्यायालयात

author img

By

Published : Sep 9, 2021, 6:59 PM IST

Updated : Sep 9, 2021, 7:18 PM IST

Social activist Anjali Damania

मुंबई सत्र न्यायालयाने महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची निर्दोष मुक्तता केलेली आहे. याविरोधात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी आपण उच्च न्यायालयात जाणार असल्याचा इशारा दिला आहे.

मुंबई - महाराष्ट्र सदन कथित घोटाळ्याप्रकरणी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, समीर भुजबळ आणि पंकज भुजबळ यांची मुंबई सत्र न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. सत्र न्यायालयाच्या या निकालानंतर छगन भुजबळ यांच्या विरोधात याचिका करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी सत्र न्यायालयाच्या निकालावर नाराजी व्यक्त केली आहे. तसेच या निकालाविरोधात आपण उच्च न्यायालयात जाणार असल्याचा इशाराही अंजली दमानिया यांनी दिला.

अंजली दमानिया यांची प्रतिक्रिया

दमानिया जाणार उच्च न्यायालयात -

महाराष्ट्र सदन कथित घोटाळा प्रकरणी आपल्या विरोधात कोणतेही पुरावे नाहीत यासाठी आपल्याला या आरोपातून दोषमुक्त करावे असा अर्ज छगन भुजबळ यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या न्यायालयाकडे एक वर्षापूर्वी केला होता. मात्र आजच्या झालेल्या सुनावणीदरम्यान सरकारी वकील उपस्थित नव्हते. अशावेळी केसची बाजू कोण मांडणार? असे प्रश्न अंजली दमानिया यांनी उपस्थित केले आहेत. सत्र न्यायालयाच्या या निकालानंतर आपण उच्च न्यायालयात जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.

'न्यायालयाने दिलेला निकाल हा योग्यच'

मुंबई सत्र न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचा सन्मान करत छगन भुजबळ यांनी सर्वांचे आभार मानले. सत्र न्यायालयाच्या निर्णयानंतर या विरोधात काही लोक उच्च किंवा सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा प्रयत्न नक्की करतील त्यांनी खुशाल जावे असा टोला सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानिया आणि भाजपा नेते किरीट सोमैया यांना लगावला आहे. मात्र मुंबई सत्र न्यायालयाने दिलेला निकाल हा योग्यच आहे असा विश्वास छगन भुजबळ यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला.

हेही वाचा - सत्य परेशान हो सकता है, लेकिन पराजित नही - छगन भुजबळ

Last Updated :Sep 9, 2021, 7:18 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.